Tuesday, January 11, 2022

थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर दुर्गभ्रमंती गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 




थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर


                        शनिवारी दिनांक ८ जानेवारी २०२२ ला रात्री अकरा वाजता गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीमधून गाडीने भीमाशंकरच्या मार्गाने प्रवास सुरू केला. पुण्यातून काही मित्र सोबत घेऊन रविंद्र काळे(सर), पंकज माने, शरद काळे, माऊली, विजय माने, आयुब शेख, रवी काळे, भरत साकोरे, विकास भागवत, राहुल पोतदार, युवराज शिंदे, रोहन शिवले, अभिजीत चव्हाण, योगेश वाघदरे, काकासाहेब ढेरंगे, गिरीश तांबे, दादा घोरपडे, अजिंक्य मांढरे, प्रितम वडघुले, सुमित वडघुले, शुभम डमरे, अक्षय विधाटे, गणेश वडघुले, शुभम चव्हाण, वेदांत देशमुख, अर्णव शिंदे, सुखदेव रणसिंग, वैभव चव्हाण, अनिरुद्ध मांढरे, शैलेश निकम, महेश ढोकले, शुभम भंडारे आणि सोमनाथ चव्हाण तब्बल चौतीस गडकिल्ले प्रेमी वेगवेगळ्या क्षेत्रातील शिवरायांचे मावळे दुर्गभ्रमंतीसाठी सज्ज झाले. या मावळ्यांमध्ये विशेष म्हणजे अवघ्या तेरा वर्षांचा अर्णव, काही शाळा,काॅलेजचे विद्यार्थी, काही शिक्षक, आयटीसी मधील मित्र, डॉक्टर, कंपनीतील वेगवेगळ्या पोस्टवरील मित्र, शेतकरी बंधू यांचा समावेश होता. दुर्गभ्रमंती हा एकच दुवा सर्वांमध्ये समान होता. विकेंडसाठी मनोरंजनाच्या असंख्य वाटा असतानाही गडकोटांची पायवाट धरणारी ही पिढी जगण्याचं, जन्माचं सार्थक करणार, हे नक्की.

                      गाडी व्यवस्थितपणे भीमाशंकरच्या मार्गी लागली. भीमाशंकरजवळ येईपर्यंत बरेच जण झोपा काढत होते. बाप्पू, काळे सर आणि काही मित्र ड्रायव्हर सोबत जागे होते. पहाटे चारची वेळ. धुक्याची दाट भिंतच जणू रस्त्यावर वाट रोखत उभी होती. तेवढ्यात गाडीचे एक चाक खड्डयात अडकले. गाडी एका बाजूला कलंडल्याचा फील. झोपेतले सर्वजण दचकून उठले. जणू गाडी दरीतच फसली आहे असा विश्वास. सगळेच घाबरले. उतरून पाहतो तर समोर सिमेंटचा रस्ता आणि एका बाजूचे चाक सिमेंटच्या रस्त्याच्या खाली सरकले होते. सर्वांनी मोठमोठाले दगड गोळा करत चाकाखाली लावून गाडी ड्रायव्हरने अलगदपणे वर घेतली. जीव भांड्यात पडला. साडेचार वाजता भीमाशंकरच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. पावसाची भूरभूर सुरू होती. आभाळ कधीही सर्जनशील किंवा बाळंत होईल अशी परिस्थिती.

                  गाडीमध्ये गॅस सिलेंडर, शेगडी, मोठमोठाली पातेली, चिकन, दूध, साखर आणि इतर वाणसामान भरपूर होतं. यंदा नियोजन थोडसं वेगळं होतं. प्रत्येक वेळी बाहेर जेवण करताना आयोजकांच्या लक्षात आले की बऱ्याच पोरांना चिकन खूप कमी मिळते. म्हणून यंदा ही वेगळी शक्कल. आपणच भरपूर जेवण बनवायचं आणि मनसोक्त हादडायचं. गोष्टी सगळ्या त्याच असतात. क्रम तोच, व्यवहार तोच. पण दृष्टी निराळी असली की लज्जत वाढते. साहित्य गाडीतून खाली घेत सर्व प्रथम चहा तयार झाला. फक्कड चहा आणि बिस्कीट यांचा नाष्टा थंडगार गारठ्यातही ऊब देऊन गेला. बाळाभाऊंनी सर्व मित्रांच्या सहाय्याने स्वयंपाकाला सुरुवात केली. पहाटे साडेचार वाजता चिकन बिर्याणी शिजवायला सुरुवात. कारण पूर्ण प्रवास करून येण्यासाठी उशीर लागणार होता. आणि सर्वांना भुका लागलेल्या असतील त्यावेळी स्वयंपाकासाठी वेळ देणे योग्य ठरणार नव्हते. चिकन बिर्याणी ची सर्व तयारी म्हणजे कांदा, टोमॅटो, तांदूळ, मसाला, सर्व काही आयोजकांनी व्यवस्थितपणे नियोजित केलेली होती. तासाभरात बिर्याणी शिजून ओके झाली.

               सहा वाजता रामाच्या पाराला शिवशंभूचं नाव घेत पंकज माने सरांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गभ्रमंतीच्या वारीला आम्ही सुरुवात केली. आयोजकांनी सर्वांना नाष्ट्यासाठी भेळ, बिस्कीट व लिंबू सरबतसाठी लिंबूंचे वाटप केले. साखरपाणी प्रत्येकाने आणले होते. आदल्या दिवशी तसे नियोजन ठरलेच होते. गारठा भरपूर होता पण चालताना शरीर गरम होते म्हणून पंकज सरांच्या सांगण्यावरून कोणीही स्वेटर किंवा जर्किन सोबत घेतले नाही. ३०२ ट्रेक पूर्ण करणारा दुर्गभ्रमंतीतला 'बाप माणूस' आमच्या सोबतीला आहे हे आमचं नशीब! हे ट्रेकिंग थोडेसे वेगळे होते. प्रत्येक गड चढून उतरायचे असतात. इथं मात्र भीमाशंकर हे उंचावर असणारे ठिकाण असल्याने पदरगडासाठी जाताना भीमाशंकर पासून दोन तास खाली उतरून पुन्हा पदर गड चढण्याची कसरत करावी लागणार होती आणि पदरगड उतरून पुन्हा भीमाशंकरच्या ठिकाणी दोन-चार तासाची चढण. जोरदार शिवगर्जना देत अंधारातून मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात वाट उजळत सगळे निघाले. तासाभरात उजाडले. समोर पांढऱ्याशुभ्र धुक्याची 'मलई' संपूर्ण परिसरावर 'साय' धरून तरंगत होती.  स्वप्नामागे कुत्रेघाईने धावताना थकलेले आमचे जीव इथे निसर्गाचा, पानाफुलांचा आनंद घेत जगण्याशी नाळ जोडत होते. शेवटी मातीच होते सर्वांची पण जगण्याचं सोनं करत होते. छंद जोपासले की मनाचे रंग बदलायला आणि आयुष्यात दंग व्हायला वेळ लागत नाही, हेच खरं.

           डोंगराच्या कडेकडेने उतरत घनदाट जंगलातून वाट काढत तीन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही पदरगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. निसर्गरम्य भीमाशंकर डोळ्यांत साठवताना हिरवळ आकंठ काळजात सामावून घेत होतो. पायथ्याला तुडुंब भरलेली विहीर आहे. या विहिरीला जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाणी असते. चालता-चालता गणेश घोरपडे (दादा), डॉक्टर अभिजीत आणि काकासाहेब या त्रिकूटाच्या मनोरंजनात्मक हास्यमैफिलीने चालण्याचा सर्व त्रास कुठल्या कुठे गायब होत होता. जगाला देण्यासाठी आणि देण्यासारखं आपल्याजवळ आनंदापेक्षा वेगळं चांगलं काहीच नसतं. प्रसन्नता संसर्गजन्य असते. एक माणूस प्रसन्न दिसला की आपोआप आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात हेच खरं. चार्ली चॅप्लिन आणि इंदुरीकर यांनाही धोबीपछाड करणारी ही अवलिया माणसं ग्रुपमध्ये आहे हे आमचं भाग्य. नऊ वाजले तरीही सूर्यदर्शन नव्हते, त्यामुळे चालण्याचा कोणताच त्रास वाटत नव्हता. हसत-खेळत गप्पा मारत पदरगड चढाईला सुरुवात झाली. एकही पायरी नसणारा हा गड अत्यंत कठीण गिरीदुर्ग समजला जातो. कर्जत-खांडस मार्गे भिमाशंकरला जाणार्‍या पुरातन गणेश (गणपती) घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड व तुंगी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. हे दोन्ही किल्ले टेहळणीसाठी बांधण्यात आले होते, त्यामुळे या किल्ल्यांवर फारसे अवशेष नाहीत. पदरगडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे प्रस्तरारोहणाचे (ट्रेकिंगचे) सामान वापरूनच गड सर करता येतो. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना "कलावंतीणीचा महाल" या नावाने ओळखले जाते. पदरगड कोणी व केंव्हा बांधला याची माहीती उपलब्ध नाही. 

   पायऱ्या नसतानाही एकमेकांच्या साथीने आम्ही मध्यापर्यंत गेल्यानंतर पंकज सरांनी आणलेली दोरी बांधून एकेक मावळा वर चढला. पायऱ्या नसणारा सरळ कातळ पाहताना डोळे गरगर फिरत होते. काळजात धस्स होत होतं. तरीही न घाबरता दोरीवरून सरसर वर जाणाऱ्या तेरा वर्षाच्या अर्णव नावाच्या या मिणमिणत्या पणतीने सर्वांना अखंड उत्साहाचा प्रकाश दिला. थोडासा घाबरत असल्यामुळे मी मात्र तेथेच थांबलो. दर क्षणी गडावरच झेंडे गाडले पाहिजे असं जरुरी नाही, कधी कधी पायथ्याच्या सावलीत विसावा घेतलेला बरा! अशी समजूत घालत स्मृती पाखरांचा थवा माझ्या ओंजळीत विसावला. वर पोहोचलेल्या माझ्या सहकाऱ्यांच्या गर्जनांनी आसमंत दणाणून सोडला होता.

गडकोटांच्या चिऱ्याचिऱ्यात चिन्हे तुझी पाहतो,

दिव्य तुझ्या त्या दृश्य रुपाला 'सह्याद्री' ऐसे नाव लावतो! 

           अशी सगळ्यांची गत झाली होती. पदरगडावर चढण्यासाठी "चिमणी क्लाईंबचा" टप्पा व त्यानंतरचा प्रस्तरारोहणाचा टप्पा पार करावा लागतो. त्यानंतर आपण गडमाथ्याला लागून असलेल्या डोंगराला वळसा घालून, गडमाथा व डोंगर यांमधील खिंडीत येतो. येथे उजव्या बाजूला कातळात कोरलेली मोठी गुहा पहायला मिळते.यात ५-७ माणसे आरामात राहू शकतात. तर डाव्या बाजूला ५ फूट उंचीवर कातळात कोरलेली छोटी गुहा पहायला मिळते. (यात जेमतेम एक माणूस बसेल एवढी जागा आहे.) या दोन्ही गुहांची तोंड वेगवेगळ्या दिशांना आहेत. चिमणी क्लाईंब म्हणजे पाठ व पाय एकाचवेळी भिंतीवर रोवून वर चढणे. या दिव्य पराक्रमासाठी पंकज सर व रवी सरांनी सर्वांना मदत केली. हात देणाऱ्या या दोघांच्या हातात सर्व मावळ्यांच्या गडचढाईचं आकाश सामावलं होतं. रवी काळे सर, पंकज माने सर यांच्या सहवासात जगलेल्या प्रत्येक क्षणांचं इंद्रधनुष्य होतं. दोघांमधलं पाऊस कोण? ऊन कोण? नाही सांगता येणार. दोघंही तितकीच तोलामोलाची. अत्यंत कठीण गड सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आमच्या ग्रुपमधील सर्व मावळे अजिंक्य ठरले होते.

             गडावरून उतरताना प्रत्येक जण काहीतरी अप्रूप गवसल्यासारखा प्रफुल्लीत होता. थोडा वेळ सर्वांनी एकत्र विश्रांती घेत पुन्हा परतीसाठी जंगलातील पायवाट धुंडाळायला सुरुवात केली. पुन्हा अप्पा, दादा, डॉक्टर, काका, बाप्पू यांचे विनोदांच्या हास्यांचे कारंजे अंगावर घेत आम्ही चिंब भिजलो. जगण्याला कंटाळलेल्या कोणाही बहाद्दराला यांसमोर आणून उभं केलं आणि त्याने हसता हसता जीव नाही दिला तर शप्पथ! अशा प्रसन्न झऱ्यांचा शोध घेणे आणि ते वाहतं ठेवणं महत्त्वाचं असतं. ते काम काळे सर आणि गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुप चोख पार पाडत आहे. जगात चांगल्या माणसांची संख्या खरंच जास्त आहे. प्रत्येकाच्या नावाभोवती एक वलय होतं. कर्माचं, कर्तृत्वाचं, कर्तव्याचं. प्राजक्त, निशिगंध, चाफा, मोगरा यांच्या सुगंधाला कोणत्या निकषांवर अव्वल ठरवावं? अशाच द्विधा अवस्थेत मी. आयुष्यभर ऊर फुटेस्तोवर धावणारी माणसं या आनंदाला मात्र मुकतात, पारखी होतात.

कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी

अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.

                 गडकोटावरून आम्हा मावळ्यांची पालखी वर्षानुवर्षे पायरीला स्पर्श करत राहील आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे सर्व भोई प्रत्येक पिढीत घडतीलच,असा ठाम विश्वास वाटतो. पुढे चालत येताना भर जंगलात पाणी विकणारं पोर. लिंबू सरबत विकणारे म्हातारे आजोबा यांच्याकडे एक ऊर्जा दिसली. बस यायला दहा मिनिटं उशीर झाला किंवा एक-दोन दिवस पगार उशीरा झाला तरी जगातलं सारं दुःख आपल्या चेहऱ्यावर जमा होऊन अमावस्येचे रूप घेतं पण सगळ्याच ऋतूत त्यांच्या चेहर्‍यावर उमेदीचे चंद्र कसे उगवत असतील? चंद्रकला नव्हे पूर्ण चंद्र! तो ही पौर्णिमेचा! आम्ही मात्र त्यांच्यासाठी दवाखाने नाहीत, रस्ते नाहीत, सरकारचे लक्ष नाही या चर्चेत गुंग. बोलाचा भात अन् बोलाचीच कढी.

                 दहा तासांच्या पायपिटीनंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. थोडसं फ्रेश होऊन आम्ही दर्शन घेतलं. गाडीत बसून एका व्हेज हॉटेलपाशी येऊन तिघांनी हॉटेलमध्ये व्हेज भोजनाचा आस्वाद घेतला. उरलेल्या आम्ही सर्वांनी मात्र गरमागरम बिर्याणीवर यथेच्छ ताव मारला. रिकाम्या सकाळच्या घागरीत संध्याकाळी परतताना अनुभवांची रत्ने गोळा झाली होती. आयोजकांनी शिल्लक राहिलेली बिर्याणी आवर्जून गाडी थांबवून रोडला राहणाऱ्या काही पालातील गरीब मुलांना दिली. ओवता आलं पाहिजे विणता आपोआप येतं. मनं, धागा, माणसं, सर्व काही. ही शिकवण सहज मिळाली.

रस्त्यावरच्या, जाती-धर्माच्या, पुतळ्यांच्या दंगली घडवणाऱ्या अंधभक्तांनी एकदाच आमच्या ग्रुपबरोबर सफर करावी. द्वेषाचा डोंब कुठल्याकुठे शांत होईल याचा त्याला थांगही लागणार नाही, अशी माणसं या ग्रुपमध्ये आहेत. वेगवेगळ्या पदावरची, जातीपातीची, मांडीला मांडी लावून एकत्र जेवणारी, हातात हात देऊन सोबत देणारी, मनोरंजन करत दुःखाचा डोंगर पार करणारी, प्रेमळ, सुज्ञ माणसं.

२६व्या या ट्रेकच्या निर्धाराची बीजं फुलवत अखंड संकल्पात रूपांतर व्हावे आणि गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठानचा वेलू गगनावरी जावा, हीच सदिच्छा! प्रत्येक महिन्याचा या दुर्गभ्रमंतीचा एक दिवस आमचं जगणं अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण करतो.

परतीच्या हिशोबाचा आपला प्रवास राहू दे,

जायचे चालून किती अंतर, अंदाज राहू दे.

तुझ्या नशिबात होती ती उन्हे घेतली मी,

तरी तुझ्या अंगणी वसंत बारोमास राहू दे!

अशा शुभेच्छाच जणू गड आम्हाला देत होता. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं जाण्याच्या काळात एकही रुपया जास्त न घेता फक्त पाचशे सत्तर रुपयांत ट्रेक घडवून आणणाऱ्या आयोजकांना लाल सलाम! काही दिवसांनी या आठवणी प्राणवायूसारख्या सोबत देतील.

दुर्ग प्रेमाचा संसर्ग घडवत भटकंतीची प्रत्येकाला बाधा व्हावी.

आनंदाचा पारा सदैव वाढावा,

सुखाचं तापमान परमोच्च व्हावं,

वेळोवेळी दुर्गभ्रमंतीची अशी लस घ्यावी की

निश्चयाचा अगदी कस लागावा!

थरारक पदरगड आणि निसर्गरम्य भीमाशंकर ची ग्रेट भेट घेऊन भीमाशंकरहून पुण्याच्या दिशेने वाटचाल करत नियोजित वेळेत रात्री दहा वाजता आम्ही सुखरूप पोहोचलो. या संपूर्ण प्रवासाचा खर्च फक्त ५७०/- रुपये इतकाच आला, हे 'गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुप'चे वैशिष्ट्य.

पुन्हा भेटू वेगळ्या गडकिल्ल्यांच्या वाटा शोधताना...तोपर्यंत...

जय शिवराय,जय महाराष्ट्र!


आयोजक

श्री.रवी काळे सर,

निमगाव म्हाळुंगी

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान

9096465675


शब्दांकन

श्री.आयुब शेख सर,

पुणे महानगरपालिका

9552941271

🙏🏻🌹🚩🌸🌺🚩





10 comments:

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...