Sunday, January 2, 2022

साऊमाई - एक विचारधारा! लेखन आयुब कलाम शेख.


 साऊमाई - एक विचारधारा!


प्रगल्भ विचारांच्या ज्ञानात भिजली

ध्येयनिष्ठ साऊ आद्यशिक्षिका थोरली,

काळ्या मनुला निर्धाराने पुरुन उरली

फुले जोतिबांची ती धगधगती सावली!

                                  भारतातल्या समस्त स्त्री वर्गाचं माणूसपण सिद्ध करणाऱ्या, प्रत्येक महिलेला समतेचा, स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करणाऱ्या सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे झाला. वडिल खंडोजी नेवेसे आणि आई लक्ष्मी यांची ही लेक. १८४० मध्ये ज्योतीबांशी विवाह झालेली ही नऊ वर्षांची, अक्षरांचा कोणताही गंध नसणारी पोर. प्रगल्भ विचारांचं देणं लाभलेल्या जन्माच्या जोडीदारामुळे भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, समाजसुधारक आणि पहिली मराठी कवयित्री झाली. सावित्रीबाईंचे संरक्षक, मार्गदर्शक आणि समर्थक त्यांचे पती जोतिबा होते. पती-पत्नीने एकत्र बसून एकमेकांशी बोलणेही अपराध समजला जाण्याच्या काळात ज्ञानमहर्षी ज्योतीबांनी साऊमाईला जमिनीची पाटी अन् लाकडाची पेन्सिल घेऊन शिक्षण दिलं. अक्षरांच्या ज्ञानासोबत साऊमाईच्या विचारांनाही प्रगल्भ केलं. तत्कालीन संकुचित विचारांना हद्दपार केलं. समाज उद्धाराची आकांक्षा आणि समाजाभिमुख विचारांचं सामर्थ्य यांचा संगम साधणाऱ्या दोन्ही थोर व्यक्तिमत्त्वांच्या या जळजळीत आविष्कारात कुठेही क्लिष्टता आढळत नाही.

                                       मुलींचं शिकणं हे पाप समजले जाण्याच्या काळात सावित्रीबाई मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा वाटेत नीच प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावर घाण, माती, शेण, विष्ठा टाकायचे. शाळेत आल्यावर मातीने माखलेली साडी आणि सोबत नेलेली दुसरी साडी यांची अदलाबदल सावित्रीबाई करायच्या. प्रत्येकवेळी त्यांचा आत्मविश्वास कमी होण्याऐवजी दुपटीने वाढत होता. शारीरिक इजा तर होत होतीच पण जीवन उत्कटतेने जगताना एका प्रज्ञावंत ह्रदयाला झालेल्या जखमा अदृश्य रक्ताने माखलेल्या होत्या. या रक्ताचंच ज्वालेत रूपांतर केलं आणि साऊज्योती एक योगमुद्रा ठरले. त्यांच्या नजरेला बुरसटलेल्या विचारांची घाणेरडी स्वप्नं कधीच अडवू शकली नाहीत. इतिहासाच्या दर्पणात त्यांच्या समर्पणाची प्रतिमा भविष्यातील अनेक पिढ्यांना दिसत राहील. काळाच्या भाळावरती उमटलेली ही तप्त योगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही.

                                शिक्षणाचा गंध नसणाऱ्या स्त्रीने पहिली महिला शिक्षिका होत अखंड ज्ञानाची ज्योत पेटवली. तितक्याच जिद्दीची फातिमाबी शेख यांनीही मदत केली. फातिमाबी या माऊलीला सुद्धा कित्येक पटींनी विरोध सहन करावा लागला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. रस्त्यावरून चालणारी प्रत्येक मुलगी म्हणजे आपल्या बापाचा माल आहे असं समजून तिच्यावर अचकट-विचकट बोलण्याला पुरुषार्थ समजला जातो, अशा मनुवाद्यांची जमात आजही अस्तित्वात आहेच की. असमता, स्त्री-शिक्षणाची बंदी, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, चातूर्वर्णावर मात करत ज्योतीबांनी साऊमाई, फातिमाबी  यांसोबत मुलींची पहिली शाळा काढली. कुसुमाग्रजांच्या 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कवितेत "एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार!" या उक्तीप्रमाणे प्रचंड दुःख, अपयश, अवहेलना वाट्याला आली असली तरी समाजोपयोगी कार्य करण्याची उर्मी कमी नाही असं हे व्यक्तिमत्व.

                          सर्व त्रास सहन करून शेणानं भिजलेली, खरकट्या पाण्याने ओली झालेली साऊमाई अक्षरं  गिरवणारी शाळेतील पाखरं पाहून सगळे दुःख विसरायची. कोणताही पगार किंवा पुरस्कार यासाठी मिळणार नव्हता. मिळणार होतं माती, दगड, अपमान, त्रास, विरोध. तरीही सच्च्या समाजसुधारणेसाठी, स्त्री उद्धारासाठी द्वेष पत्करणारी ही माऊली ३ जानेवारीशिवाय कुणाला नाही आठवत नाही, यासारखे दुर्दैव ते कोणतं? मुलींच्या पहिल्या शाळेचं स्वागत करणाऱ्या त्यांच्याच भिडे वाड्यात आज वेश्या व्यवसाय उभा रहावा हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्भाग्य नाही तर काय? स्त्री शिक्षणाचा गंध जिथे दरवळला तिथेच आज स्त्रीचं स्त्रीत्त्व गहाण पडलेलं दिसतंय, वासना आणि पैशांच्या बाजारात. माणुसकीचं अन् स्त्रीजन्माच नरडं फोडण्यासाठी बेभान होणाऱ्या भ्याड, जंगली, पशुसम समाजव्यवस्थेच्या, नीच विचारांनी बाधित जातीव्यवस्थेच्या गळ्यात स्त्री-शिक्षणाची साखळी बांधून खुंटीला अडकवणारी वाघीण म्हणजे सावित्रीबाई फुले.

                            समाजात भिनलेल्या असमतेच्या विषावर मात करून तेव्हा आणि आजही एकात्मता निर्माण करणारी जी ठिणगी दिसते तिचा उगम सावित्रीबाईंच्या कर्तृत्वात आहे. मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत साऊ शिक्षिका झाली, मुख्याध्यापिका झाली. सावित्रीच्या रूपात नवा इतिहास, नवं धैर्य समाजासमोर उभं ठाकलं. पण एवढंच मर्यादित काम नव्हतं सावित्रीबाईंचं. दहा वर्ष शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांनी स्त्री शिक्षणाच्या नव्या वाटा शोधल्या. तत्कालीन परिस्थितीनुरूप अभ्यासक्रम तयार केला. भारताच्या आधुनिक शिक्षणाच्या शिल्पकार म्हणून साऊमाईंचं नाव इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांत नोंदवले गेले. पन्नास वर्ष समाजात सतत शैक्षणिक कार्य, सामाजिक पारंपारिक व्यवस्थेच्या बुरसट कल्पनांच्या विरुद्ध स्त्रीमुक्तीचं आभाळ खुलं करण्याचं क्रांतीकारी कार्य, स्त्रीला प्रथमतः माणूस म्हणून सिद्ध करणं, स्त्री शिक्षणाची समाजात जाणीव निर्माण करणं, बंदिस्त स्त्रीच्या गुलामगिरीविरुद्ध बंड करणं, केशवपनाविरुद्ध न्हाविकांचा संप आणि भारतातील पहिला आंतरजातीय विवाह घडवून आणणं असं संघर्षशील कर्तृत्व सावित्रीबाईंचं होतं.

                                सावित्रीबाई वक्त्या होत्या, आद्यकवयित्री होत्या. माणसं मारणाऱ्या, माणसामाणसांमध्ये द्वेष उत्पन्न करणार्‍या लेखण्या निर्माण होण्याच्या भयानक काळात साऊजोतिबांची माणसं तारणारी, एकेश्वरवादाचा सिद्धांत सांगणारी लेखणी उदयास आली. अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या, अठराविश्व दारिद्र्य उराशी असणाऱ्या हरिजन गिरीजन, अडलेल्या नडलेल्या, वर्णव्यवस्थेच्या चौकटीत पिडलेल्या, शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व स्त्रियांचा उद्धार साऊमाईंनी केला. गळ्यात मडकं, कमरेला कुंचा आणि सावलीचा सुद्धा विटाळ असणाऱ्या माणसांना घरातला पाण्याचा हौद पिण्यासाठी खुला करणारा ज्योतिबा जिचा जन्माचा सोबती होता अशी साऊ अवघ्या समाजाची पालनकर्ती झाली. लहुजी वस्तादांच्या तालमीत तयार झालेल्या ज्योतीबांनी साऊला अभय दिलं आणि साऊमाईंनी उभ्या स्त्रीवर्गाला! परिस नावाची एक कल्पित गोष्ट सत्यात उतरली असेल तर ती यांच्याच रूपात. ज्यांनी दीनदलितांच्या आयुष्याचं सोनं केलं.

                              विधवा पुनर्विवाहाची संधी नसताना गर्भधारणा झालेल्या स्त्रीला जीव देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यावेळी समाजाने केलेल्या पापाची भागीदारी फक्त स्त्रियांचीच होती. 'बालहत्या प्रतिबंधक गृह' स्वतःच्या घरात सुरू करून या माऊलीने तीस-पस्तीस बाळंतपण केली. त्या स्त्रियांची नावं त्यांनी कोणालाही कळू दिली नाहीत. शंभर अनाथ,अनौरस मुलांना त्यांनी सांभाळलं. त्यातलाच यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केलं. विद्येच्या क्षेत्रांना सीमा नाही आणि समाज, स्त्रीउद्धाराला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे सांगणारी सावित्री अंधाराचा काळ आणि मुक्तीचं आभाळ झाली. बाबा आमटे यांच्या 'ज्वाला आणि फुले' या कवितेतल्या ओळी मला आठवतात.

लक्ष लक्ष रक्तामधल्या पेटल्या मशाली

दुःख या धुळीचे येथे धुंद घाम गाळी

वेदना जीवाची येथे साधनाच झाली!

               समाजसुधारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्याऐवजी विचारांची कृतीत पेरणी करायला हवी. इतका छान काम केलेलं असतानाही आज एकविसाव्या शतकात साक्षर समजल्या जाणाऱ्या समाजात काही तरी विचित्र घडतंय, याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे...

                  ज्योतिबा आणि सावित्री यांच्या जीवनावर आधारित 'सावित्रीज्योती - आभाळाएवढी माणसं होती' नावाची समाजप्रबोधनाची सोनी मराठी चॅनलवरील २०६ एपिसोड पूर्ण करणारी एक टिव्हीवरील सिरीयल केवळ टीआरपी किंवा जाहिराती नसल्यामुळे दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी खेद व्यक्त करत बंद केली. प्रेक्षकांची चव चटपटीत, मसालेदार झाली आहे. त्यांना वैचारिक, पोषक काहीही नकोय. थोर समाजसुधारकांचे विचार जिवंत ठेवण्याचं कार्य होणे गरजेचे आहे. महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या बुद्धीची कीव येते. समाजसुधारकांची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवायलाच हवी. अण्णाभाऊ साठे, आंबेडकर समाज विधायक कार्य करणाऱ्या पुरुषांना विचारांतून जिवंत ठेवायला हवं. प्रेक्षकांनी अभिरुची आता बदलायला हवी. मनोरंजनासोबत ज्ञानवर्धकही पहायला, वाचायला हवं. साऊज्योती मालिकेतील निर्मितीचं चोख काम, कलाकारांची उत्तम निवड, मोठ्या सेटची उभारणी, निर्मितीमूल्य, चांगल्या पद्धतीचे लिखाण आणि योग्य सादरीकरण असतानाही अशा समाज विधायक मालिकांना प्रेक्षक वर्ग न मिळणं, ही खरी पुरोगामी महाराष्ट्रातील शोकांतिका. उत्तम दर्जाच्या मालिकांना पाठ फिरवणाऱ्या, फक्त मनोरंजनामागे धावणाऱ्या बुद्धिजीवी किंवा समस्त महिलांनी हा विचार करायला हवा. टीव्हीसमोर बसणारे बहुतेक असतानाही सावित्रीज्योती मालिकांसाठी प्रेक्षक मिळत नाही हे दुर्दैव. मालिका बंद पडली पण विचारांचा बळी पडू नये एवढीच इच्छा. ज्योतीसाऊचा एकेक शब्द हृदयात ज्ञानाचा पाझर फोडत असतानाही आजकालच्या सर्व प्रेक्षकांनी सासू-सुनांची भांडण, लावालाव्या, नवऱ्याची लफडी, कौटुंबिक कलह, बुवाबाबांचे चमत्कार या मालिकांना पसंती दिलेली दिसते. पुरोगामी महाराष्ट्रात सावित्री ज्योती मालिका ही प्रेक्षकांची आवड नाही, हेच किती विसंगत आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही बदल घडवणारा एक चेहरा म्हणजेच साऊज्योती.

                त्यांचं कार्य सर्वांना माहीत आहेच, मुद्दा फक्त इतकाच की त्यांच्या प्रगल्भतेचा दरवळ आकंठ काळजात सामावून घेताना, त्यांच्या कार्याचा विसर पडायला नको. त्यांचा त्याग पुन्हा पुन्हा आठवून प्रेरणा मिळत राहावी हाच उद्देश. अभ्यास करणाऱ्या पोरींनी फक्त परीक्षेपुरत्या सनावळ्या आणि फोटोपुरती जयंती साजरी करू नये,असं मनापासून वाटतंय. विचारांचे खंदे समर्थक महत्वाचे. विलक्षण दूरदृष्टी, सामाजिक स्वातंत्र्य, समतेची आरोळी, अद्वैताचा विचार असणारी साऊमाऊली. स्त्रीच्या ईश्वररुपाची पूजा करणारी जगाच्या पाठीवर एकमेव आपली भारतीय संस्कृती आणि स्त्रीला मिळणारी वागणूक यात दरी दिसायला नको यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

                प्रत्यक्ष शक्य नसल्यामुळे नजरेने किंवा शब्दांनी व्यभिचार करणारे पौरुषत्व पाहिलं की वाटतं का झिजले या अशा कृतघ्न समाजासाठी हे समाजसुधारक? प्रत्येक स्त्रीने शिक्षणाने समृद्ध आणि ज्ञानसमृद्धीची खाण होताना, यशाच्या कळसावर विराजमान होताना, उघड्या डोळ्यांनी जग बघताना, विज्ञानाशी नाळ जोडताना साऊमाईला विसरून चालणार नाही. कारण स्त्री ही भोगवस्तू आहे इथपासून ते स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा प्रवास इथपर्यंतची संघर्षमय यात्रा स्त्री फक्त साऊज्योतीमुळेच पूर्ण करू शकली आहे.

पुस्तकांची पानं चाळताना,

ज्ञानाची सांगड घालताना,

मस्तिष्क ज्ञानात चिंब भिजवताना,

काळजात अक्षरबीजं रुजवताना,

तुझ्या माझ्या उरात दिसेल साऊ

अखंड प्रेरणेने उजळताना!

ज्योतिबा फुलेंच्या 'सार्वजनिक सत्यधर्माच्या' सोबतीनं सावित्रीबाईंनी तत्कालीन 'ब्राम्हणांचे कसब' समाजासमोर आणत 'शेतकऱ्यांचा आसूड' असा उगारला की अनेक 'दीनबंधूं'ची आणि समस्त महिलांची अज्ञानाच्या 'गुलामगिरी'तून मुक्तता केली. फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतासाठी जगण्याचं भान,  शिक्षणाचे वेड, संघर्षाचं बळ, सुधारणेची पायवाट आणि जिद्दीची प्रेरणा देणारी ही साऊज्योतीची जोडी माझ्या आईबाबांप्रमाणेच मला मनाच्या गाभार्‍यात नेहमीच पूजनीय राहील, एवढं मात्र खरं!


लेखन

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक

म.न.पा.शाळा क्र.१७४बी,कोंढवा बुद्रुक पुणे-४८

मो. ९५५२९४१२७१

4 comments:

  1. आदरणीय आयुब सर नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेखन..👍👌

    ReplyDelete
  2. उत्कृष्ट लेखन, सावित्रीमाईना जयंती दिनी आपन वाहिलेली शब्दांजली केवळ अवर्णनीय...अपेक्षा उंचावल्या आहेत आता आपल्याकडून हे निश्चित!

    ReplyDelete

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...