Tuesday, May 31, 2022

स्वराज्य तोरण 'तोरणा' ते प्रथम राजधानी 'राजगड' पायी वारी सोहळा गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी



स्वराज्य तोरण 'तोरणा' ते प्रथम राजधानी 'राजगड' पायी वारी सोहळा

          शनिवार दिनांक २८ मे २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे मावळे घेऊन निमगाव म्हाळुंगी मधून शिक्रापूर, हडपसर, कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर करत तोरण्याच्या दिशेने निघाली. पंकज माने, प्रताप ढमढेरे, दादा घोरपडे, रविंद्र काळे, चंद्रकांत आहेर, भरत साकोरे, गोपाळ, आनंद, आयुब शेख, वैभव करपे, गिरीश तांबे, अथर्व खांडेकर, प्रशांत शेलार, महेश चोपडे, सागर पांढरकामे, मंगेश आणि दोन सह्याद्रीकन्या प्राची वाखारे, रोहिणी शेलार यांमध्ये शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक, अधिकारी, कंपनी कामगार, काॅलेजचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या गावांतील, 'शिवप्रेम' या एकाच ध्येयानं पछाडलेली मित्रमंडळी यावेळी एकत्र येतात याचं कारण आयोजक रवी काळे सर. शिंपल्यासारखी खूप कमी लोकं असतात, जे दुसऱ्यांना मोत्यासारखं घडवताना स्वतःचा स्वार्थ पाहत नाहीत त्यापैकीच ते एक. आप्तेष्टांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाईलचा आपण जसा दर महिन्याला रिचार्ज करतो, अगदी तसंच प्रत्येक महिन्याला किल्ले भ्रमंतीचे आयोजन ते करतात. यावेळी बाळाभाऊंची कमतरता प्रकर्षाने जाणवली.

              भररात्री अडीच वाजता तोरणा पायथ्याशी पोहोचलो. किती गार! हुडहुडी भरली नुसती. यंदा ट्रेकला बरेच जण नवीन असल्यामुळे ओळख परेड झाली. रात्रीचा प्रवास, त्यात येथे रानडुकरांचा वावर असल्यामुळे मार्गदर्शक पंकज सरांनी छोटीशी धारदार कुऱ्हाड जवळ बाळगली. गारठा भरपूर होता पण कोणीही जर्किन, स्वेटर घेऊ नये फक्त पाण्याच्या बाटल्या आणि जेवणाचे डबे घ्यावेत असे पंकज सरांनी सांगितले. पुढे जाऊन हात रुमालाचंही ओझं होईल असं त्यांचं मत. ज्याची पुढं आम्हाला पुरेपूर प्रचिती आली. पंकज मानेंसारखा एक तारा या ग्रुपला गवसला आहे, हे आमचं भाग्यच. मोबाईल बॅटरीच्या उजेडात दुर्गप्रवास सुरु झाला. काही ठिकाणी सौरदिवेही होतेच. वाऱ्याचा वेग भरपूर होता, जागोजागी असणाऱ्या रेलिंगने मात्र चढाईचं काम सोप्प केलं होतं. नवीन मावळे प्रशांत शेलार यांनी थोडी माघार घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या अर्धांगिनीने अशी काय जादू केली की ते सर्वांत पुढे चालू लागले, याचं कोडं शेवटपर्यंत उमगलं नाही. या यशस्वी पुरुषामागे त्यांची खंबीर बायको उभी होती, असे काळे सर म्हणाले. साडेचार वाजता आम्ही गडावर पोहोचलो. पाण्याचे टाक, तुटके वाडे नजरेस पडले.

तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप,

कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप?

      असं वर्णन करावंसं वाटलं तोरण्याचं. काळोखातही किल्ला चांदणी प्रकाशात न्हाऊन निघत होता. आपण एसी म्हणतो त्या उपकरणालाही लाजवेल असं गारेगार वातावरण. पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल प्रचंडगड म्हणजेच तोरणा. वेल्हे तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरलेत. त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड तर दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग आहे. गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी तर उत्तरेला कानद नदीचे खोरे नजरेस पडते. कात्रजपासून अवघ्या ५१ किलोमीटरवर.

            स्वराज्य स्थापनेची मनीषा उराशी बाळगत १६४७ मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी म्हणजे ज्या वयात आपल्याला दहावीच्या बोर्डाचा फॉर्म भरताना दहावेळा, दहा ठिकाणी विचारावं लागतं, अशा वयात शिवबाने कोणत्याही प्रकारचा रक्तपात न करता सवंगड्यांसोबत निजामशाहीतील हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून हा तोरणा. प्रारंभ लहान असला तरी सातत्याच्या प्रयत्नाला गोड फळे लागतात, हे या किल्ल्याच्या इतिहासातून शिकता येते. प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून 'प्रचंडगड' ठेवले. याचं किल्ल्यावर सापडलेल्या १२ हंड्यांतील सुवर्णमुद्रांचा उपयोग शिवरायांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. शंभूहत्येनंतर १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घालत लढाई करून ताबा मिळवला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे 'दैवी विजय' ठेवले. चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड जिंकला, यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. औरंगजेबाने प्रत्यक्ष लढाई करून जिंकलेला असा हा स्वराज्यातील एकमेव किल्ला, इतिहास दप्तरी नोंद आहे.



        प्राचीन मेंगाई मंदिरात विश्रांती घेण्याचे ठरले. आमच्या आधी तेथे वीस-पंचवीस मावळे विश्रांती घेत होते. मंदिराचा गाभारा भरपूर मोठा होता, जणू एखादी भलीमोठी धर्मशाळाच. सर्वजण झोपण्याची खटपट करत असतानाच बडबड करणाऱ्या आमच्या गटातील तीन चार जणांना ढमढेरे गुरुजींनी सज्जड दम भरला आणि सगळीकडे भयाण शांतता पसरली. तासाभराची विश्रांती घेत पहाटे साडेपाच वाजता पुन्हा उठलो. तोरणेश्वर मंदिर, बुधला माची, झुंजार माची पाहिली. धुक्यामुळे स्पष्टता नव्हती मात्र नयनरम्य दृश्य दिसत होते. थोडं फिरून कल्याण दरवाजा मार्गे राजगडाच्या प्रवासास प्रारंभ केला‌. गड पुन्हा आलो त्याच वाटेने न उतरता मागील दरवाज्यातून डोंगर रांग पकडत राजगड गाठायचा असा हा ट्रेक नव्हे ट्रेल होता. मार्ग खडतर होता, घसरण्याची भीती वाटत होती. भरपूर थंडी असूनही घाम फुटला होता. जागोजागी रेलिंग करून अवघड ठिकाणी पुरातत्त्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहेत, ही त्यातल्या त्यात सौख्याची बाब. काही ठिकाणी अक्षरशः आपला पृष्ठभाग दगडांना चिटकवून घसरत जावं लागत होतं. असे अनेक कठीण पॅच होते, जिथे धडकी भरत होती. दादा आणि वैभव भाऊ यांनी याला 'ढुंगण पॅच' असं नाव दिलं. आणि आम्हीसुद्धा सर्वानुमते त्यास अनुमोदन दिलं. कारण हा जिवंत अनुभव प्रत्येकाने भोगला होता. हसत खिदळत, चेष्टा मस्करी चालली होती पण काळीजही धडधडत होतंच.



            निसर्ग डोळ्यात सामावण्याचा प्रचंड प्रयत्न केला. अथांग निसर्ग ना कवेत घेता येत होता ना नजरेत मावत होता. तरीही प्रसन्न वाटत होतं. क्षणभर सूर्यप्रकाशामुळे स्पष्ट दिसायचं की क्षणार्धात धुक्यांची पांढरी शाल पांघरली जायची. उजेड आणि धुकं यांचा पाठशिवणीचा खेळ बराच वेळ सुरू होता. फुफ्फुसं तुडुंब भरून होईपर्यंत प्राणवायू घेता येणं, हे जगातलं सर्वश्रेष्ठ सौख्य आहे, याची पदोपदी जाणीव होत होती. नऊ वाजता घरून आणलेल्या डब्यांतून आम्ही नाश्ता केला. वेगवेगळ्या पदार्थांच्या देवाणघेवाणीतला गोडवा चाखता आला. पोट भरलं आणि पुन्हा निघालो राजगडाच्या प्रवासाला. आता ऊन वाढलं होतं, बॅगेत पाण्याच्या चारपाच बाटल्यांमुळे जड झालं होतं. घामाघूम झालो होतो. पुढे करवंदाचं एक झाड दिसलं, आम्ही सगळे तुटून पडलो. अगदी लाल करवंदं सुद्धा अधाशासारखी खाल्ली. जसं जसं पुढे जावं तसं करवंदाची जाळी दिसायची, मनसोक्त करवंद आम्ही इतकी खाल्ली की आता नकोसं वाटायला लागलं होतं. सुरुवातीला तुटून पडलो नंतर एकमेकांना वाटू लागलो. आपलं पोट भरलं की जग दिसतं, हेच खरं. संपूर्ण झाडाचं एक करवंद कोणीतरी खायचा आणि गोड आहे की आंबट आहे असं सांगायचा. मग आम्ही त्या झाडावर तुटून पडायचो किंवा दुर्लक्ष करायचो. ढमढेरे सरांनी खिसा भरून करवंद आपल्या पोरासाठी जमा केली. हात, ओठ अगदी चिकट झाले होते.

              रात्री अडीच वाजल्यापासून सगळे चालत होते. तोरणा सोडल्यापासून समोर राजगड दिसत होता, जवळ आहे म्हणत भुलवत ही होता.

भेटीचिया ओढ लागलिसे डोळा

वाट ही विरळा दिसे मजला,

लाखो राऊळाशी टेकविला माथा

देव कुठे माझा शोधू आता?

कुणी पाहिला हो,

माझा देव कुणी पाहिला?

             अशी आम्हा सर्वांची अवस्था. एके ठिकाणी थांबून गिरीश तांबे या मित्राचं गाणं ऐकलं. विसाव्याचा क्षण उपभोगत पुन्हा चालू लागलो. डीएसपी आणि ढमढेरे सर यांनी थकत गुंजवणे गावात जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर प्रवास थांबवला. दोन मावळे धारातीर्थी पडले. काळे सरांच्या हारपुडे सर आणि पासलकर सर या दोन मित्रांनी तोरण्यापासून राजगडाकडे गाडी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. प्रत्येक गडकिल्ल्यांच्या ठिकाणी काळे सरांचे मित्र कसे अवतरतात? हा एक यक्ष प्रश्नच! तोरण्यापासून १३ किमी तर भोर गावापासून २४ किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर. हाच दुर्गराज राजगड शिवरायांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड कर्तृत्वाचा विस्तार.

             तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग अळू दरवाजा. संजीवनी माचीकडचा कडा एकदम उभा होता त्या मार्गे वर चढलो. उभ्या चढणीवर सागर इतक्या वेगात चढत होता की बास! झाडावर चढणारी खारुताईच जणू! त्याच्या मागोमाग आमचीही दिंडी राजगडाच्या दिशेने वर चढू लागली. चालण्याच्या या वारीत कधी पांडुरंग भेटतोय हीच ओढ लागली. आपण नेहमी गड वरून पाहतो, आम्ही मात्र अर्धा अधिक गड खालून वळसा घालत पाहिला. डोंगराला गडाच्या स्वरुपात साकारताना काय मेहनत अन् दृष्टी लागते याचा अर्थ समजला. राजधानी राजगडाची भव्यता डोळ्यांचं पारणं फेडत होती. तटबंदी अजूनही थाटात उभी. काळ्या कातळाचं सौंदर्य नजरेत भरत होतं. थोडं वर गेलो, संजीवनी माची दिसली. दुहेरी तटबंदीचा नजारा अवर्णनीय, सुखद भासत होता. कोणीतरी सुरेख नक्षीकाम केल्यासारखा. राजधानीचा गड म्हटल्यावर हल्ला होणारच म्हणून एक तटबंदी जरी नेस्तनाबूत झाली तरी राखणीला दुसरी असावी या उद्देशाने राजांनी दुहेरी तटबंदीचा घाट घातला. शिवाय दोन तटबंदीच्या मध्ये सैन्य सावलीला बसेल अशी व्यवस्था. तसेच टेहळणीसाठी सुरक्षित जागा निर्माण होईल हा या मागचा मनसुबा.

            स्वतः शिवरायांनी या गडासाठी स्थापत्य कल्पनेतून साकार केलेला हा गड. गडावरील प्रत्येक गोष्ट माच्या, बुरुजं, सदर, मंदिर, बालेकिल्ला, वाडे सगळं काही राजांच्या देखरेखीत निर्माण झालं, आकारास आलं. २५ वर्ष स्वराज्याची राजधानी असणाऱ्या या गिरीरत्न राजगडाच्या चिऱ्याचिऱ्याने दस्तुरखुद्द शिवबाचा अगणित वेळा स्पर्श अनुभवला असेल, हे जाणवलं. काळ्याभोर कातळाला स्पर्श करत बंद डोळ्यांच्या पापण्यांपलीकडे शिवबाच्या स्पर्शाची अनुभुती घेण्याचा यत्न आम्ही केला. संजीवन माचीच्या बांधकामावेळी किल्लेदार वरून खाली पडला पण त्याला साधं खरचटलं सुद्धा नाही म्हणून ही संजीवन माची. माची तयार करताना बहुधा ती ढासळतेच, दगड पडतात, पुन्हा पुन्हा बांधावी लागते पण सुवेळा माची एकदाही ढासळली नाही म्हणून जी सुवेळी निर्माण झाली ती सुवेळा! असा रंजक इतिहास पंकज सरांनी आम्हाला सांगितला.

          राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना येथे घडल्या आहेत. हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला शिवबाच्या कर्तृत्वाची ग्वाही देत उभा आहे. २२ कोसांचा घेर आणि मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरं काहीच येथे फिरकू शकत नाही. काय वर्णन करावं? जणू काही अथांग आकाशच पसरलंय. बालेकिल्ला पाहून छाती दडपते. या गडाच्या भाराने पृथ्वीचा घाम निघत असावा बहुतेक. शिवबाने तोरण्यापाठोपाठ हा मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून घेत डोंगरांच्या तिन्ही माच्यांना तटबंदी केली. सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती.


             राजाच्या तलवारीवर प्रजेच्या निष्ठेचं पाणी चढलं की राष्ट्र अजिंक्य होतं. पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी असणारा राजगड याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. इथे येणं खरं तर केवळ निमित्तमात्र. दैदिप्यमान हा शब्द समर्पक असणाऱ्या शिवरायांच्या अफाट कार्यासमोर आपण किती खुजे आहोत, हेच मनाला नेहमी पटवायचं असतं. म्हणजे गर्वाची बाधा होतच नाही, ही प्रेरणा सतत श्वासात भरून घ्यायची असते पुढच्या प्रत्येक कार्यासाठी.  गडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत. शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाली दरवाजा मार्गे साखर, वाजेघर, पालखुर्द, भोसलेवाडी मार्गे रस्ता प्रशस्त असून पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो, अशी योजना आहे. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे, ब्रम्हर्षी मंदिर आहे. सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहणे ही दुर्ग भटक्यांसाठी एक पर्वणीच.

           राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी २ दिवसही अपुरे पडतील. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. पद्मावती मंदिरात शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. सुबक बांधणीचा विस्तीर्ण पद्मावती तलाव शिवबाने स्वतः बांधून घेतला. पावसाळ्यात धोधो बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याचा विधायक बंदोबस्त केला. राजवाडा, अंबारखाना, सदर यांचे अवशेष आजही अस्तित्वाची साक्ष देतात. नजरेच्या टप्प्यात जेवढं येईल तेवढं पाहत चोर दरवाज्याकडून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. तोरणा, राजगड किंवा कोणत्याही किल्ल्यांची एकमेकांशी तुलनाच करता येणार नाही. चाफ्याच्या सुगंधाने धुंद होणारा माणूस मोगऱ्याच्या वासाला विसरतो, असं थोडीच होतं?

            जवळजवळ तेवीस किलोमीटर आम्ही चाललो, तेही अविश्रांत. खिशात किती आहे? यापेक्षा तुम्ही खुशीत किती आहात हे महत्त्वाचं. गुंजवणे गावात फ्रेश होऊन खेड शिवापूरजवळ ढाब्यावर जेवलो. रात्री नऊच्या दरम्यान घरी परतलो. सुखाच्या या अनुभवाचा आणि भ्रमंतीचा एकूण खर्च ६२० रुपये इतकाच आला, हेच तर आमच्या आयोजकांच्या नियोजनाचं वैशिष्ट्य. प्रत्येक महिन्याला एक दोन किल्ल्यांची सफर आम्ही करत आहोत, या सफरीचा परीघ सतत विस्तारत जावो, हीच सदिच्छा..

सुरेश भट म्हणतात,

देखावे बघण्याचे वय निघून गेले,

रंगावर भुलण्याचे वय निघून गेले,

आला जर जवळ अंत

का हा आला वसंत?

हाय, फुले टिपण्याचे वय निघून गेले.

अशी आपली गत होऊ नये म्हणून फिरत रहा मित्रांनो. स्वप्नांना सुद्धा एक वय असतं, जर ती वेळेत पूर्ण नाही झाली की आयुष्यभर मनाला कोसत राहतात म्हणून भटकत रहायला हवं. स्वर्गरुपी या सह्याद्रीच्या ऐतिहासिक, निसर्गरम्य धरतीवरून जीव ओवाळून टाकावा अशी याची महती असताना हयातभर ते पाहणंही आपल्याकडून होऊ नये यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या प्रवाहाचं आपणही पाणी व्हावं, दर महिन्याला पैलतीरी शिवगर्जनेचा सातत्याने नाद ऐकू यावा आणि या वाहण्याला कधीच अंत नसावा ही मनोभावना ह्रदयात तेवत ठेवत थांबतो...

पुन्हा भेटू वेगळ्या गडाच्या वाटा शोधताना...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील ट्रेक २५ जून २०२२ रोजी राजमाची किल्ला आणि एकवीरा देवी असा असेल.

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.


आयोजक 

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675


मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375


शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

955294127




Tuesday, May 10, 2022

भर उन्हाळ्यात तुंग आणि कोरीगडची सफर! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची...

 भर उन्हाळ्यात तुंग आणि कोरीगडची सफर!



शनिवार दिनांक ७ मे २०२२ रोजी रात्री पावणेबारा वाजता गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान चे मावळे घेऊन निमगाव म्हाळुंगी वरून लोणावळ्याच्या दिशेने निघाली. यामध्ये आयोजक म्हणजेच पुणे महानगरपालिकेतील शिक्षक रविंद्र काळे, निमगाव म्हाळुंगीतील प्रगतशील शेतकरी शरद काळे, मुरली फार्मा कंपनीतील एच.आर. मॅनेजर वैभव करपे, आयटीसी कंपनीमधील रविंद्र काळे (अजहर), भरत साकोरे, नागेश पाचपोर हे सहाजण. खराडी बायपास वरून भटकंतीचा ध्यास उराशी बाळगत शेकडो वेळा सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातून हिंडणारे पंकज माने आणि मी सहभागी झालो. अशा अष्टप्रधान मंडळाने तुंगगडाच्या दिशेने कूच केली.

प्रत्येक महिन्याला कॅलेंडरचं नवीन पान उलगडावं अगदी तसंच दर महिन्याला नवीन गडभ्रमंतीचं नियोजन काळे सर करतात. मार्ग दाखवायला पंकज माने सर, ज्यांनी तीनशेहून अधिकवेळा गडाच्या मातीस स्पर्श केला आहे. त्यांना प्रत्येक गडाचा इत्यंभूत माहितीसहीत रस्ता कसा काय लक्षात राहतो? हा सदैव आमच्या आश्चर्याचा विषय. गाडीत प्रवासभर दोन्ही रवींची विनोदांची जुगलबंदी सुरू होती. त्यांनी कोणालाही झोपू दिलं नाही, सोबत इंदुरीकरांचं कीर्तन सुरू होतंच... यावेळी विनोदांचे बादशहा अप्पा, दादा आणि डाॅक्टर नव्हते पण त्यांची कमतरता या दोघांनी भासू दिली नाही.

सव्वातीन वाजता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी थांबलो. उंची ३,००० फूट असणारा तुंगगड गिरिदुर्ग प्रकारातील असून 'कठिणगड' नावे प्रसिद्ध आहे. लोणावळ्याच्या डोंगररांगेतील हे एक दुर्गरत्न. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता, हे याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य.

तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. अलंकृतता हे वैशिष्ट्य असणाऱ्या मिशीधारी आणि जान्हवेधारी हनुमान मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात.

सह्याद्री प्रतिष्ठानचे मावळे दाट अंधारातही गडाच्या डागडुजीसाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. शिवकाळात शंखशिंपले, चुना, गूळ, माती, दगड, वाळू यांसारख्या चौदा प्रकारच्या मिश्रणाने ज्याप्रकारे बांधकाम केले जात होते अगदी त्याचपद्धतीने स्वयंस्फूर्तीने यांचंही काम सुरू होतं. गडावरील टाकांतील पाणी पाईपच्या माध्यमातून पायथ्याशी आणलं होतं.

अंथरुणावर लोळण घालत आपण शनिवार रविवार सुट्टीचा उपभोग घेत असतो त्याचवेळी असे कितीतरी सह्याद्रीचे मावळे शिवराजांचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम अविरतपणे करत असतात, कोणताही गाजावाजा न करता... पहाटे मोबाईलच्या उजेडात मार्गदर्शक पंकज माने सरांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही गड सर करण्यासाठी झटत होतो. पवना धरण परिसर निद्रिस्त अवस्थेत असतानाही दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.

हवेतला गारवा अन् शरीराचा घाम यांचा संयोग होत भलतीच शीतलता लाभत होती. एवढ्या अंधारातही नागेश पाचपोर एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात बिस्कीट पुडा घेऊन कोणत्याही आधाराशिवाय गड चढत होता. भरत साकोरे शांत व्यक्ती पण प्रत्येक घटनेवर यांचे किस्से तयार. एकूणच मज्जा येत होती.

पहाटे साडेचार वाजता बालेकिल्ल्यावर पोहोचलो. तुंगाईदेवीचं मंदिर होतं. भगवा अखंड फडकत होता. पवना धरणाला स्पर्श करून येणारं वारं कमालीचं गार होतं. त्यात उभ्या माणसाला हलविण्याचा आवेग होता. भर उन्हाळ्यात असा गारठ्याचा अनुभव ऋतू कोणता याचाच प्रश्न उपस्थित करीत होता. थोड्याशा गप्पा मारत, निद्रिस्त परिसर पाहून तासभर झोपण्याचा निर्णय बहुमताने मंजूर झाला. काश्मीरला एक पाऊल मागे टाकावं लागेल असा भयानक गारठा. वारं तर एवढं की झाकलेल्या डोळ्यात मातीचे खडे जात होते. रात्री गडावर मुक्काम केल्याचा थरारक अनुभव ग्रुपमधल्या कोणालाही फोन करून विचारता येईल....

सहा वाजता सर्वजण उठलो, एकत्र येऊन फोटो काढले, शिवगर्जना दिली. नजारा कॅमेऱ्यात आणि डोळ्यांत सामावून घ्यायचा प्रयत्न केला.

सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पवन मावळ प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळाली. याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत सौंदर्य आकंठ काळजात सामावून घेतलं. 'घाटरक्षक' असणाऱ्या या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, मोरगिरी, पवनाधरण आणि तिकोना हे किल्ले नजरेच्या टप्प्यात असून पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत होता, हे जाणवले.


या गडावर जाणाऱ्या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच येतात. साधारणत: ४५ मिनिटांत गडमाथा तर तासाभरात सर्व गड पाहून होतो. गड फिरलो, पाणी साठवण्याचे नियोजन गडावर उत्तमरीत्या केलेले आढळले. कचेरी, गणेश मंदिर, जुनाट वाड्यांचे अवशेषही अस्तित्वाची साक्ष देतात.

गडमाथा फारच आटोपता असल्यामुळे तासात सर्व गड पाहून झाला. पायऱ्यांची बांधणी, जागोजागी माहिती देणारे फलक, मंदिरांची डागडुजी, वीरगळ स्थापना यांची व्यवस्था सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे.

जातीचं राजकारण करत दंगली पेटवणाऱ्यांनी शिवरायांच्या गडकोटांच्या काळजीखातर पाऊल उचललं तर महाराष्ट्राचं रुपडं काहीसं निराळं दिसेल. आपली ऊर्जा उदात्त ध्येयासाठी समर्पित करण्यासाठी वळवणे ही दीर्घ साधनाच आहे.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगीकडून आयोजकांनी पाचशे रुपये भेट सह्याद्री प्रतिष्ठानला देऊन स्वराज्य पायरीचरणी फूल न फुलाची पाकळी वाहिली.

खेळण्या-बागडण्याच्या वयात सवंगडी गोळा करून युद्धाचा सगळ्यात प्रभावी गनिमी काव्याचा प्रकार शोधून काढला शिवछत्रपतींनी. इथे झोपेतून जागं व्हायला तासभर जातो आपला. भवानी तलवार भेटली असती तर आम्हीही पराक्रम गाजवले असते, म्हणणाऱ्यांना काटा टोचला तरी मातोश्री आठवतात.

सुखं पायाशी लोळण घालत असताना जनतेचा, रयतेचा विचार करणारा राजा होता म्हणून जीव देणारी प्रजा निर्माण झाली, हे विसरून कसं चालेल?

निरोप घेत गड उतरलो. थोडं पुढे जाऊन चहा, बिस्कीट आणि मॅगी बनवून आम्ही नाष्टा केला.

नाष्टा, जेवण यांसाठी लागणारे साहित्य, भांडी, गॅस, भाजीपाला या सर्वांची सोय आयोजक टिम करते. यामध्ये प्रामुख्याने शरद काळे म्हणजेच आमचे बाळाभाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या हातात अक्षरशः अन्नपूर्णा वास करते. चवदार भोजन तयार करण्याची हातोटी हे त्यांचं वैशिष्ट्य. जेवणारा तृप्तीचा ढेकर दिल्याशिवाय राहणार नाही, याची १००% हमी. अगदी चाळीस पोटांची भूक शमेल इतका स्वयंपाक ते उत्कृष्टपणे करतात. पाणी,मीठ, तिखट सगळंच मापात.

प्रवासाची तयारी गाडीत बसल्यावर करायचीच नसते मुळी. प्रवासाचा संकल्प सोडण्याच्या क्षणापासून तयारीचा प्रारंभ करायचा असतो, हे त्यांच्याकडून शिकलो.

पुढे सतरा किलोमीटर जाऊन अंबवणे, मुळशी तालुक्यातील पेठ शहापूर गावात कोरीगड (शहागड) पायथ्याशी थांबलो. उंची जेमतेम १०१० मी. असणारा गिरिदुर्ग पायथ्यापासून पाहताना सरळसोट कडा दिसतो.

तुंगपासून १७ किमी तर लोणावळ्याच्या पूर्वेला २५ कि.मी अंतरावर असणाऱ्या गडाला चहूबाजूंनी तटबंदी तर दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो.


पाण्याच्या बाटल्यांमध्ये लिंबू पिळून साखर टाकून मस्तपैकी सरबत बनवलं. आणि निघालो गडचढणीला. आता उन्हाच्या झळा दाटत होत्या. करवंदाच्या जाळीतून काळीभोर करवंदं डोकावून पाहत होती. टवटवीत, गोड करवंदं खाण्याचा मोह आवरला नाही. लालेलाल उंबरांचा सुवास सर्वत्र दरवळत होता.

ही हिरवाई पाहताना वाटतं, आपल्याला शहरात कमी झाडं असूनही मिळणारा प्राणवायू इथूनच सप्लाय होत असावा बहुतेक..

पंधरा वीस मिनिटे जंगलातून गेल्यावर गडाच्या पायऱ्या लागल्या. या गडाची डागडुजी देखील छानपैकी करण्यात आली आहे. जुन्या तटबंदीच्या दुरुस्तीचा घाट घातला गेलाय तशीच सुधारणा अस्तित्व संपत चाललेल्या गडकोटांसाठीही करण्याची सद्बुद्धी आपण मराठी माणसांस येवो, हीच सदिच्छा.

थोडं वर गेल्यावर एक भली थोरली गुहा आहे. रक्तवर्णी पाषाणांत कोरलेली. काय गारवा लाभतो याठिकाणी, अवर्णनीय. गडाच्या मध्यभागी डोगराचं पाणी झिरपून साठण्यासाठी बनविलेली विहीर त्याकाळातील बांधकामांचे उत्तम उदाहरण आहे. त्याचं पाणी बर्फाहूनही गार अन् मधाहूनही गोड होतं. महादरवाजाचे दर्शन झाले की चढाईचा त्रास कुठल्या कुठे पळून जातो.

मी हिरवळ पांघरतो

आणि

रोजचं तेच ते जिणं झुगारून देतो.

सानिध्यात तुझ्या येताना

आम्ही तान्हं होऊन येतो!

अशी आमची अवस्था.

११ मार्च इ.स. १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करल्याचा इतिहास या गडाने पाहिला.

गड तसा भलामोठा, विस्तृत. चहूबाजूंनी तटबंदीच्या दुरुस्तीमुळे नववधूसारखा सजलेला भासतो, भोवताली हिरव्या निसर्गाची शाल पांघरलेला. गडावर कोराईदेवीचं सुंदर मंदिर आहे. गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ’लक्ष्मी’ मंदिराजवळ अजूनही वास्तव्यास आहे. गडावर दोन मोठी तळी आहेत. भग्नावस्थेतील बरीचशा वास्तू आहेत. गड फिरायला तासभर गेला. बेभान होऊन आपण त्या सह्याद्रीच्या कुशीतलं एखादं कातळ होत अनुभवावं, असा संपन्न निसर्ग.

उभा जन्म कैदेत काढेन मी,

सह्याद्रीरुपी पिंजरा पाहिजे!

अशी आम्हा सर्वांची भावना. परतीचा ध्यास लागला, कारण आता भूक लागली होती.

लोणावळ्यात येऊन भूशीडॅमला भेट दिली. पाणी खूप कमी असल्यामुळे पोहण्याची इच्छा अपूर्णच राहिली. दोन अडीच किलो चिकन घेऊन तुंगार्ली तलावापाशी आडोसा बघून स्वयंपाकाची सोय करू लागलो. ही जागा सुद्धा मार्गदर्शक पंकज माने यांनीच दाखवली. कांदे, टोमॅटो कापणे, चूल तयार करून लाकडं गोळा करणे, तलावातील पाणी बाटल्यांमध्ये भरून आणणे यांसारखी कामे सर्वांनी मिळून केली. बाळाभाऊंनी सुकं चिकन आणि भाजी फक्कड बनवली. भात बनवला. सगळ्यांनी मदत केली.

रवी काळे सरांनी आठ जणांसाठी बाजरीच्या भाकरी बनविल्या. सुगरणीला लाजवेल अशा बनविलेल्या भाकरी पाहताना आम्ही सर्वजण अवाक् झालो. शेवटी सरांना १६ वर्षांचा दांडगा अनुभव होता, याची याचि देही याचि डोळा प्रचिती आली. स्वयंपाक झाला. सर्वांनी तलावात मस्तपैकी अंघोळ केली. फ्रेश झालो. चिकन भाजी, भात, भाकरीवर दणकून ताव मारला. याहून सुख वेगळं काय असतं?

परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना गाडी बाळाभाऊंनी चालवली अन् येताना वैभव करपेंनी. एक नंबर ड्रायव्हिंग, दोघांची, एकदम स्मूथ! तुंगार्ली गावात पाणी प्यायला उतरलो. दोन मोठमोठाले रांजण ठेवून पांथस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली होती. शेजारीच मोठ्या हौदात पक्षी आणि भटक्या जनावरांच्याही तहानेची, खुशालीची केलेली सोय संवेदनशील मनाची साक्ष देत होती. भारी वाटलं.

आपण इथे येतो,मस्तकात संसाराच्या विवंचना घेऊन वावरतो. जगण्याची कोडी सोडवत बसतो. वेळ आली, दारावर टकटक झाली की सारं जिथल्या तिथं टाकून तडकाफडकी निघूनही जातो. मधल्याकाळात आपल्यापैकी किती जणांना माणुसकीचा लळा लागतो? हा प्रश्न महत्त्वाचा.

भर उन्हाळ्यात दोन किल्ले सर करून चुलीवरचं जेवण बनवून खाणारे गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे आम्ही मावळे.

पुण्यात आल्यावर गाडी थांबवून जलजिरा, लिंबू सरबत प्यालो, शेवट गार झाला. अगदी मोजकीच माणसं असल्यामुळे भरपूर फिरता आलं, ढिगभर फोटो झाले, आयोजकांनाही एन्जॉय करताना पाहिलं.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुखरूप घरी पोहोचलो. अवघ्या आठशे रुपयांत कधीही न संपणारे, अविस्मरणीय क्षण वाट्याला आले, ते गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमुळे...

स्वतःकडचा मोहक सुगंध, दिव्य सुवासाचा शोध घेण्यासाठी ऊर फुटेस्तोवर धावणारा कस्तुरीमृग शेवटी कोसळून खाली पडतो. तशी आपली गत होऊ नये म्हणून धावपळीच्या जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला हवा. निसर्गाच्या सान्निध्यात जगून पहायला हवं.

अंगणातल्या रातराणीचं फूल हुंगल्याशिवाय त्याचं निर्माल्य होत असेल तर आपण वेळ कशासाठी दवडतो? कुठे वाया घालवतो? याचा ताळा व्हायलाच हवा.

मिली है जिंदगी तो मक्सद भी रखिये,

सिर्फ साँसे लेकर वक्त गवाँना गवाराँ नही!

हे देखील तितकंच महत्त्वाचं.

काहीजण नुसता प्रवास करतात. माझ्या मते ज्याची नशा चढत नाही तो प्रवासच नव्हे. चार दिवसांचं आयुष्य जितक्या विविधतेत घालवता येईल तेवढं घालवायचं, असा संकल्प उराशी बाळगायचं ठरवलं.

आठवणींची ही फुलं सुकू नयेत म्हणून काळजाची धडपड आणि सुकलेली फुलं जपण्यातही मन गुंतलेलं असतानाच लेखणीला थांबवतो.

पुढील पायी भ्रमंती सिंहगड ते राजगड २९ मे २०२२

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा..

पुन्हा भेटू नव्या गडाच्या वाटा धुंडाळताना....

तोपर्यंत जय शिवराय!


आयोजक

रवी काळे सर

गड किल्ले प्रेमी प्रतिष्ठान

निमगाव म्हाळुंगी

90964 65675


मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375


शब्दांकन

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका

9552941271




Thursday, May 5, 2022

लोकराजा राजर्षी शाहू महाराजा लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

लोकराजा राजर्षी शाहू महाराजा......



समतेसह स्वाभिमानाचे जगणे दिले,

शिक्षणाचे दार आरक्षणासह खुले केले.

कलावंतांना कौशल्याचे मोल लाभले,

दूरदृष्टीचे सृजनात्मक शाहूराजे भले!

           २६ जून १८७४ रोजी राधाबाई जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी कोल्हापूरात 'यशवंत' जन्मास आले. केवळ तीन वर्षांच्या वयात आईविना पोरके झालेल्या पोरास दहाव्या वर्षी कोल्हापूर संस्थानातील राजा शिवाजी चौथा यांच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले. सिंहासनावर आरूढ होत राज्यारोहणावेळी त्यांचे 'छत्रपती शाहू महाराज' असे नामकरण झाले.

         शाहूराजे पंचगंगा नदीकाठी स्नानासाठी गेले असताना पुरोहित नारायण भटजींनी वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटल्याचे सहकारी राजारामशास्त्री भागवत यांनी महाराजांना लक्षात आणून दिले. महाराज क्षत्रिय नसल्यामुळे आपण असे केल्याचे सांगत, क्षत्रियांना केवळ पुराणोक्तच मंत्राचा अधिकार आहे असे सुनावले. जात्यांध समाजव्यवस्थेत दस्तुरखुद्द राजाची ही दयनीय अवस्था तर प्रजेची गत काय? या विचारातून खऱ्या अर्थाने समतेच्या संघर्ष चळवळीचा प्रारंभ झाला. वेदनेच्या कोलाहलातून सर्जनशील कृती अंकुरल्या. आयुष्यातला योग्य वेळेचा डंख नवे पंख देतो, हेच खरं. 

         तळे, विहिरींवर घोडा, गाढव मांजर, डुक्कर, कुत्र्यांनी पाणी पिलेलं मान्य पण ठराविक माणसांनी पाणी पिलेलं वर्ज्य समजलं जाण्याच्या काळात जाती-धर्माची प्रत्येक माणसं एकत्र घेऊन शिक्षणाने माणूस बनण्याचा अधिकार शाहूंनी बहाल केला. अस्पृश्यांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये ५०% आरक्षण देत शाहूराजे 'आरक्षणाचे जनक' ठरले. अर्धपोटी, उपेक्षित जगाच्या दारात या आरक्षणामुळे स्वप्नांचा खजिना घेऊन उदयाचा सोनेरी रथ उभा करणारे शाहू महाराज ज्यांनी स्पर्श करताच तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अहिल्यारूपी शीळेचा उद्धार झाला. युगायुगांची कुरूपता नष्ट झाली. दीनदुबळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील राहत विहिरी, तलाव, शाळा, रुग्णालये अशा सार्वजनिक आस्थापनांचा समान वापर करण्याचे आदेश त्यांनी जनतेला दिले. आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा घाट घातला. दत्तक मिळालेलं राजेपण आपल्या स्‍वकर्तृत्‍वातून सिद्ध केलं. अस्पृश्यांना सरकारी नोकरी, तलाठीसारख्या प्रतिष्ठित जागा, माहूत, पोलीस, स्वतःचे मोटार चालक म्हणून नेमले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणत रयतेने राजास मस्तकी धारण केले. जुनाट बुरसटलेल्या जातीपरंपरेने प्रत्येकाच्या डोक्यात घर केलेलं असताना कुठलातरी संस्थानिक अस्पृश्य जनतेला सरकारी नोकऱ्यांमध्ये रुजू करून घेतो. दीनपणाने 'जोहार मायबाप' असं म्हणत कालपर्यंत जे मागून भिकेतलं अन्न खात होते, ते महार व इतर अस्पृश्य रयतेकडून 'रामराम' स्वीकारू लागले. हे चित्र म्हणजे केवळ सामाजिक बदल नव्हता, ती एक सामाजिक क्रांती होती, जी शाहूराजांनी सत्यात उतरवली. १९२० साली शाहू महाराजांनी शहरातील पोलीस गेटवर सोळा महारांची नेमणूक करत कोल्हापूर म्युनिसिपालिटीच्या चेअरमनपदावर प्रथमच एका अस्पृश्याची दत्तोबा पवार यांची महाराजांच्या प्रेरणेने नेमणूक झाली. अशी अनेक उदाहरणं देता येतील.

         प्रजेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विणकाम व सूतगिरणी राजांनी सुरू केली. शिक्षणावर भर हा त्यांचा मुख्य उद्देश होता. ते स्वतः इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र यांचे गाढे अभ्यासक होते. विशिष्ट जातीचीच मुले शिकत आहेत हे लक्षात आल्यावर लिंगायत, नाभिक, शिंपी, ढोर, चांभार, मुस्लिम, जैन आणि ख्रिश्चन अशा जातीव्यवस्थेच्या जात्यात भरडल्या गेलेल्यांसाठी स्वतंत्र जातीवार वसतिगृहे, बोर्डिंग स्कूलची स्थापना,  मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण या दुर्लक्षित महाप्रकल्पाचा शिक्षणतज्ञांनी अभ्यास करून राजांचं कर्तृत्व समाजासमोर आणण्याची आज नितांत गरज आहे. स्त्री साक्षरता, देवदासी प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह मान्यता आणि बालविवाह रोखणे यांसाठी राजांनी प्रयत्न केले. ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा शाहूंवर प्रभाव होता, त्यामुळे फुलेंच्या सत्यशोधक समाजाला त्यांनी संरक्षण दिले.

        मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या संगतीतच राहील, असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते. आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण चांगल्या विचारी माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं. आणि ज्यांचे आदर्श ज्योतिबा असतील त्यांचे कर्तृत्व अन् हेतू समाजहीतच असणार, यात शंका ती कसली?

        कृषी आधुनिकीकरणासाठी किंग एडवर्ड कृषी संस्था स्थापन केली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले. कोल्हापूर ही 'गुळाची बाजारपेठ' देशभरात नावारुपास आली. दरबारातील तोफा वितळवून नांगरांचे फाळ बनवत हिंसेपासून सृजनाचा जन्म हा काव्यात्मक संदेश आपल्या कृतीतून दिला. 'राधानगरी' हे धरण छत्रपती शाहूंच्या प्रजेविषयी कल्याणाच्या दूरदृष्टीची साक्ष देते आणि कोल्हापूरला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवते. आपलं अंगण झाडताना शेजारच्या अंगणात चुकून खराटा गेला आणि तिथली वीतभर जमीन झाडली गेली तरी अस्वस्थ होऊन दिवसभर तळमळणार्‍या मनांना शाहू महाराजांचं दातृत्व जाणवायला हवं. ज्या वैभवाला दातृत्वाचे अधिष्ठान तेच खरं ऐश्वर्य. अशा ऐश्वर्यसंपन्न राजाला कित्येक मुजरे करावेत.

         कलासंस्कृतीच्या महान संरक्षक राजांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले. बालगंधर्व, संगीत सूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शाहुंनी महाराष्ट्राला दिले. शाहू महाराजांच्या आश्रयात बंधनाशिवाय व्यक्त होताना हे कलाकार त्या कलेवर हक्काने आपला ठसा उमटवत होते. पारंपारिक कला, शास्त्रीय संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या मातृभाषिक ललित कलांना सुट्टीवर पाठवून परभाषेची लाचारी त्यांनी कधीच पत्करली नाही. आपल्या नावापुढे पदव्यांची रिघ लागावी म्हणून शिक्षण न घेता समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीची ती वाटचाल ठरावी, अशा मतांचे शाहूराजे. आज कलावंत कलावंतांसाठी सुपार्‍या देतात. आपल्या हातून आविष्कार होण्याऐवजी दुसऱ्यांच्या हातून तो होऊ नये यासाठी षड्यंत्र रचतात. एक ना दोन दरिद्री माणसांच्या तऱ्हा तरी किती वर्णाव्यात?

        कुस्ती हा प्रिय खेळ शाहूंनी आपल्या कारकीर्दीत जिवापाड जपला, वृद्धिंगत केला. ते स्वतः मल्ल होते. खासबाग मैदानात नव्वद हजार प्रेक्षक बसू शकतील अशी व्यवस्था करत कुस्तीची, मल्लविद्येची पंढरी म्हणून कोल्हापुराची ओळख निर्माण केली. धनगर समाजातील देवप्पा धनगर मल्ल जबरी बलदंड. तो रुस्तुम-ए-हिंद होईल अशी खात्री राजांना होती. दुर्दैवाने कॉलऱ्यामुळे तो मृत्युशय्येवर असताना,"डॉक्टर याला वाचवाल तर त्याच्या भारंभार सोने तुम्हाला देईल!" असे डॉक्टरांना सांगणारा राजा, देवप्पाच्या मरणावर धाय मोकलून रडला. राजाचं मन किती खोल? बलदंड शक्तीचा असा भावनिक राजा पुन्हा होणे नाही. शाहीर हैदर यांच्या साताच्या पाढ्याच्या लावणीचं कौतुक करत शाहिराला हत्तीवरून फिरवत साखर वाटणारा, गुणग्राहक राजा. राजदरबारी राजाश्रय दिलेल्या आबालाल रहमान या चित्रकाराने शाहूराजांच्या निधनानंतर सर्व चित्रे पंचगंगेत जल समर्पित केली, अगदी तुकोबांच्या गाथेप्रमाणे. कारण काय तर चित्रांची पारखी, रसिक नजर गेली, चित्रांची किंमत शून्य झाली. भाऊ फक्कड या मातंग शाहिराला पहाडी आवाजाचं कौतुक करत सोन्याचं कडं बक्षीस दिलं. समाजाबद्दलच्या आपुलकीने धुंद होणाऱ्या शाहूंच्या कर्तृत्वाची गाथा वाचत तल्लीन होऊन ब्रम्हानंदी टाळी लागावी, असा हा प्रवास.

       फक्त वेदोक्त प्रकरण व आरक्षणापुरते संकुचित न ठेवता कर्तृत्वाने पराक्रम गाजवणारे, शिवरायांच्या रयतेच्या राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरवणारे, कला, शिक्षण, शेतकरी यांचा विकास करणारे, नाट्य चळवळीचा पाया रचत मराठी नाटकांचं भरघोस पीक घेणारे, शिवसंभव नाट्य सुरू असताना बाल शिवाजीच्या जन्मप्रसंगावेळी पाळण्यातल्या शिवबाला उचलून, देहभान हरपून संपूर्ण नाट्यगृहात मुजरा करणारे छत्रपती शाहू महाराज समाजासमोर आणण्याची गरज आहे. अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या स्त्रित्वावर आलेला बाका प्रसंग बुद्धिमत्ता वापरत सही सलामत सुटका करून घेतली. त्यांना नारळाच्या करवंटीवर बनवलेला एकतारा आणि दोन वाघांची पिल्लं शाहूंनी भेट दिली. वाघिणीसारख्या प्रसंगाला भिडलेल्या कलावंताला दिलेली ही अनोखी भेट जगाच्या इतिहासात अजरामर ठरणारच की.

        मानकऱ्यांना शेजारचं उठवून लाल्या आणि अरव्या या दोन पारध्यांच्या पोरांसोबत जेवणारे, जीवन व्यवहारातून जाती अंताची लढाई लढणारे राजे. आज समानतेची पुरोगामित्वाची मोठमोठी भाषणं देणारी कित्येक मंडळी पारध्यांच्या पालावर जाऊन ताटाला ताट लावून जेवतात? यावर संशोधन व्हायला हवं. आकाशातील ग्रह, तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर मेंदू आणि मनगटाचा उपयोग काय? असा सवाल करत अंधाधुंदीचं, ज्ञानबंदीचं कंबरडं शाहूराजांनी मोडलं. समतेचा, समानतेचा मुक्त उद्घोष करणारे, शुद्ध अभिजात चारित्र्याचे, ललित कलांचे साधक, शिक्षणाविषयीचा अर्थ गर्भित आशय पटवून देणारे, जिवंतपणाचा स्पर्श लाभलेले राजे खऱ्या अर्थाने 'राजर्षी' ठरले. त्यांच्या तपश्चर्येवरून लेखकाने कित्येक लेख ओवाळून टाकावेत असं त्यांचं चरित्र. भारताच्या नियतीवर रेखाटलेल्या जळजळीत लालभडक जातिभेदाच्या प्रश्नचिन्हाचं उत्तर म्हणजे शाहू महाराज.

        तिन्हीसांजेला दिवा लागला की प्रतिक्षिप्त क्रियेसारखे हात जोडले जातात, अगदी तसंच, त्याच सहजतेने यांचं कर्तृत्व पाहताना नतमस्तक व्हावेसे वाटते. श्रमिक, जातीवादात होरपळलेल्या, दिशा हरवलेल्या वाटसरुंना शिक्षणाच्या पाऊलखुणा राजांनी दाखवल्या. सगळ्यांनाच आभाळव्यापी कामं नाही करता येत. कदाचित कणभरच काम असेल एखाद्याचं पण, त्या कणातही क्षमता असतेच की विश्व धारण करण्याची.

         भीमरावांची प्रखर बुद्धिमत्ता आणि अस्पृश्यता निवारणाच्या त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होत अस्पृश्यांच्या सुधारणेसाठीच्या परिषदेत राजांनी त्यांना अध्यक्ष केले. शाहूंनी दिलेल्या २५०० रुपयांतून बाबासाहेबांनी स्वतःचे 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले. जिद्दीची घोरपड बिकट परिस्थितीतच नखं रोवते तसे, बाबासाहेब. 'सामाजिक लोकशाहीचे स्तंभ' असा शाहूंचा गौरव आंबेडकरांनी केला. ज्याने जगाला माणसातल्या माणुसकीची व्याख्या शिकवली त्यांच्या कर्तृत्वाची उंची कशी मोजता येईल? आपल्याला एखादा महावृक्ष किंवा कल्पतरू होता नाही आलं आणि क्षणभर एखादा वाटसरु आपल्या सावलीत विसावला तरी पुरेसे.

       काहींना समाजसुधारक आठवतात पण फक्त कॅलेंडरच्या वाटेत आलेल्या तारखांमुळे. दिनांक बदलला की यांचे त्या समाज सुधारकांबद्दलचे प्रेम तत्क्षणी ओसरते. मात्र काही जण स्वतःच आनंदोत्सव असतात, कृतीतून विचार पेरत जातात. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या मनाच्या कोपऱ्यात एकतरी सूर्य आपला असायला हवा, जो अखंड प्रकाशाचा वर्षाव करत राहील. चुकल्या क्षणी आपले कान पकडून दिशा दर्शवेल. राबणाऱ्या हातांचा, मायमाऊलींचा, आदिवासींचा राजा, जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारा, माणसा- माणसातला भेदभाव दूर करणारा, भटशाहीच्या मक्तेदारीला अन् मनुवादाची लक्तरे वेशीला टांगणारा, शाहूंशिवाय दुजा राजा कोणता?

       माझी प्रजा सदैव तृप्त असावी हा ध्यास आजन्म उराशी बाळगणारा दत्तकपुत्र अवघ्या राष्ट्रातील कलाकारांना दत्तक घेतो, जातीची बंधने झुगारत अस्पृश्यांना शिक्षणाचं अभय देतो, रयतेचा तारणहार होतो, हेच खरं तर किती अद्वितीय आहे. आपणही असंच भर उमेदीच्या काळात समाजोपयोगी काहीतरी पेरून ठेवावं की आयुष्याची समाधानाने सांगता व्हावी. शाहू-फुले-आंबेडकर वाचणारा वाचक कधीच दंगली घडवणार नाही, सहृदयतेच्या जाणीवेचा परिपोष होईल, समाजसुधारकांच्या विचारांसोबत भटकताना. शाहूंच्या कार्याची पारायणं करावीत तरी किती? प्रत्येक घटनेगणिक वेगवेगळा आशय गर्भित होतो. योग्य विचारांची ठिणगी योग्य वेळी मनात पडणे अन त्याचा ज्वालामुखी होणे यातून स्वप्न सत्यात साकारलं जातं. शाहू महाराजांची बलदंड शक्तीची कर्तृत्व गाथा प्रेरणेचा अखंड झरा समर्पित करते. 

        आजच्या युगात संघर्षाचं गीत गाणारा राजेंद्र भारूड, भिल्ल समाजातील पहिला आय.ए.एस. अधिकारी होतोय आणि समाज बदलाचा महायज्ञ ठरतोय. मनानं खचलेल्या, शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून त्यांना उत्तम शिक्षणाचं दान देत 'मनोबल' वाढवणारा, समाजासाठी युजवेंद्र महाजन 'दीपस्तंभ' ठरतोय. बीडमधील दीपक नागरगोजे ऊसतोडणी कामगारांच्या गोड साखरेची कडू कहाणी सांगत तमासगीर, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं प्रज्वलित करतोय. काश्मीरमध्ये  बोर्डरलेस कार्य सत्यात उतरवत ‘बसेरा ए तबस्सुम’ मध्ये कित्येक  आतंकवाद्यांच्या अनाथ पोरांवर मानवतेचे संस्कार करत अधिक कदम त्यांचा पालनकर्ता होतोय. अवघ्या महाराष्ट्रातल्या अनाथांची माय ठरलेली सिंधुताई सपकाळ, 'गतीचे गीत गात दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही', असं म्हणत अख्खा आयुष्याची 'समिधा' अन् निढळाची कमाई कुष्ठरोग्यांसाठी वाहणारे, एखाद्या स्वयंस्फूर्त ज्वालेचे दुर्लभ दर्शन असणारे बाबा आमटे. अशी कितीतरी नावं आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचे नवे मापदंड प्रस्थापित करत शाहू महाराजांचा वसा आणि वारसा आपल्या बळकट खांद्यावर लीलया पेलला आहे. क्षितिजाला भिडू पाहणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख न पाहताच मरणारे कित्येक असतील पण ती यादी एका संख्येने वाढवून आपण त्या यादीचे भागीदार होऊ नये, असे मनाशी ठाम ठरवायला हवे.

              दररोजची ठरलेली कामं आहेतच प्रत्येकाला, त्या प्रत्येक ठरलेल्या कामाचं चित्र पुन्हा त्याच त्या रेघांनी आपण अधिक गडद करतो. कधीच वाट बदलून पुस्तकांच्या दुनियेत जात नाही. केलेल्या कामाचं सिंहावलोकन करत नाही. निदान त्यांचं कार्य कर्तृत्व पाहून तरी समाजाविषयीच्या आपल्या कोरड्या जाणिवेला सह्रदयतेची पालवी येत राहावी आणि आपल्याही कर्तृत्वाचा बहर रुजत रहावा, हीच सदिच्छा! आपल्या प्रत्येकाच्या स्वार्थी अंधारात प्रकाशाचा, संवेदनेचा हा उजेड असेल तर दिवाळी असो किंवा नसो दैनिक दीपोत्सव होणारच. समतेचा विचार वाचताना, उघड्या डोळ्यांनी त्यांच्या कार्याचं विराटत्व अनुभवून, दिव्यतेने लीन झालेलं मन नेहमीच शाहु महाराज यांच्या चरणी वंदन करीत राहिल, याची काळजातून ग्वाही देत थांबतो!


लेखन

आयुब कलाम शेख

(समतेच्या विचारांची पायवाट पुस्तकातून साभार)

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...