Friday, July 29, 2022

देवकुंड धबधबा आणि महडचा वरदविनायक! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची निसर्गरम्य भटकंती

देवकुंड धबधबा आणि महडचा वरदविनायक!         

                                        

               शनिवार दिनांक २३जुलै २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता शरद काळे, रविंद्र काळे, सुमित वडघुले, प्रितम वडघुले, रवींद्र नरसाळे, अजिंक्य मांढरे, विजय माने, अप्पा रणसिंग, वैभव करपे, पंडित लांडे, गोरक्ष लांडे, संतोष लांडे, प्रदीप पाटील, बाळासाहेब लांडे, रोहन गोडसे, किरण भंडारी, अविनाश धोत्रे, अभिषेक चव्हाण, अक्षय चव्हाण, सारंग धुमाळ, गिरीष तांबे, शैलेश निकम, अक्षय दसगुडे, विश्वंभर गोडसे, अल्ताफ शेख, घारमळकर रोहिदास, कापरे विकास, अनिल गायकवाड, अभिमन्यू वडघुले आणि मी अशा २९ गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानच्या मावळ्यांना घेऊन गाडी निमगाव म्हाळुंगी मधून शिक्रापूर, पेरणे फाटा, आळंदी फाटा, चदननगर करत महडच्या दिशेने निघाली. यांमध्ये कंपनी मॅनेजर, सर्व्हिस करणारे, काॅलेजचे विद्यार्थी, उद्योजक, शिक्षक यांसोबत यंदा राजकीय व्यक्तींचाही समावेश होता.

                    सर्वजण आपापल्या स्टॉपवर नेहमीच अगदी वेळेवर उपस्थित राहतात, चंदननगर बायपासची टिम ( मी, माने सर आणि गिरीश) मात्र दहा मिनिटे उशीरा पोहोचली. गाडी एवढी चिखलात माखलेली होती की आम्हाला दिसलीच नाही, असं बालीश कारण आम्ही आयोजकांना सांगून अपराधी भावनेने गाडीत बसलो. तिथेच सर्वांचा ग्रुप फोटो झाला. यावेळी आमचे मार्गदर्शक पंकज माने सर, ड्रायव्हर सोबत रात्रभर जागून मार्ग दाखवणारे बापू आणि हास्याचा खळाळता धबधबा गणेश दादा घोरपडे ही तीन रत्नं सोबत नव्हती. त्यांची कमतरता वेळोवेळी जाणवत होती.

                   प्रत्येक महिन्यात ज्याप्रमाणे आकाश पौर्णिमेच्या पूर्णाकृती चंद्रामुळे विलोभनीय भासतं अगदी तसंच महिन्यातला एक दिवस ट्रेकचं आयोजन करून आमचं आयुष्य सुखद अनुभवांच्या चांदण्यांनी आयोजक भरून टाकतात. 

पहाटे दोनच्या सुमारास महडच्या गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर गाडी उभी राहिली. पावसाचा जोर वाढला होता. मंदिराच्या राखणदारांनी द्वार उघडत आम्हा सर्वांना यथेच्छ दर्शन घडवून दिलं. बाप्पाच्या पदस्पर्शाने पावन झालो. गाभाऱ्यातलं दर्शन घडलं. सगळ्यात भारी काळे सरांचा फोटो आला, जणू देवाशी संवाद सुरू. ग्रुपमधल्या सगळ्यांना वरदविनायकाचं दर्शन घडविणाऱ्या या माणसासाठी देवही काही क्षण स्तब्ध थांबला बहुतेक! भले सगळी माणसं सोन्यासारखी असतील, पण कॅरेटचा फरक असणारच की!रवी काळे सर म्हणजे निश्चिंत २४ कॅरेटचं शिक्कामोर्तब.


                 आमचे विजय माने सर म्हणतात, लोकं अष्टपैलू वगैरे असतातच पण अधिकचे दोन पैलू आहेत आपल्या लिडरला आणि तसंही चैतन्याचा प्रकाश देणाऱ्या या रवीच्या सानिध्यात वावरायला कुणालाही आवडेल!



                  पहाटे पाचच्या सुमारास पाचणूस गावात नाष्ट्यासाठी उतरलो. काळे सरांचे जिवलग मित्र धनराज बंडगर सरांनी इथलं सगळं नियोजन पाहिलं. मागे सुधागडवेळीही त्यांनी असेच सहकार्य केले होते. हक्काचा आरामाचा रविवार ही माणसं आपल्यासाठी वाया घालवतात अशी खंत मनाशी बोचली. काळे सरांनी अशी कितीतरी माणसं मिळवलीये, जपलीये. नाष्टा उरकून भ्रमंतीकडे मार्गस्थ झालो. भर पावसात लहानथोरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा निसर्गप्रेमींना खुणावत असतो. माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत पोहचल्यानंतर अंदाजे दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर साडेसात किमी अंतरावर स्थित देवकुंड धबधब्याचं दर्शन लाभतं.


                     इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियाचा वरदहस्त लाभल्यामुळे कमी कालावधीत भरपूर प्रसिद्ध झालेला हा देवकुंड धबधबा पाहण्याची उत्सुकता मनी दाटली होतीच, बरंच चालावं लागतं यासाठी. मागच्या पाच सहा वर्षांपूर्वी ज्यांनी देवकुंड शोधलं असे निखिल महामुणकर यांनीच आम्हाला देवकुंडपर्यंत नेलं हे आमचं भाग्यच. सुरुवातीला तीन चार ट्रेकर्स पुढच्या वर्षी दिडशे आणि आता मुंगीलाही जागा नाही इतकी गर्दी असा प्रवास या धबधब्याच्या इतिहासाचा. पाऊस असेल तर खबरदारी घेणं गरजेचं आहे. धबधबा परिसर संवर्धन, माहितीसाठी गाईड यांमुळे बरचसं सोयीस्कर झालं आहे. सोबत किंवा एकत्र आलेला संपूर्ण ग्रुप परतीच्या वाटेने संपूर्णच जायला पाहिजे अशा अनेक कडक सूचना गाईडने आम्हाला दिल्या. आयोजक काळे सर तर इतके काळजीत होते की ते रेनकोट मध्ये उभे राहून सगळ्यांवर लक्ष ठेवत होते.

पाण्याचे ओहोळ, हिरवळ, जोरदार प्रवाह स्वागतासाठी सज्ज उभे होते. झपाझप वाढणारं पाणी, पावसाची संततधार, गाईडची व्यवस्था खूप छान वाटत होतं. जिथे धोकादायक वातावरण असेल तिथे त्यांची माणसं उभी आहेत. "त्याला काय होतंय, घेऊ की रिस्क" असा कोणताही उपद्रव आमच्या ग्रुपमधील कोणीही करत नाही, यंदाही केला नाही. तशी तंबी देण्यासाठी पुढे रवी काळे सर आणि मागे बाळाभाऊ होते. तीन भले मोठे ओढे थोडक्यात नद्याच लागतात प्रवासात. दुसऱ्या, मोठ्या ओढ्यामध्ये लाकडी पुलाखालून वाहणारा भलामोठा पाण्याचा प्रवाह थरकाप उडवतो. डुलणारा लाकडी पूल भीती उत्पन्न करतो.

                 जन्नत किंवा स्वर्गाचं रुपडं कसंय कोणास ठाऊक? कोणी पाहिलंय? पण कल्पनेतील चित्र याहून निराळं नसावंच बहुतेक. दऱ्याखोऱ्यात भटकणं हेच आम्हा सह्याद्रीवेड्यांचं स्वर्गसुख. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १०० रुपये प्रवेश कर घेतला जातो. बंडगर सरांच्या ओळखीमुळे आमचे प्रतिव्यक्ती सत्तर रुपये घेतले. गाव पातळीवर छान नियोजन केलंय, टिममधली माणसं मोजतात, नंबर देतात. धबधब्यावर गर्दी होऊ नये म्हणून माणसं मापात पाठवली जातात. गावात रेस्क्यू टीम तयार केली आहे स्थानिक पोरांची. काही घडलं तर पोलिसांच्या आधी धावत येतात अशी ही सगळी पोरं. सुरक्षिततेसाठी भरपूर सुविधा आहेत. जागोजागी दोरखंड बांधलेले आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात.

        झुळझुळ वाहणारे इथले सौंदर्यसंपन्न झरे पावसामुळे बऱ्याचदा रौद्ररूप धारण करतात. याबाबत बरीच खबरदारी घेण्याची आवश्यकता भासते. निसर्गाची ही बहरलेली रुपं डोळ्यांमध्ये टिपण्याची तुलना कशाशी करता येईल? खूप फोटो काढले यावेळी. काळे सर चिडलेच. अंतर कापणंही महत्त्वाचंच होतं. जाताना मोठमोठाले भरपूर धबधबे तिथे होते. नजरेतला प्रत्येक धबधबा देवकुंडच असेल असं वाटायचं. चालणं सुरूच होतं. सगळीकडे हिरवळ, एकमेकांना हात देत डोळ्यांनी निसर्ग पाहत फिरणं सुरू होतं.

        आयुष्यातले आपले हक्काचे क्षण प्रवाहशून्य होत त्यावर उदास शेवाळ साठतंय हे लक्षात येण्याइतकं आपण सावध रहायला हवं. थोडंही उदास झालं मन की लगेच निसर्ग गाठायचा.

          काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समदं ओक्के म्हणत ब्लाॅगसाठी लागतील म्हणून आवर्जून वैभव करपेंनी प्रत्येक ठिकाणचे फोटो घेतले. काय मोबाईल क्वालिटी, एकदम दर्जा! पैशाचं वैभव होत नाही, करपेंच्या वैभवसारखी माणसं सोबत असली की आपण जहागीरदार समजायचं स्वतःला... जवळ पोहोचलो होतो. वनराज सिंहाने गर्जना करत भोवतालच्या परिसरावर स्वतःचं अस्तित्व, अधिराज्य सांगावं अगदी तसंच या धबधब्याचा आवाज आपलं कार्यक्षेत्र दर्शवत होता. जंगलातल्या त्या नीरव शांततेला भग्न करत होता. दिसला एकदाचा देवकुंड.



           कित्येक नजराणे मिरवावेत असं चित्र, डोळे तृप्त! काय नितळ पाणी, अंतर्बाह्य पारदर्शक. प्रत्यक्ष धबधबा पाहताना आपल्या डोळ्यासमोरून निसर्ग चमत्काराची कित्येक दारं सताड उघडी व्हावीत असं दृश्य. त्या नजाऱ्यापुढं साऱ्यांची दोन-तीन तासांची पायपीट अक्षरशः लुप्त झाली. खूप गर्दी होती. वाट काढत पाण्यात उतरलो. भर दुपारची वेळ असतानाही गारव्याचा अमृत महोत्सव शरीराशी खेळत होता.

गिरीचे मस्तकी गंगा,

तेथुनि चालली बळे..

धबाबा लोटती धारा,

धबाबा तोय आदळे!

कोण्या निसर्गप्रेमी कवीने केलेलं धबधब्याचं वर्णन येथे अगदी सार्थ ठरतं.

बालकवींची निर्झरास ही कविता यावेळी आठवते,

गिरीशिखरे वनमालाही

कड्यावरूनि घेऊन उड्या

घे लोळण खडकावरती

जा हळूहळू वळसे घेत..

दोन दऱ्यांमधून वाहणारा विराट धबधबा पाऊस कमी झाल्यावर किती भारी वाटत असेल? पाण्याचा पडणारा प्रवाह अन खडकावर पडणारा प्रवाह यातलं अंतर जोखायला पुन्हा एकदा यायला हवं, अशी अवस्था. निसर्ग पाहून कोणाचं पोट भरलंय? तो तर वेड्यांचा उद्योग म्हणणाऱ्यांनो फेसबुक, व्हाट्सअपवर ॲनिमेटेड फोटो शेअर करण्यापेक्षा स्वतः सौंदर्य अनुभवा. अर्ध मेला माणूसही जिवंत असतोच की, जगणं महत्त्वाचं! आयुष्य फुलायलाही विरामाच्या जागा हव्या असतात. असा विराम निदान महिन्यात एक दिवस तरी असायलाच हवा. गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानसोबत अनुभवलेल्या या क्षणांची कित्येक पारायणं करावीत?

               गर्दीमुळे देवकुंडजवळ मनसोक्त भिजता येईना. काळे सरांची नजर चुकवत थोडं माघारी फिरून दुसऱ्याच धबधब्यापाशी वैभव, संतोष, गिरीश, किरण आणि मी पोहोचलो. काय मस्त जागा होती ही. भिजलो मग मनसोक्त. कानशीलं शेकत होती अक्षरशः वरून पडणाऱ्या पाण्याच्या धारेने, पण मागे हटलो नाही. ओरडून ओरडून अक्षरशः घसा बसला. सुख खरंच वेड्यासारखं बरसतं, आखीव रेखीव नाही. सगळीकडे सुखच सुख होतं, कॅमेऱ्यात कैद करता न येणारं. फोटो काढताच येईनात कारण मोबाईल वडघुले कडे दिले होते प्लास्टीक पिशवीत आणि ओळखीचा चेहराही नजरेस पडेना. एका साऊथ इंडियन पोराला रिक्वेस्ट केली फोटोसाठी. त्याला वैभवचा नंबर दिला. (त्याने सुद्धा माणुसकी दाखवत दुसऱ्याच दिवशी फोटो पाठवले.)



                  तेवढ्यात अप्पा आणि त्याचे दोन मित्र मोठं दांडकं घेऊन आले. अन् पोलिसी खाक्या दाखवत सगळी गर्दी पळवली. हसून हसून पुरेवाट झाली. अख्खा धबधबा फक्त आमचाच... त्या धबधब्यात अंघोळ करून शेकडो गंगास्नानाचं पुण्य आम्ही पदरी पाडून घेतलं. बरसणाऱ्या सरी, कोसळणारे धबधबे, भिजण्यासाठीच असतात. उद्याच्या सर्दीची चिंता कित्येकांना असते. धबधब्यावर रेनकोट, छत्र्या घेऊन येणारी माणसं पाहून जरा गंमतच वाटली. पावसातही कोरडं राहणाऱ्यांची कीव येते खरं तर.

             गड किल्ल्यावरून सूर्यास्त, सूर्योदय पाहताना दुपारी जेवायला काय असेल? असा प्रश्न पडतो बऱ्याच जणांना. आयुष्यातले काही क्षण वेड लावून मनासारखे जगण्याचे असतात. आतली धुंदी जपत! परतीच्या वाटेला लागलो. एखाद्या काश्मिरी गालिच्याला जुन्या फाटक्या वस्त्राचं ठिगळ लावावं अगदी तशाच प्रकारे काही ठिकाणी प्लास्टीक बाटल्यांची रास दिसली. वाईट वाटलं. गडकिल्ल्यांवर फिरताना आमचा ग्रुप प्लास्टीकचा तुकडाही खाली पडू देत नाही, तोच नियम आम्ही इथेही कटाक्षाने पाळला. निसर्गाची किमया अन् माणसाची वागणूक किती भिन्न?

               ट्रेक दरम्यान ग्रुपमधली बरीचशी पोरं गरज पडेल त्याला हात देत सावरत होती. ऐतिहासिक ठिकाण नसल्यामुळे इथे बंधनं थोडी शिथिल होती. आमचा रणसिंग अप्पा सिंगल पोरगा, फोटोग्राफीचा जबरदस्त नाद, जिम करणारा, हेल्थ कॉन्शियस! ट्रेक दरम्यान अवघड वळणाच्या निसरड्या वाटेवर एक मुलगी अप्पाला म्हणाली,"excuse me" अप्पा पुरता घायाळ झाला असावा बहुतेक. पण क्षणाचाही विलंब न करता तिचे पुढचे शब्द कानी पडले,"Side please". अन् भर पावसात अपेक्षांवर पाणी पडलं... गाडी पुण्यात पोहोचेपर्यंत ही दुःखद घटना सांगून प्रत्येक जण अप्पाच्या जखमेवर मीठ चोळायला विसरला नाही. तेवढ्यात सुखाची बाब म्हणजे दादा यंदा ट्रेकला नव्हते. नाही तर अवघड होतं. आज धबधबा पहायला जाताना आम्हा सर्वांना हास्य वर्षावात चिंब भिजवणारा विनोदांचा खळाळता निर्झर दादा आजारी पडल्यामुळे सोबत नव्हता, ही एवढ्या चांगल्या सफरीतली दुखरी बाजू. दिलखुलास हसत नाहीत कित्येक माणसं. समोरच्या माणसांशी बोलत नाहीत, ती औषधांच्या बाटल्यांशी बोलतात नंतर. भरपूर हसत एकमेकांशी चेष्टा मस्करी करत ट्रेक पूर्ण होतो. वेगवेगळ्या वयोगटातली माणसं एकत्र येतात, मौज करतात. कोणालाही चेष्टेचा राग येत नाही म्हणा किंवा कोणीही चेष्टेची सीमा ओलांडत नाही म्हणा. हास्य क्लबमुळे शरीराच्या शिरांचा व्यायाम होतो पण मनमुराद हसणं याहून सुंदर काय? डॉक्टरांच्या गोळ्यांपेक्षा मित्रांच्या टोळ्या जास्त सुख देतात, हेच खरं...


            पुन्हा पाटणूस गावी परत येऊन व्हेज नॉनव्हेज वर सर्वांनी ताव मारला. सरत नव्हतं एवढं चिकन खाल्लं. बाजरीच्या भाकरी,भात फक्कड बेत. चालून थकलेले जीव पुन्हा गाडीत येऊन शांत झोपले, साखरेच्या पाकात गुलाबजाम लोळत पडावेत अगदी तसेच. सुख म्हणजे वेगळं काय असेल? सुखाच्या व्याख्या वेळोवेळी बदलतात, मघाशी भिजणं, आता लोळणं त्यानंतर लवकर घरी पोहोचणं अशा विविध गात्रांतून सुख पाझरतं!

             मित्रांनो, उमेदीच्या काळात आपण काय पेरतो हे महत्त्वाचं. कारण पीक येतं तेव्हा आयुष्य संपलेलं असतं बहुतेकदा. म्हणून सौख्याचे क्षण जगायचे स्वतःसाठी. पायाला जखम असतानाही आनंद घेणारे आमचे संतोष लांडे म्हणतात, घराच्या खिडकीतून पावसाची धमाल बघण्यापेक्षा ती अनुभवण्यासाठी सह्याद्रीतल्या सर्वांगसुंदर अशा देवकुंड धबधब्यावर यायलाच हवं. संपूर्ण ट्रेकचा खर्च फक्त ८५०/- रुपये इतकाच. बाळाभाऊंनी बिर्याणी केली असती तर खर्चाला आणखी कात्री लागली असती. आयोजक संपूर्ण खर्चाचा तपशील देतात. रुपयाही एक्स्ट्रा नसतो. कणभरही स्वार्थ नाही अशा कार्याशी स्वतःला जोडणारी ही माणसं किती भारी!

          तुटलेला तारा हतबलपणे बघत रहावा छतावरून अशी अवस्था आपली होऊ नये, चांदण्यांच्या प्रकाशात मनसोक्तपणे फिरा. तेहतीसावा ट्रेक पूर्ण करत बहरलेल्या या ग्रुपला अनेक भटकंतीची पालवी फुटत राहो. अनुभवांनी आपली जिंदगी आणखी समृद्ध होत राहो, नवनवीन माणसं या ग्रुपमध्ये ओतप्रोत भरत राहो याच शुभेच्छा!

तोपर्यंत जय शिवराय!


पुढील सफर भोरगिरी ते भिमाशंकर

दिनांक २१ ऑगस्ट २०२२

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.


आयोजक 

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

Sunday, July 3, 2022

राजमाची किल्ला, कार्ले लेणी आणि एकवीरा दर्शन गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी सोबतची अनुभवगाथा

राजमाची किल्ला, कार्ले लेणी आणि एकवीरा दर्शन

    
      

    शनिवार दिनांक २५ जून २०२२ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान चे मावळे घेऊन गाडी निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, कोरेगाव भीमा, वाघोली बायपास, शिवाजीनगर, नाशिक फाटा मार्गे थेट राजमाची किल्ल्याच्या दिशेने निघाली. पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी गाडी ग्रुपचे मावळे गोळा करत पुढे मार्गस्थ होते, नेहमीच. मात्र कोणीही उशीर करत नाही. सगळे आपापल्या स्टॉपवर अगदी वेळेवर उपस्थित राहतात. दुर्गभ्रमंती आणि शिवबाचा जाज्वल्य इतिहास मनामनात जागवणारी अशी वेड असलेली माणसं भेटणं महत्त्वाचं, बाकी अतिशहाणे तर येता जाता आडवे येतातच की..

                             पंकज माने, शरद काळे, दादा घोरपडे, रविंद्र काळे(सर), वैभव करपे, संतोष लांडे, सोमनाथ चव्हाण, धीरज चव्हाण, गिरीश तांबे, अजिंक्य मांढरे, चंद्रकांत आहेर, विजय माने, भरत साकोरे, लहानू सप्रे, अनिल गायकवाड, प्रदीप वडघुले, ऋषिराज करपे, शिवाजी चव्हाण, सह्याद्री कन्या प्राची वाखारे, रविंद्र काळे, नितीन शिंदे, वैभव नरवडे, शेखर बोटकर, कानिफनाथ ढेरंगे, योगेश थोरात आणि मी गाडीत बसलो. बसलो म्हणजे थोड्या गप्पा मारून डोळे मिटले म्हणा की!  वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या ठिकाणची, वेगवेगळ्या वयाची मंडळी शिवरायांच्या विचारांचा जागर करण्याच्या अन् गडभ्रमंतीच्या उदात्त हेतूने एकत्र येतात, हे या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य. सुट्टीचा दिवस तासनतास मोबाईलवर बोटं फिरवत वाया घालवणारे कैक असतील, जे मुहूर्त शोधतात काहीतरी वेगळं करण्यासाठी. पण भावांनो आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठा मुहूर्त कोणता?

                             परगावी नोकरी करणाऱ्या मुलामुलीने आपल्या आईबापाला न चुकता प्रत्येक महिन्याकाठी पैसे बॅंक खात्यात पाठवावेत अगदी तसंच आयोजक रवी काळे सर प्रत्येक महिन्यात आमच्या आयुष्याच्या खात्यात सुखाचे क्षण जमा करत ट्रेकचे आयोजन करतात, अगदी सूत्रबद्ध पद्धतीने! काळे सरांनी सर्वांना मोकळे डबे आणायला सांगितले होते याचे कारण यावेळी जेवणाची सोय थोडी वेगळ्या पद्धतीची होती. प्रवासास सुरुवात करण्याच्या काही वेळ आधीच निमगाव म्हाळुंगी गावातच आमच्या बाळाभाऊंनी आम्हा सर्वांसाठी व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा घाट घातला होता. ग्रुपमधील प्रत्येक भुकेला मावळा या भोजनाचा असा आस्वाद घेतो की घासागणिक आचाऱ्याचा सदैव सन्मान होतो. प्रत्येकाच्या मुखी केवळ एवढंच उमटतं, अन्नदाता सुखी भव!

                             ड्रायव्हरसोबत बापू असेल तर बाकी सगळ्यांनी बिनधास्त झोपायचं, याची १००% हमी असते. मोबाईलवर गाणी वाजवत ड्रायव्हरला जागं ठेवणं आणि मार्गदर्शन करणं हे जबाबदारीचं काम बापूचं. बाकी सगळे थांबा आला की थांबले याच कामी. गाडीचा अंधाऱ्या रात्री जंगलातून प्रवास सुरू होता. मार्ग बराच खडतर. पहाटे चार वाजता गाडी फसल्याचा फील. झोपेच्या तंद्रीतून सावध होत सगळे उतरलो. चिखलात गाडी रुतली होती. येथून पुढे चालत जायचं ठरलं, अन्यथा आम्ही पायथ्यापर्यंत गाडीतूनच जाणार होतो. डब्यात गरमागरम बिर्याणी भरून आम्ही सगळे निघालो. तासभर चालल्यावर उजाडलं होतं.

शिंपीत केशर हळू उघडला पूर्वेने डोळा,

पांढऱ्या धुक्यासह, अवकाशाचा नयनरम्य सोहळा!

असंच काहीसं दृश्य समोर स्वागतासाठी उभं होतं. किल्ला अगदी दृष्टिक्षेपात. पण अंतर जास्त होतं कारण वळसा घालून जाणारी वाट. चित्रकार असतो तर या सह्याद्रीचं सर्वांगसुंदर रुपडं आपल्या कुंचल्यातून इंद्रधनुष्यासारखं प्रतिबिंबित करण्याचा यत्न केला असता. पण संधी न दवडता मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते मनोहारी दृश्य अचूक टिपण्याचा मोह पुरा केला. फोटोसेशनला इथूनच सुरुवात झाली. लोणावळ्यातून कुणेगाव, फणसराई मार्गे गडावर मोठी चारचाकी किंवा दुचाकी गाडीने उधेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते. हा मार्ग कच्च्या मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे. तसेच ओढ्यांवर पुलही बांधण्यात आलेले आहेत.

                      महाराष्ट्रभूमीत पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. ८३३ मीटर उंचीचा मात्र अंतर दोन तीन तास असणारा, गिरिदुर्ग प्रकारातील सोप्या चढाईची श्रेणी असणारा सुस्थितीतला हा किल्ला. शिवबाची जन्मभूमी, कर्मभूमी असणाऱ्या, गडकोटाचं ऐश्वर्य लाभलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, शिवबाच्या राज्यात भटकंतीसाठी एवढंच कारण पुरेसं असावं असं मला वाटतं. लोणावळ्याच्या वायव्येस १५ कि.मी अंतरावरचा राजमाची. कल्याण, नालासोपारा या प्राचीन काळातील मोठ्या व्यापारी बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसाच बोरघाट. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी जकातवसूलीसाठीचा सर्वांत प्रमुख किल्ला राजमाची. करवंद, जांभळं, आंब्याची अगणित झाडं हे या क्षेत्राचं वैभव.

                         गणेश घोरपडे (दादा) म्हणजे एक चालतंबोलतं मनोरंजन केंद्र. दादाचा सहवास लाभावा म्हणून आम्ही सगळे दादाच्या पुढेमागेच रेंगाळत असतो. हसत खिदळत भलंमोठं अंतर सहज पार करता येतं, असा हा विनोदी जादुगार. दादाकडे पाहताना वाटतं, मनापासून खळखळून हसणाऱ्या चेहऱ्याला फक्त सौंदर्य असतं, वय नाही. या ग्रुपच्या माध्यमातून कितीतरी जिवलग मित्र लाभले. महिन्यांत एकदाच भेटतो आम्ही, पण जणू काही शेजारीच राहतो अशी भावना उत्पन्न होते.

सह्याद्रीची अभिलाषा दडून आहे

तुझ्या माझ्या काळजाशी,

घेऊ वाटून थोडीशी

जाऊ भटकंतीच्या देशी.

तुला तुझं सौख्य मिळो

मला माझंही मिळावं,

मैत्रीचं जीणं व्हावं

सूर जगण्या मिळावं!

                         गडाच्या पायथ्याशी उधेवाडीत पोहोचलो. ही २०,२२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी. वाडीलगतच मारुतीचं मंदिर आहे. इथं तीन जणांचा कर्नाटकी ग्रुप भेटला. सोबत त्यांचा baby speak काळ्या रंगाचा विदेशी कुत्रा. आज दिवसभर या बिचाऱ्यावरून आणि त्यांच्या मालकांवरून विनोदांची बरसात होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ दादाने स्वतः बहुमताने मंजूर केली.

                       किल्ल्याला दोन बालेकिल्ले. दोन्ही स्वतंत्र किल्लेच भासतात. श्रीवर्धन व मनरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत काळ्या कातळाचं भैरवनाथाचं मंदिर. मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मुर्त्या. इथे सगळे थांबलो. नव्याजुन्यांची ओळख परेड झाली. संतोष, कानिफनाथ, योगेश, नितीन बरेच नवीन मित्र मिळाले. सगळ्यांशी गप्पा मारताना समजलं वरवर सगळं शांत वाटत असलं तरी प्रत्येकाच्या मनात अनुभवांचा एकेक महाभारतासारखा ग्रंथ दडलेला आहे.

शोधूनी स्वर्ग धरतीवरी

भटकतो आम्ही भटक्यापरी,

छंद भ्रमंती आणि धुंद शिवभक्ती

जीव ओवाळतो सह्याद्रीवरी!

                   अशी आमची गत. मंदिरा समोरून श्रीवर्धनगडावर तर मंदिरामागून मनरंजनगडावर वाट जाते. आधी श्रीवर्धनाची वाट निवडली. पायऱ्यांनी सज्ज वाट. किल्ला बऱ्याच प्रमाणात जपल्याची चिन्हे पावलागणिक जाणवत होती. दोन्ही बालेकिल्ल्यांपैकी सर्वांत उंच श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकं दिसली. माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेष आहेत. गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदीचे चिलखती बुरुज आहेत. इथे थांबून डब्यातली बिर्याणी फस्त केली.

काय चव, काय लज्जत, काय मेजवानी सगळं कसं एकदम ओक्के!

                  आयटीसीच्या मित्रांनी आणलेली बिस्किटं खाल्ली. तेवढ्यात Baby speak पुन्हा आला पण आधीच थांबलेल्या गावरान पांढऱ्या कुत्र्याने साधं एक हाडदेखील त्याला मिळू दिलं नाही. पळवून लावलं. याचा रविवार मांसाहाराने साजरा झाला. वैभव नरवडे या मित्राने कॅमेऱ्यातून आम्हा सर्वांचे एकसे बढकर एक फोटो टिपले. खतरनाक फोटोग्राफी आहे भावाची. शिवाय दुसऱ्याचे एवढे फोटो काढणारं काळीजही मोठंच!

डोळे सर्वांना असतात, नजर कमवावी लागते.

मेंदू सर्वांना असतो दृष्टिकोन महत्त्वाचा!

डोळ्यापासून नजरेपर्यंतचं अंतर

आणि मेंदूपासून दृष्टीकोनापर्यंतचा प्रवास जिंकला की सगळं मिळवलं, हेच खरं.

                       या ट्रेकला असंख्य फोटो काढले, कित्येक व्हिडिओ बनवले. कारण आज कुठेही पोहोचण्याची घाई नव्हती, काहीतरी उरकून टाकण्याची वखवख नव्हती. आयोजकांनी तशी सूटच दिली होती.

हिरवळीने माखलेला निसर्ग डोळ्यात सामावूच नये,

रंगत चाललेली ही मैफल संपूच नये, अशी मनीषा उरात.

                                    भरभरून सौंदर्य देणारा, फुलणारा, बागडणारा निसर्ग. कॅमेरा सुद्धा असमर्थ ठरावा, अमर्यादीतता टिपायला असं देखणेपण. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतात. लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं. ही सगळी माहिती मार्गदर्शक पंकज माने सरांनी श्रीवर्धन बोलेकिल्ल्यावर आम्हाला सांगितली, किल्लेही दाखवले. या अभ्यासू माणसाचा साधा उद्गार सुद्धा मला वेदवाक्यासारखा भासतो. हुबेहूब आकाशवाणी झाल्यासारखा. गडकिल्ले भ्रमंतीतला बाप माणूस. आम्हा सर्वांसाठी आदराचं स्थान.

                                  राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौद्ध लेणी आहेत, कोंढाणे लेणी. सातवाहनकालाच्या सुरुवातीला खोदलेल्या या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी 'कोकणचा दरवाजा' संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारीनंतर त्याचवर्षी शिवरायांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले, असा इतिहास आहे.

                                  गड पाहून उतरायला सुरुवात केली, उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या मनरंजनची वाट अर्ध्या तासाची, सोपी आहे. मनरंजनच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू, एक मोठा तलाव व काही इमारतींचे अवशेष आहेत. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज तटात आहेत. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाक, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो. मात्र आम्हाला आता पायथ्याचा उदयसागर तलाव जलक्रीडेसाठी खुणावत होता. म्हणून खाली उतरलो.

                                तलावाचे पाणी पोहण्यास उत्तम नसल्याचे स्थानिकांनी सांगितल्यामुळे पोहणे रद्द झाले. तलावाच्या पश्चिम बाजूला काळ्याभोर पाषाणातलं पुरातन शिवमंदिर आहे, हेमाडपंती बांधणीचं. मंदिराच्या मागून एक नैसर्गिक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. हे पाहणं हा एक नयनरम्य सोहळा होता. गिरी भ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ.

                               उगवता अन् मावळता सूर्य, रानफुलांचा बहर, रानमेव्यांची चव सगळं काही जिवंत,अगदी वास्तव. पुढच्या ट्रेक पर्यंत या पाऊलखुणा स्मृतीपटलावर अशाच चिरतरुण राहत रेंगाळत राहतात. रवी काळे सरांनी समविचारी माणसांचा, भटक्यांचा हा गोतावळा उभा केलाय. सुख देणाऱ्या या मार्गांचा शोध थांबता कामा नये, हीच अपेक्षा. फेसबुक, व्हाट्सअप सुरू केल्यावर किती आदळतं आपल्यावर पण ही भटकंतीतून मिळणारी शांतता सुखकारक वाटते, सदैव. गड उतरणीला, पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. करवंदाच्या जाळीतून बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पोटभर रानमेवा फस्त करूनही मन भरत नव्हतं. यावेळी बापूने आपल्या पोरांसाठी करवंदं गोळा केली. सगळे गाडीपाशी पोहोचलो. काळे सर आणि वैभव करपे यांनी चिखलात रुतलेली गाडी रुळावर आणली होती. माघारी जाताना रात्री खरंच या रस्त्यावरून आपण आलो? याचं आश्चर्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अंधाराच्या आधारानं ड्रायव्हरने रात्री ही कमालच करून दाखवली होती. हळूहळू निसरड्या वाटेवरून गाडी चांगल्या रस्त्यावर आली. जिवात जीव आला. आता एकवीरेकडे निघायचं होतं. पुढे थोडं अंतर पार करत राहिलेल्या बिर्याणीवर‌ ताव मारला.

                         भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांत अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची 'रेणुका' या नावाने देखील उपासना केली जाते. लोणावळ्याजवळ प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाची ही देवता. या मंदिरामध्ये बकरी, कोंबडी पशुबळी देण्याचा रिवाज आहे. डोंगरावर स्थित मंदिरावर जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. तिथे गेल्यावर समजले २५ रुपयांत कार्ले लेणी पाहता येतील. मज्जाच की मग.

                 लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावरील कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफांचं सौंदर्य आरस्पानी आहे. स्थापत्य शिल्पांचा नजारा सुंदर आहे. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. अजिंठ्याच्या लेण्यांची हुबेहूब प्रतिकृती वाटते. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात सम्राट अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे, ४५ फूट उंचीचा. त्यावर चार सिंहाची आकृती कोरलेली. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथुन शिल्पाच्या जोडय़ा, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट आहेत. लेण्याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे, गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. पाषाणातलं सौंदर्य छिन्नी हातोडीच्या साह्याने जगासमोर आणणारे कलाकार आणि त्यांची सुरेख कलाकृती पाहून आणि स्पर्श करत धन्य झालो.

मित्रांनो लक्षात ठेवा,

मरता कधीही येतं, जगता आलं पाहिजे.

आपण एकदाच जन्मतो, अगदी चूक.

आपण एकदाच मरतो, दररोज आपला नवा जन्म होतो.

वेळ आहे तर त्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवं.

फिरायला हवं, नाविन्यपूर्ण पहायला हवं.

शब्दप्रभू अरुणा ढेरे म्हणतात,

गडद अंधारात मी डोळे संथ उघडले

आणि आयुष्याचा ग्रंथ वाचायला हे दोनच दिवे मला पुरले.

डोळे तृप्त व्हावेत एवढं पहायला हवं.

चहूबाजूंनी सौंदर्याचा अविष्कार करणारं जग कवेत घेण्याची उर्मी कमी होऊ नये. पाय स्थिर नाहीत एवढा सध्या जगण्याला वेग आलाय. नुसती धावाधाव असतानाही प्रत्येक महिन्याकाठी आमचे मावळे निसर्गरम्य भटकंतीसाठी वेळ काढतात हे सगळ्यात महत्त्वाचं..

असावं एखादं तरी असं मुक्कामाचं ठिकाण,

जिथं थोडा विसावा घेत येईल, ते शोधायला हवं.

दाराशी गोजिरं बाळ रडत असावं तसं अनौरस सुख अनेकदा येतं आपल्या आयुष्यात. ते ओळखण्याची संधी मात्र दवडता कामा नये. सहज उचलावं आवेगाने, समाधानाच्या मोहमुठीत अडकलेलं आपलं बोट सुटू नये यासाठीच अट्टाहास करावा, कायम, असं वाटतं. अवघ्या आठशे रुपयांमध्ये ओंजळभरून वाहील इतका समृद्ध अनुभव घेऊन संध्याकाळी नऊच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचलो.

भेटू पुन्हा नव्या गडकोटांच्या क्षितीजावरती...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील ट्रेक नाशिक जिल्हा,

२४ जुलै २०२२ किल्ले ब्रह्मगिरी, दुर्गभांडार, गोदावरी नदी उगम स्थान असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर (कुंभमेळा ठिकाण, साधू संतांची भूमी)

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.


आयोजक 

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

90964 65675


मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375


शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...