Sunday, August 28, 2022

हाच माझा पुरस्कार निबंधलेखन आयुब कलाम शेख प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

 


"हाच माझा पुरस्कार!"

"शाळा माझी,सर्व माझीच मुले,

टवटवीत ठेवीन, जशी फांदीवर फुले,

कुरवाळेन प्रेमाने आईपरी,

दक्ष डोळे मात्र असतील सदैव खुले!!"

                  शिक्षकी पेशा हा निर्जीव फायलींवरची धूळ झटकण्याशी संबंधित नसून रोज नव्या आशेच्या किरणांना, जिवंत मेंदूंना आणि चैतन्याने सळसळणाऱ्या निरागस जीवांना सोबत घेऊन प्रकाशाची वाट चालण्याचा संकल्प आहे, असं मला वाटतं. कितीतरी पिढ्या शिक्षकाांच्या हातून घडतात, बिघडतात! मुलं येतात,जातात. शाळा बदलते, शिक्षक मात्र तिथेच असतो. पथिकाला मार्ग दाखवणाऱ्या रस्त्यावरच्या त्या मैलाच्या दगडासारखा! जिवंत माणसं घडवत आहोत आपण, कच्च्या मातीचे घडे नाही हे सतत लक्षात ठेेवलं पाहीजे. कोवळ्या मनावरचं मळभ हलक्या हाताने दूर करतोय आपण. आपल्या हातात कुण्या आईनं आपल्या काळजाचा तुकडा दिलाय, आपण त्याचं भलं करणार, या विश्वासानं! मूल शाळेत आलं म्हणजे ते माझं झालं, ही आपली भावना महत्त्वाची.

                   मुलांच्या प्रश्नचिन्हाचं रूपांतर पूर्णविरामात करता आलं की समजावं, खरं शिक्षण देता आलं. फक्त पाठ्यपुस्तक संपवून शिक्षकांचं ज्ञानदानाचं कार्य पूर्ण झालं असं नाही, त्यासोबत विविध उपक्रम, प्रकल्प, शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमधील सहभाग, नीतिमूल्यांचे संस्कार यांसारख्या विविध गुणांच्या उपहारांनी विद्यार्थ्यांना सजवता आलं की समजावं, आपण मुलांसाठीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. मुलांना शाळा हे आपलं दुसरं घरच वाटावं यासाठी आपण काम करायला हवं. शाळेत येण्याची ओढ विद्यार्थ्यांना लागावी यासाठी आपण काय करत आहोत? हा विचार महत्त्वाचाच.

         अनेकदा शिकवणं आनंददायी नसतं म्हणून शिकणं मजेशीर होत नाही. शाळेत पोरांना लळा लावला की त्यांना शाळेचा लळा लागणारच, यात तिळमात्र शंका नाही. शिक्षक व्हायचं म्हटलं की अपार करुणा अंतःकरणात असायला हवी. सोबत प्रखर कटाक्ष. प्रत्येक मुलावर घारीसारखं लक्ष. शिक्षक म्हणून आपण मुलांचं पालकत्व स्वीकारावं आणि ते मनापासून अनुभवावं. शिक्षकांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे विद्यार्थी. जेव्हा विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये परीक्षांमध्ये चमकतात त्यावेळी शिक्षकाला आकाश ठेंगणं होतं. आपण जोपासलेल्या इवल्याशा रोपट्याला सुंदर फळं, फुलं लगडलेली पाहताना कोणत्या माळ्याला आनंद होणार नाही? एखादा आदर्श शिक्षक निवडायचा असेल तर खरंच त्यांचे विद्यार्थी कुठे आहेत? काय करत आहेत? हे पाहायला हवं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेवरून शिक्षकांचं अढळपद सिद्ध होतं. प्रत्येक शिक्षकांकडे विद्यार्थ्यांसाठी माहितीचा भरपूर साठा कायम तयार असायला पाहिजे. या साठ्यात शिक्षकांनी रोज नित्यनूतन अनुभवांची भर टाकत गेलं पाहिजे. शिक्षकांनी आपल्या बहुश्रुततेचा आणि प्रचंड मोठ्या अनुभवविश्वाचा मुलांना सतत फायदा करून द्यायला हवा.

                     मान्य आहे, अध्यापन करण्यासोबत अनेक अशैक्षणिक कामं आपल्यावर सोपवली जातात. लेखी कामांचा बोजाही आपल्यावर पडतो. अनेकदा शाळेत हेवे-दावे होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कुरघोडींना ऊत येतो. अशा वेळी शिक्षक म्हणून आपल्या मनात मात्र विद्यार्थ्यांसाठी सतत कल्पक विचारांचं वारं वाहायला हवं. मुलांच्या भविष्याची बीजं समृद्धतेच्या जमिनीवर पेरायची काळजी फक्त आपण करायची.! हसऱ्या चेहऱ्यानं वर्गात प्रवेश करायचा आणि शाळा सुटेपर्यंत पोरं कशी आनंदाने शिकतील, एवढच बघायचं. शाळेत येतानाची मुलांची रीती ओंजळ मात्र शाळा सुटताना ओसंडून भरून वाहायला हवी,एवढं मात्र निकरानं जपायचं! आपल्या व मुलांच्या प्रगतीचा आलेख दरवर्षी कसा वाढतच राहील?यासाठी प्रयत्नशील राहायचं. प्रेरणादायी सतत वाचायचं आणि मुलांसाठी प्रेरणादायी ठरायचं! मुलांच्या कलानं घ्यायचं म्हणजे त्यांच्या प्रगतीच्या वाटा अधिक सोयीस्कर होतील.

                      मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडल्यामुळे शिक्षक संबंधित शाळेतील सत्तेचे प्रतिनिधी राहत नाहीत तर मुलांचे लाडके मित्र होतात. आपल्या एखाद्या मित्राचे भावनेने ओथंबलेले एखादे पत्र आपल्याला आले तर आपण काय त्याच्या अक्षराबद्दल तक्रार करतो? आशयच पाहतो ना! त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अवगुणांना बाजूला सारत त्यांच्यातील गुणांची पारख करता यायला हवी. प्रत्येक मुलात काहीतरी विशेष असतंच की, त्याचा शोध फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. आपण शिक्षक म्हणून शाळेत आपली सर्व ऊर्जा खर्च करायला हवी. जुनीच सामग्री परत-परत वापरणं हे शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखंच आहे. नवनवीन कल्पना वापरायला हव्यात सर्व विषयांना सर्जनशील वळण मिळालं की शिकवणे ही केवळ शिक्षकांची आस उरत नाही तर शिकणे ही विद्यार्थ्यांची सुद्धा आस्था बनते.

                  बहिणाबाई म्हणतात,"सगळीच झाडं फळं देणारी नसतात,काही डोळ्यांना सुखद हिरवळ देणारीही असतात." वर्गातली सगळी पोरं बुद्धिमान, हुशार असतीलच असं नाही. काही पोरं अभ्यासात कच्ची असली तरी मोठं होऊन तीच पोरं वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करतात. ही पोरं शाळेत खोडकर, मस्तीखोर असतील पण खेळाच्या माध्यमातून, विविध व्यवसायांच्या माध्यमातून आयुष्याच्या शाळेत पहिल्या श्रेणीत पास होतात हे मात्र नक्की!

                पेन्सिल हातात धरतानाही लटपटणारे हात जेंव्हा हुबेहूब शिक्षकांच्या अक्षरांची नक्कल करतात, ते असतं आपलं प्रशस्तीपत्र. दिवसातून वीस पंचवीस वेळा शिकवलेली अक्षरं दुसऱ्या दिवशी पुन्हा चुकीची उच्चारणारा विद्यार्थी जेव्हा खडाखडा वाचू लागतो ते असतं आपलं बक्षीस. आदल्या दिवशी ज्याच्यावर प्रचंड रागावून गेलो तोच विद्यार्थी दुसऱ्या दिवशी सकाळी छानसं हसून Good morning म्हणतो ना तेच असतं आपलं खरं गोल्डमेडल.

                 शाळा सुरु होते, कितीतरी निरागस अबोल चिमणपाखरं येऊन बसतात आपल्या वर्गात. थोडे दिवस बावरतात. आई, आजीची आठवण काढत, हुंदके देतात पण हळूहळू शिक्षकच होतो त्यांचा सखा, सोबती, सवंगडी! देतो त्यांना कौतुकाचे, आपुलकीचे कोवळे, हिरवे शब्द, नाजूक हळव्या चैत्रपालवीसारखे! चार-आठ दिवसांतच विसरतात ते आपलं घर कारण त्यांचं नवं घर त्यांना शाळेत मिळालेलं असतं. नववर्ष प्रवेशावेळी त्यांच्या उघडलेल्या चिमुकल्या बाळमुठीत शिक्षक देतात पेन्सिल. रेघोट्या मारण्यासाठी, गिरगटण्यासाठी. त्या रेघोट्याच हळूहळू आकार घेतात भविष्याचा! "प्रश्न नाहीत सुकणार त्यांचे, धरतील मूळं जोमदार!" याची काळजी घेता आली की समजायचं शिक्षणाची दिशा योग्य आहे.

                   खेळण्यात जितका आनंद मिळतो तितका शिकण्यात निर्माण करता आला तर खऱ्या अर्थाने शिक्षण आनंददायी होत आहे. "आज इतिहास शिकवताना काय मज्जा आली, सरांनी टॉपचं शिकवलं. ऐतिहासिक चित्र उभं राहिलं डोळ्यासमोर!" असे मुलांचे उद्गार लक्षावधी प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्यांना फिके पाडतात. आम्ही शिक्षक म्हणून आमचं अध्यापन कर्तव्य कसं पूर्ण करतो? यावर आमच्या भ्रष्टाचाराचे स्वरूप अवलंबून आहे. माणसं नोटा खाऊन कागद संपवतात, आम्ही संपूर्ण पिढी नाही ना संपवत? याचाही विचार व्हायला हवा. हा भ्रष्टाचार सर्वाधिक गंभीर आहे.

               शिक्षकांनी मुलांच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद द्यायला हवा. व्वा! सुंदर, मस्त, छान अशा उपहारांनी. आपण असो वा नसो शाळा चालतेच, वर्ष जातातच. मुलं येतात, जातात दिवस थांबतो का कोणासाठी? आपण नसलो तरी हे होणारच. आपल्या नसण्याने फरक नको का पडायला. पण आपल्या असण्याने फरक पडायलाच हवा. तोही चांगलाच! स्वप्नातली सुंदर शाळा घडवावी, स्वप्न सत्यात, प्रत्यक्षात उतरावं या कल्पनेनंही मन किती सुखावतं. अमक्या शिक्षकांच्या तासाला झोप येते, हे शिक्षकांसाठी इंडिकेटर आहे खरं तर. उत्साहानं सळसळणाऱ्या मुलांना शाळेतल्या बाकावर बसवून फक्त बौद्धिक विषयांचा अभ्यास करायला लावणारी शाळा निखालस वाईट म्हणावी लागेल. शिक्षकांनी नेहमी लक्षात ठेवायला हवं, 'ज्याची भीती वाटते, त्याच्याविषयी प्रेम कधीच वाटत नाही.' आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याविषयी आपुलकी वाटायला हवी, भीती नाही. भीतीयुक्त वातावरणात मुलं मुक्तपणे बागडणार कशी?

                     शाळेत येऊ पाहणाऱ्या प्रत्येक बालकासाठी कोणत्याही आडकाठीशिवाय प्रवेशाची दारं सताड उघडी ठेवता आली पाहिजेत. शाळा भरण्याची वेळ झाली की पोरं वर्गात येण्याआधी सतत काहीतरी नवीन करण्याचा विचार मनात उसळी मारायला हवा. स्वतःची कौशल्य वृद्धिंगत करत, पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त पुरक माहितीसाठी शोध घेत विषयासंबंधी अधिक ज्ञानाचा संचय शिक्षक म्हणून सदैव करता यायला हवा. सढळ हाताने व्यवहारोपयोगी ज्ञानदान करत बालकांच्या मनावरची किड हलकेच दूर करता यायला हवी. आज गरिबीची झळ सोसत उद्या तरी चांगला दिवस उजाडेल या आशेवर शाळेत पाठवणाऱ्या पालकांच्या पोरांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न रंगवता आली पाहिजेत. प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देत अभिव्यक्तीसाठी कल्पनाशक्तीचं क्षितीज खुलं करता आलं पाहिजे.

                    गुणवत्तेसाठी झटत संस्कार, कला, क्रीडा, संगीत, नाट्य यांसाठी नियोजित वेळ देता आला पाहिजे, पोरांना विविध स्पर्धांमध्ये उतरवत यशापयशाच्या भिंतीवर खिलाडूवृत्तीचं चित्र चितारता आलं पाहिजे. शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकाचं पालकत्व स्वीकारत, वर्गात बसणाऱ्या पोरांची पोटच्या पोरांएवढी काळजी घेत दिलेलं शिक्षण हेच खरं ज्ञानदान ठरलं पाहिजे.

                   स्कॉलरशिपच्या परीक्षेत माझ्या वर्गातील सुबोध बनसोडे या विद्यार्थ्यांने गुणवत्ता यादीत क्रमांक पटकावला. त्याच्या आणि शाळेसोबत माझंही नाव पुणे महानगरपालिकेत झळकलं. राज्यस्तरीय घनकचरा व्यवस्थापन स्पर्धेत राज्यातील दीडशे मुलांमध्ये त्याने स्थान मिळवलं. यासाठी त्याचा सत्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाला. त्याला वैज्ञानिकांचे प्रयोग पाहण्याची संधी मिळाली. त्याच्यासोबत मार्गदर्शक शिक्षक म्हणून मलाही भारतीय संशोधन संस्था, आयसर, पुणे येथे दोन दिवस निवासी राहण्याचा योग आला, हेच माझं भाग्य! नैतिकने टाकाऊतून टिकाऊ स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकावला. सायलीने पुणे मनपा स्तरावर चित्रकला, निबंध, प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले. पुणे महानगरपालिकेचा लोकमान्य टिळक गुणवंत विद्यार्थी पुरस्कार मिळवला. शरदने हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. संकेतने पाढे पाठांतरमध्ये यश मिळवले. पुणे मनपा अंतिम नाट्यस्पर्धेत विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला. वर्गाच्या युट्युब चॅनेलमध्ये सर्व विद्यार्थी उपक्रमांची माहिती अचूकपणे सांगतात. विद्यार्थ्यांनी शाळेचे, वर्गशिक्षक, पालक सर्वांचं नाव उंचावलं. हाच खरा माझा नोबेल पुरस्कार, जो विद्यार्थ्यांनी मला दिला!

                 वर्ग बँकेत खाऊचे पैसे जमवणारा नैतिक ज्यावेळी पैसे जमवून आईच्या वाढदिवसासाठी साडी घेतो तेव्हा मला पुरस्कार मिळतो. अंधश्रद्धेने पछाडलेल्या बाबांची नजर चुकवत सूर्यग्रहण पाहण्यासाठी जेव्हा सुबोध शाळेत धावतपळत येतो तेव्हा माझा खरा गौरव होतो. आमच्या सरांना उलटं बोलायचं नाही, असं ठणकावून अभिलाषा दारू पिलेल्या बाबांना सांगते तेव्हा मी पुरस्कृत होतो. तापाने फणफणत असतानाही रोहित शाळेत येतो, तेव्हा मी सर्वार्थाने आदर्श शिक्षक ठरतो. वाढदिवसाला वर्ग ग्रंथालयासाठी एक पुस्तक व शाळेसाठी एक सुंदर फुलझाड, वर्गासाठी झाडूअशा भेटवस्तू सुजल, आकाश, धनश्री, वर्गातली सगळीच पोरं भेट देतात, तेव्हा मी खरा पुरस्कारार्थी ठरतो. पोरांची सुंदर मोत्यांसारखी हस्ताक्षरं पाहतो तेव्हा त्या अक्षराच्या वळणात मी अजरामर होतो. शिस्तीत,टापटीप गणवेशात येणारी माझी गरीब, झोपडपट्टीतली पोरं पाहतो तेव्हा मी चंदनापेक्षाही जास्त सुगंधित होतो. ट्राॅफी, शाल, श्रीफळ, फेटा यांसारख्या सन्मानाने मी अनेकदा सन्मानित झालो आहे, पण मुलांकडून मिळणाऱ्या या सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत होताना, "देव पहावयासी गेलो,देवचि झालो" अशी माझी अवस्था होते.

                  हळूहळू होतील ही पिल्लं मोठी. शाळा होईल छोटी,त्यांच्यासाठी. बळकट होतील पंखं त्यांचे अन् उडून जातील सैरभैर, भिंतीपलीकडे. खात्री आहे, होतील पार ती जीवनाच्या परीक्षेत. कधीच हात टेकणार नाहीत, आपलं पळवू देणार नाहीत आणि दुसऱ्याचं पळवणारही नाहीत, एकलकोंडी होणार नाहीत. माझ्या चष्म्यावर साठेल धूकं.पण ते पुसायचं मला भान राहणार नाही. पोरं असतील तेथून काढतील आठवण माझी. कधीतरी स्तब्ध होतील माझा विषय निघाल्यावर. तीच माझी खरी गुरुदक्षिणा! कष्टाचं खातील, आई-वडिलांना सांभाळतील, माणूस म्हणून जगतील! तेच माझं पसायदान!

लेखन

आयुब कलाम शेख,

प्राथमिक शिक्षक,

म.न.पा.शाळा क्र.174बी, कोंढवा बु.पुणे-48

मो.9552941271 

Saturday, August 27, 2022

भोरगिरी भीमाशंकर - श्रावणातला जंगल ट्रेक गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीसोबतचा जंगल ट्रेक

 भोरगिरी भीमाशंकर - श्रावणातला जंगल ट्रेक

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगीमधून रविवारी २१ ऑगस्ट २०२२ रोजी पहाटे चार वाजता विजय माने, श्रावणी माने, वेदांत माने, वैभव करपे, ऋत्विक करपे, मुरलीधर कटके, गुरुदत्त गोसावी, दादाभाऊ कर्डीले, रविंद्र काळे, सोमनाथ चव्हाण, संतोष लांडे, गोरक्ष पाचुंदकर, युवराज शिंदे, हर्षवर्धन पाचुंदकर, गणेश घोरपडे, तनिष्का घोरपडे, अप्पा रणसिंग, वैभव पवार, अक्षयकुमार कांबळे, वैभव पवार, शेखर लांडे, लांडे बाळासाहेब, अविनाश धोत्रे, अभिषेक चव्हाण, शैलेश निकम, रवी नरसाळे, सुमित वडघुले, सुरेश चव्हाण, वैभव चव्हाण, राहूल पोतदार, गौरव वाणी, प्रियांका धुमाळ, नेहा करले, गिरीश तांबे आणि मी असे ३५ मावळे आणि सोबत ट्रेकमधील विशेष अतिथी मंदाबाई काळे (वय ६०), सुलोचना काळे (५५), पुष्पा काळे (६१), मंदाताई चव्हाण पाटील(६०) या मातृतुल्य महिला एकूण ३९ जणांना घेऊन भोरगिरीच्या दिशेने गाडी निघाली. यात एक नाव आयोजकांनी गुपित ठेवलं होतं, ग्रुपमध्ये अप्पाला "ठरलं की काय?",असं म्हणत खूप चिडवलं सगळ्यांनी.

पहाटे दुर्गभ्रमणाला निघण्याची खरं तर ही आमची पहिलीच वेळ. यंदा खूप काही नवीन होतं. या ट्रेकमध्ये विद्यार्थी, शिक्षक, महिला, कंपनी कामगार, मॅनेजर, व्यावसायिक, शेतकरी, नेव्ही ऑफिसर, राजकीय व्यक्तींचाही समावेश होता. वेगवेगळ्या वयांचे बरेच नवीन चेहरे होते. मार्गदर्शक पंकज माने सर, दिशादर्शक बापू आणि जेवणाची सर्व व्यवस्था काटेकोरपणे पाहणारे आमचे अन्नदाता बाळाभाऊ आज नव्हते, त्यांची उणीव भासत होती.

प्रत्येक महिन्याकाठी निसर्गात, वातावरणात बदल व्हावा अगदी तसंच दर महिन्याला आम्हाला हवापालट करण्याची संधी रवी काळे सर नित्यनेमाने घडवून आणतात.

पुरवून वापरता यावा म्हणून आपण गरजेनुसार मोबाईल डेटा बंद ठेवतो, फोटो, व्हिडीओ किंवा महत्वाच्या काॅल्ससाठी मोबाईलची बॅटरी वाचवतो, अगदी तसंच नकोशा विषयांवरचे चर्चा, परिसंवाद स्वतःपर्यंत पोहोचूच दिले नाहीत की आपली सकारात्मक ऊर्जा वाचते, महत्त्वाच्या गोष्टींसाठी. तीच ऊर्जा वापरायची गडकिल्ले भ्रमंतीसाठी. जगण्यातली उत्स्फूर्तता मात्र हरवू द्यायची नाही.

पावसामुळे दाटलेली हिरवळ आणि पाणीच पाणी गाडीच्या काचेतून पाहत आम्ही सकाळी आठ वाजता डेहणे गावी नाष्ट्यासाठी उतरलो. चवदार मिसळपाव, गरमागरम भजी आणि वाफाळता चहा घेतला अन् सकाळ कशी प्रसन्न झाली. काळे सरांची सगळीकडेच कशी ओळख? हा अचंबित करणारा नेहमीचाच प्रश्न. आता डायरेक्ट संध्याकाळी जेवण होणार होतं म्हणून मनसोक्त जेवलोच म्हणावं इतकं खाल्लं आम्ही. हाॅटेलमध्येच पहिल्यावहिल्या स्टेटससाठी ग्रुपफोटो झाले आणि निघालो पुढच्या प्रवासाला.

भोरगिरी हा भीमाशंकर डोंगररांगेतला ६८६ मीटर उंचीचा गिरिदुर्ग प्रकारातला, सोप्या चढाईच्या श्रेणीतला किल्ला. चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावाशी संपतो. जाताना वाटेत भीमा नदीवरील धरण पाहता येते. पुण्यापासून ८० किमी. अंतरावरचा प्रवास.

पायथ्याशी उतरलो सगळे. चौघी मातृतुल्य महिला भिमाशंकर दर्शनासाठी गाडीतून पुढे पाठवत आम्ही भोरगिरीकडे कूच केली. सगळ्यांत पुढे अप्पा, दादा आणि मी थांबायचे ठरले. ( ठरले की आयोजकांनी सज्जड दम भरला हे फक्त आम्हालाच माहीत.) शेवटी काळे सर चालणार होते.

हिरव्यागार झाडाझुडुपांनी, भाताच्या खाचरांनी समृद्ध प्रदेश पाहताना निसर्गरुपी चित्रकाराने हिरव्या रंगाचे सढळ हाताने मारलेले फटकारे डोळ्यांना सुखद अनुभव देत होते. मध्येच डोकावणारे छोटुले ओहोळ, धबधबे जिवंतपणाची साक्ष पुरवत होते. निसर्ग असा सौंदर्याचा अविष्कार करत असताना कॅमेऱ्यात त्या नजाऱ्याला टिपणार नाही ते गडकिल्ले प्रेमीचे मावळे कसले?

या मनमोहक क्षणांना तात्पुरत्या स्वरूपात डोळ्यांत साठवल्यानंतर कॅमेऱ्यात कैद करत आम्ही चिरंजीवी करतो हे काळे सरांच्या लक्षातच येत नाही बहुधा. उगाचच ओरडत असतात. पुढच्या दहा मिनिटांत पुढे आलेल्या आम्हाला कळून चुकले खरी फोटोग्राफी तर मागे थांबूनच भारी होते. पुन्हा युटर्न घेत आम्ही शेवटी मोर्चा वळवला.

डोळ्यांनी सगळेच पाहतात, एखादी व्यक्ती असं काहीतरी छान पाहते की कलाकार होते. आकाश रोजचंच असतं, इंद्रधनुष्य एखाद्याच दिवशी. ते देखणेपण निर्माण करतो तो कलाकार. असा आमच्या ग्रुपमधील वैभव करपे. उत्कृष्ट फोटोग्राफर. यावेळी पोराला घेऊन आल्यामुळे जास्त मौज नाही करता आली, पण धबधब्याखाली भिजण्यात माघार घेतली नाही.

संततधार पावसामुळे पाषाणावर शेवाळ साठलेलं होतं, वाट काहीशी घसरडी आहे हे जाणवण्यापूर्वीच वेदांत आणि अक्षयकुमार कांबळे घसरले. आमचे दोन मावळे सुरुवातीलाच धारातीर्थी पडलेले पाहून आम्ही सावधगिरी बाळगली.

वेदांत, श्रावणी, तनिष्का, ऋत्विक ही छोटी पोरं मोठ्यांबरोबर धीटाईनं ट्रेक करत होती, हे विशेष.

पुढे भला मोठा धबधबा. निसर्गाने दृश्य रुपात अवतरताना काय भुरळ घालणारी रुपं निवडलीत याचा पेच पडतो बऱ्याचदा. इथेही बरचसं फोटोसेशन करून पुढे मार्गस्थ झालो.

समोरच भोरगिरी दिसला. मंदिर असणाऱ्या गुहेचं दर्शन चढाईला सुरुवात करतानाच नजरेच्या टप्प्यात येतं. गुडघाभर गार पाण्यातून आत जात देवीचं दर्शन घेतलं. प्रशस्त गाभारा अन् पूर्वजांनी केलंलं दगडी खोदकाम आश्चर्यकारक होतं.

काळे सरांनी आणि संतोष लांडे यांनी शिवरायांच्या जयजयकारात घोषणा दिल्या.

वर किल्ल्यावर नवव्या शतकात खोदलेल्या गुहा, पाण्याचे टाके आहेत. पुढे गेल्यावर पिंडीचे अवशेष, बुरुजांच्या अस्तित्वाच्या खुणा पहायला मिळतात. एक व्याघ्रशिल्प, मारूती मंदिर, गुहा नजरेस पडते. पाण्याची कुंडे दुथडी भरून वहात असतात.

गडावर गडपणाचे तुरळक अवशेष आहेत. दक्षिण अंगाला लेणी कोरलेली आहेत. ट्रेकला उशीर होईल म्हणून आम्ही वर गेलो नाही, हे सगळं पहायचं, अनुभवायचं राहिलंच.

जवळपास चारशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणारे कित्येक गडकिल्ले आता जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मोठमोठाले डीजे लावून नाचण्याची हौस जयंतीदिवशी पूर्ण करणारे बरेच आहेत. त्या दिवशी समाजहिताची कामे व्हायला हवीत खरं तर. तो संपूर्ण पैसा गड-किल्ल्यांच्या देखरेखीसाठी शिवराय, शिवराज्य किंवा सह्याद्री प्रतिष्ठान यांसारख्यांना देऊन आपण शिवरायांबद्दल आपली आपुलकी, आस्था व्यक्त करू शकतो. महापुरुषांच्या कर्तृत्वाला, विचारांना शोभेल अशी जयंती साजरी करायला हवी.

भोरगिरी किल्ला छोटेखानी असून भोरगिरी ते भीमाशंकर हे आठ किलोमीटरचे अंतर हा एक सुंदर जंगल ट्रेक आहे. डोंगरधारेजवळून रमतगमत करता येणारा. या संपूर्ण ट्रेक मार्गावर असंख्य धबधबे आणि वैविध्यपूर्ण रानफुलं पहायला मिळतात.

अनामिक कवीच्या काही ओळी आवर्जून आठवल्या,

बालझरा तू बालगुणी

दरीदरी घुमवित येई!

खेळ लतावलयी फुगड्या

फिर गरगर अंगाभवती

लपत-छपत हिरवाळीत

झुलव गडे, झुळझुळ गाणे!

इथे जंगलसफरीसाठी स्थानिक गाईड मिळतात. पाचशे, हजार रुपयांपर्यंत. काळे सरांनी तीनशे रुपये म्हणणाऱ्या एका सातवीतल्या शाळकरी मुलाची निवड केली. त्यांच्यातल्या शिक्षकी पिंडाची पुन्हा जाणीव झाली.

चिखल तुडवत, भातशेती पाहत, गप्पांच्या ओघात मित्रांचं टोळकं घेऊन पुढे पुढे जात होतो.

कवी ग्रेस आपल्या कवितेतून व्यक्त होतात,

मन सैरभैर होताना

कंदील घरातील घ्यावा,

संध्येच्या पारावरती

उजळून हळू ठेवावा!

असा उत्साहाचा एखादा कंदील प्रत्येकाने वेळोवेळी उजळवत ठेवायला हवा. जेव्हा कधी नैराश्याचा प्रसंग येईल तेव्हा या ज्योतीच्या प्रकाशात चालत रहावं. 

सगळ्यांची ओळख परेड झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातली मातब्बर मंडळी, हुशार विद्यार्थी, कोणी काय नि कोणी काय..

संतोष लांडे म्हणाले,

एक पणती धिटाईनं पुढे आली

आणि

आत्मविश्वासाने बोलती झाली.

दिसायला जरी मी इवलीशी,

तरी काम करीन सर्व शक्तीनिशी. दाखवून देईन जगाला

प्रकाश भेदतो अंधाराला!

असा नैराश्याचा प्रकाश भेदणारा आमचा जिवलग मित्र 'रवी' आमच्या आयुष्यात आला हे आम्हा सर्वांचं भाग्य. टाळ्या वाजवून सर्वांनी दाद दिली.

कर्तृत्व असं असावं की चरीत्र ऐकणाऱ्याने टाळ्या वाजवतच राहिलं पाहिजे.

जगताना आयुष्याच्या कडेकडेने भरपूर निसटतं हे निश्चित. पण निसटतंय काहीतरी हे माहीत असतानाही ओंजळीत जेवढं सामावता येईल तेवढा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

जास्तीत जास्त अनुभव गाठीशी असावेत यासाठी झगडत राहिलं पाहिजे. फिरत राहिलं पाहिजे, माणसं जोडत गेलं पाहिजे.

मनुष्याला शाप ही असा असावा की मन अखंड भरेपर्यंत तुला थांबता येणार नाही.

सगळ्यांची खेचत म्हणा किंवा आनंदाची लहर उत्पन्न करत म्हणा एक व्यक्ती आम्हा सर्वांना दिलखुलास हसवतो, दादा घोरपडे. या माणसाशिवाय ट्रेक म्हणजे मिठाशिवाय जेवण. दोन्हीकडेही चव लागत नाही मग. नेव्ही ऑफिसर चव्हाण सरांकडून समुद्रातले भरपूर किस्से ऐकले. भारी वाटलं.

पुढे एका धबधब्याखाली सगळेच मनसोक्त चिंब झालो.

आयुष्यात किती पावसाळे बघितले यापेक्षा कितीवेळा पावसात भिजलो, हे महत्त्वाचं.

मन मारुन जगण्यापेक्षा मन भरून जगायचं सतत, कारण इथला मुक्काम कधी संपेल सांगताच येणार नाही.

फोटो काढताना अप्पा रणसिंग इतक्या वेगवेगळ्या पोझ देतो की टिपताना कॅमेरा हताश होतो आणि कॅमेरामन गोंधळतो.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमध्ये लाभलेलं सर्वांत हसरं, दिलखुलास, मनसोक्त जगणारं व्यक्तीमत्त्व. अप्पा तू जिथे बसशील तो दगडही सिंहासन वाटतो, असा तुझा सहवास असतो, हे खरंय.

कटके सर, अक्षयकुमार, नेव्ही ऑफिसर चव्हाण सर, लांडे गॅंग आणि बरीच नवी, उमद्या स्वभावाची माणसं यावेळी भेटली. अनुभवांचं गाठोडं आणखी विस्तारलं.

युवराज शिंदेचे रिल्स बघून त्याच्याबद्दलचा आदर शतपटींनी वाढला. हा पोरगा भविष्यात खूप लांब पोहोचणार याची सगळ्यांना खात्री झाली. दादा घोरपडे यांनी त्याला 'रंगाचा विचार करू नको, तू फक्त रिल्सवर भर दे',असा लाखमोलाचा सल्ला दिला. आम्ही कृतकृत्य झालो.

आजारी असतानाही गिरीश ट्रेकला आला, याला म्हणतात जिद्द.

वदनाचे बोल सगळे ऐकतात,

काळजाची कळ त्यासी ठावी! (माझ्या हाकेला ओ देत सहभागी झालेला गिरीश)

पुढे एका पॉइंटवर फोटो काढण्यासाठी पळत येताना अविनाश धोत्रे सरपटत घसरला. शिवाय हसत म्हणाला,"एक नंबर पडलो." हसून पुरेवाट झाली. अभी आणि शैलेश ने त्याला उचललं. सकाळच्या दोन धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांना सगळे साफ विसरले. हवा फक्त अविनाशचीच. पुढे चालत जात भीमा नदीचा उगम कसा होतो हे प्रत्यक्ष पाहिलं. झरा किंवा धबधब्याचं पाणी वाहत, एकमेकांच्या हातात हात घालत इतक्या वेगात प्रवाहीत होतं की भीमेसारखी विराट सरिता निर्माण होते.

हे सौख्य याचि देही याचि डोळा पाहण्याचं भाग्य रवी काळे सरांमुळे आम्हा सर्वांना लाभलं. निःस्वार्थाचाही एक चेहरा असतो. आम्ही प्रत्येक ट्रेकमध्ये तो चेहरा पाहतो, अगदी जवळून अनुभवतो. समोर अखंड समुदाय एन्जॉय करताना पाहत, भर पावसात न भिजणं किती धीराचं काम आहे हे वेगळं सांगायला नकोच. जबाबदारी झटकणं या माणसाला कधीच जमत नाही. केवळ नाममात्र ६५० रुपयांत जेवणासहीत आम्हा सर्वांना भटकंती घडवून आणणारा हा अवलिया माणूस आजच्या युगातला एक अपवादच म्हणावा लागेल. ग्रुपमधील सर्वांची जबाबदारी आंदणात मिळालीये अशी त्यांची अवस्था. अन् आम्ही नर्मदेचे गोटे जे त्यांना आणखी त्रास देत राहतो.

संततधार पाऊस सुरुच होता. भिजत, गप्पा मारत, थोडेसे फोटो काढत पुढे पुढे जात होतो. गुप्त भिमाशंकरचा नजारा विलोभनीय होता. सुख पदरी पाडून घेण्याच्या अशा कित्येक संधी आम्हाला ट्रेक करताना मिळतात. धबधब्यावरून पडणारं पाणी फेसाळ आणि दुधाळ होतं. हीच ती भीमा जी कित्येकांना जीवनदायिनी ठरते. गंगेइतकीच पवित्र. पण पुढे गेल्यावर दिसते माणसांनी प्लास्टीक बाटल्या, इतर कचरा टाकून केलेली घाण. किती विचित्र वाटते ते. भरभरून देणाऱ्या निसर्गाची अवहेलना करण्याची कोणतीच संधी आपण सोडत नाही याची लाजच वाटली.

भिमाशंकर मंदिराचा कळस दृष्टिक्षेपात आला. काळ्या कातळातलं सुबक मंदिर. श्रावणामुळे असणाऱ्या दाट गर्दीमुळे लांबूनच दर्शन घेत परतीच्या प्रवासाला लागलो. देवस्थानच्या नियोजनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मंदिर परिसरात फक्त पीएमटी बस आणि एसटी. लांब पाच सहा किलोमीटर पर्यंत १ते५ पार्कींगची सोय केलेली होती. बस किंवा पीएमटीमध्ये बसून आपल्या पार्किंग पर्यंत जायचे. आवडलं आम्हाला. ट्राफीकची कसलीच चिंता नाही.

घोडेगावला आशीर्वाद हाॅटेल‌मध्ये सगळे जेवणावर तुटून पडलो. बाळाभाऊंची प्रकर्षाने उणीव जाणवली. सगळेच भुकेले भस्मासूर. वेटर तर थकून गेले बिचारे वाढता वाढता. आम्ही कोपऱ्यात बसलेलो. एखादी रोटी यायची, जी चौघात खायचो. त्या नादात आम्ही किती खाल्लं याची गणतीच नव्हती. संध्याकाळी साडे अकराच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचलो.

शेवटी नोबेल पारितोषिक विजेत्या पाब्लो नेरुदा या जगप्रसिद्ध कवीच्या अनुवादित कवितेतील काही ओळी...

तुम्ही प्रवासाला नाही जात,

भटकत नाही,

तुम्ही वाचतच नाही काही,

जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,

चुकून कधी नाही देत तुम्ही

स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.

याचा अर्थ,

तुम्ही मरताय हळूहळू...

सवयीेंचे गुलाम बनता आहात तुम्ही,

रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,

चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,

चुकून कधी वाट चुकत नाही,

परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,

त्यांच्याशी काही बोलत नाही,

अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.

याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू...

सोडत नाही चाकोरी,

झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,

तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,

एक संधीही देत नाही स्वत:ला,

स्वत:साठी जगण्याची,

आयुष्यच बदलून टाकण्याची.

याचा अर्थ...

तुम्ही मरताय हळूहळू...

नवनव्या संकल्पनांचे गड काबीज करत

प्रचंड जीवनोत्साह उरात भरत पुन्हा भेटू नव्या वळणावर...

तोपर्यंत जय शिवराय!

पुढील सफर

रविवार १८ सप्टेंबर २०२२

किल्ले जीवधन, नाणेघाट पावसाळी ट्रेक

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.

आयोजक 

रवी काळे सर

(पुणे महानगरपालिका)

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी

9096465675

मार्गदर्शक

पंकज माने सर

8668251375

शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

Sunday, August 7, 2022

अज्ञात पिंपळ


पिसोळीच्या डोंगरावर संध्याकाळी फिरायला जाणं हा नित्यक्रम आहे माझा.

कुण्या अज्ञात व्यक्तीने किंवा ग्रुपने पिंपळाचं रोपटं लावलेलं आज नजरेस पडलं.

समाजकार्य करून आपलं नाव न लिहिणारी घटना बऱ्याच दिवसांनी किंवा बहुधा पहिल्यांदाच पाहिली, भारी वाटलं...

झेंडे, भोंगे, धर्म खतरेंमें हैं सारखी प्रकरणं चघळत बसणाऱ्यांपेक्षा अशी माणसं खरी देशभक्त असतात. जी मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी झटतात.

सध्या पावसाळा आहे म्हणून निसर्ग पोसेलच या पिंपळाला.

पण पाऊस नसेल तेव्हा रोज फिरायला जाताना एक पाण्याची बाटली या छोटुल्यासाठी घेऊन जावी, असा निश्चय केलाय.

एक बोध मिळाला आजच्या या प्रसंगावरून....

कुणीतरी करायला पाहिजे हे जे आपण म्हणतो ना?

ते खरं तर आपण करायचं असतं!

☺️🇮🇳🌳🪴🌱

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...