Tuesday, January 2, 2024

रानमेवा - व्यंकटेश माडगूळकर पुस्तक

रानमेवा - व्यंकटेश माडगूळकर

नऊ ग्रामीण कथांचा संग्रह.

सुखद ग्रामीण वर्णन, साधी सोपी लेखणी.

भाजी विकणारा तानाजी. पोलीस समोर असताना फक्त 'याच्या आयला' शब्द तोंडातून जातो आणि त्याला दंड होतो, शिक्षा होते गुन्हा नसताना.

काही दिवसांनी पुन्हा भाजी विकत काम करतो मात्र गुन्हेगारीचा ठपका बसल्यामुळे कोणीही भाजी घेत नाही. तो शेवटी दारू पिऊन खरोखरीच पोलिसांना शिव्या देतो आणि 'मला आत टाका' म्हणतो पण पोलीस उत्तरतो,

"पैलवान, पिल्यावर माणसाचा तोल जातो, तोंडातून निघू नये तसला शब्द निघून जातो. शहाण्या माणसाने कानाडोळा करायचा. सरळ निघा घरी." खरोखरीच गुन्हा केल्यावर मात्र सुटका होते. भाजीविक्याची अजब कथा कधीकधी आपल्याही आसपास घडल्याचा भास होतो.

वपु काळेंच्या कथांची चटक लागल्याने यात एवढा रस वाटला नाही.

😍

आणखी एक आवडलेली कथा...

मिरी आणि सुबी. आठ नऊ वर्षांच्या पोरी. सुबीच्या आईने पोरांसाठी नवरा वारल्यावर केलेले समाजाच्या दृष्टीने पातक.

ब्राह्मण मिरीची आई मैत्री तोडायला सांगते. पण बाबांना डबा घेऊन जाणाऱ्या मिरीची मुक सोबत करते सुबी. पोळणाऱ्या सुबीच्या पायांना मिरी स्वतःची चप्पल देते. बाबांनी दिलेला आंबा मूकपणे अर्धा अर्धा दोघी वाटून खातात, अगदी चार पाच पावलं अंतर राखत..

मिरी आणि सुबीची जात विरहित मूक घट्ट मैत्री काळजाला स्पर्श करते.. अशाच अवीट गोडीचा रानमेवा...

पुस्तक मिळवून नक्की वाचा.

रवी काळे सरांकडून पुस्तक वाचनासाठी प्राप्त झाल्याबद्दल आभार!

😍💐

Monday, January 1, 2024

नूतन वर्षाभिनंदन लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

नूतन वर्षाभिनंदन!

नवीन वर्ष सुरू झालंय म्हणजे नवीन काहीतरी संकल्प हवाच. नाही तर कालचा आणि आजचा दिवस यात फरक तो काय?

जगणं समृद्ध होईल ते सगळे क्षण भरभरून जगायचे. मग फिरणं, वाचणं, स्वतःसाठी स्वतःच्या शरीरासाठी वेळ देणं, आपल्या माणसांच्या सोबत राहणं, मनसोक्त खाणं, आपल्या कमाईचा पैसा आपल्यासाठी वापरणं यात हातचा राखता कामा नये...

गरजा कमी करायच्या. हिशोब करायचा तर तो दोन्ही हातांच्या बोटांवर झाला पाहिजे इतकाच पुरेसा. कमाईची आवक आणि खर्चाची जावक यांचा ताळमेळ बसला की कोणापुढे हात पसरायची वेळ येत नाही. खिशात किती आहे यापेक्षा तुम्ही खुशीत किती आहात हे महत्त्वाचं. गरजेपुरत्याच वस्तू घरात आणायच्या. घरातल्या वस्तू आणि डोक्यावरचं ओझं निष्कारण का वाढवायचं?

कुंडीतली फुलं, एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू आणि अंगणातलं चांदणं फुललेलं पाहण्यातली मज्जा अनुभवायची.

नकारात्मक माणसांपासून आवर्जून दोन हात लांब रहायचं. आपल्या माणसांशी मनातलं बोलून घेताना थांबायचं नाही. कारण साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला कधी कधी आयुष्य कमी पडतं. एखाद्याच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी देण्याची संधी दवडायची नाही.

नवनवीन गोष्टी आत्मसात करायच्या. आनंदाचं झाड उभं करायचं. जीवनातली अपरिहार्य माणसं गमवायची नाहीत.

वाईट काही घडलंच तर प्रयत्न करायचे चांगलं होण्यासाठी, सावरण्यासाठी..

आंधळ्याची गुरं राखणाऱ्या त्या अनामिकावर सगळं सोपवत शेवटी एक गाणं गुणगुणायचं...

देवाक काळजी रे,

माझ्या देवाक काळजी रे!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुब कलाम शेख.

प्राथमिक शिक्षक,

पुणे महानगरपालिका 

💐🍫🎊😇

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...