Wednesday, March 16, 2022

भ्रमणगाथा हरिश्चंद्रगडाची, साथ गड किल्ले प्रेमी ग्रुपची!!

 


भ्रमणगाथा हरिश्चंद्रगडाची, साथ गड किल्ले प्रेमी ग्रुपची!!

                 आठवडाभरापूर्वी ठरलेल्या नियोजनानुसार आयोजक श्री. रवी काळे सरांसोबत २९ गड-किल्ले प्रेमी निमगाव म्हाळुंगी गावात २१ ऑगस्ट २०२१ रात्री अकरा वाजता जमलो. शंकर मोरे, रविंद्र काळे, शरद काळे, वैभव नरवडे, वैभव करपे, संदिप फाळके, अजिंक्य मांढरे, प्रीतम वडघुले, आयुब शेख, शुभम डमरे, वैभव चव्हाण, रोहन शिवले, वेदांत देशमुख , सोमनाथ चव्हाण, नवनाथ काळे, श्रीकांत नागवडे, भाऊ चव्हाण, शिवाजी चव्हाण, गणेश घोरपडे, सागर काळे, धीरज चव्हाण, अमर वडघुले, सुमित वडघुले, गणेश वडघुले, अनिरुद्ध मांढरे, रवी नरसाळे, हनुमंत वडघुले, राजेंद्र मरकुटे, संदिप साळुंखे ही गडप्रेमींची यादी!! या टीममध्ये विद्यार्थी, शिक्षक, आयटी कंपनीचे विविध अधिकारी, प्रोफेसर, शेतकरी बंधू सगळे होते पण 'शिवप्रेमी' हीच सर्वांची ओळख होती.

                 मोठी गाडी, पाण्याचे मोठाले तीन जार, फरसाण, भेळ सफरचंद यांच्या जय्यत तयारीनुसार रात्री बारा वाजता ग्रुप सेल्फी काढून प्रवास सुरू झाला,हरीश्चंद्र गडाच्या दिशेने! सर्वजण उल्हसित होते. हरिश्चंद्रगडाची ओढ मनात घेऊन प्रवासासाठी सज्ज झाले होते. निमगाव म्हाळुंगी- शिक्रापूर- नारायणगाव- राजूर करत पायथ्याशी पहाटे साडेपाच वाजता आम्हीमी पोहोचलो. पाच-सहा तासांचा अखंड प्रवास. प्रवाशांची छानपैकी झोप झाली मात्र आयोजक आणि सोबत बापू यांसारखे धडाडीचे कार्यकर्ते मात्र संपूर्ण प्रवासभर झोपले नाहीत.

                  ड्रायव्हरसोबत रस्ता दाखवत, गप्पा मारत ते जागे होते. नेतृत्व खंबीर असलं की नियोजनात कसूर आणि ध्येय गाठण्यात दिरंगाई होत नाही हेच खरं. नियोजित वेळापत्रकानुसार आम्ही पोहोचलो. पावसाची रिपरिप चालूच होती. वैयक्तिक स्वच्छता, प्रातर्विधी उरकून सकाळी सात वाजता सर्वांसोबत चढाई सुरु केली. काळे सरांचं एवढं एक खास असतं की, जिथे आपण जाणार आहोत त्या गडाविषयी सर्व माहिती ते मिळवतात,मित्रांना फोन करून जेवणाची सोय कुठे उत्तम होईल? गड किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे? यासोबतच एकाच वेळी आपण आणखी काय काय पाहू शकतो? या सर्वांची चर्चा, सर्वांचा वेध ते अचूकपणे घेतात. पायथ्यापासून २७००मीटर लांब हरिश्चंद्र मंदिर होते. रेनकोट, बॅग, पाणी, खाऊ सर्व काही घेऊन आम्ही निघालो. पावसाचं बरसणं काही थांबलं नव्हतं. हिरवागार निसर्ग, भुलवणारे कडे, फेसाळणारे धवलवर्णी धबधबे, अखंड वाहणारं गार पाणी, सर्वांचा जोश पाहत आमची ट्रीप खासच होणार याचा अंदाज सहज बांधता येत होता.

              कोणत्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या प्रारंभी सांगता येत नाही, तेव्हा चालावं  खुशाल शोधात! संधीचा कोणताही क्षण दवडू नये. प्रेक्षणीय, भूल पाडणारा निसर्ग समोर असताना फोटो काढण्याचा मोह कोणाला आवरता येईल? मस्तपैकी फोटो शूटिंग करत एका धबधब्यापाशी पोहोचलो. संततधार पावसामुळे गारवा खूप होता, रेनकोट असून पावसापासून संरक्षण करता आले असते, तरीही सर्वजण भिजले. मज्जा केली. बोबडी वळविणारा गारवा असतानाही मज्जा येत होती. बाहुबली चित्रपटासारखे scene जिथे तिथे पहायला मिळत होते.

               दरीतून कोसळणार्‍या धबधब्यांचा मदहोश करणारा तुफान आवाज येत होता. निसरडा, घसरवणारा रस्ता असल्यामुळे सर्व जण नियमानुसार ट्रेकिंग करत होते. कोणीही एक्स्ट्रा वागत नव्हतं. एक दोन पोरं थोडी घसरली. काळे सरांनी सर्वांना पुन्हा सूचना दिल्या आणि गांभीर्य लक्षात घेऊन कोणीही हलगर्जीपणा केला नाही, हे विशेष. 'जोशमध्ये होश' सांभाळणारी ही टीम. यांच्यासोबत गडचढाई करताना खरंच भारी वाटत होतं. पारंपारिक किल्ल्यांपेक्षा वेगळा असणारा हा अहमदनगर मधील किल्ला. याला कोणतीही तटबंदी नाही.

               शेवटचा एक डोंगर कडा पार केल्यावर हरिश्चंद्राचे काळ्या कातळातील विलोभनीय मंदिर नजरेस आले. कलचुरी राजवंशाच्या राजवटीतील सहाव्या शतकातील हा गड आणि गडाचे निसर्ग वैभव पाहून याला 'ट्रेकर्सची पंढरी'का म्हणतात हे समजले. नेत्रदीपक सौंदर्याने नटलेले शिवमंदिर, मंदिरामध्ये भला मोठा नंदी अकराव्या शतकात झांज राजाने हे मंदिर बांधले असावे अशी माहिती मिळाली. तर कोणी बाराव्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील हे शिवमंदिर आहे असेही सांगत होते. मंदिरासमोर एक दगडी पुरातन पूल बांधला असून त्याखालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच 'मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. ही नदी पुढे पाचनई गावातून वाहत जाते.

           नाजूक कोरीव काम अजूनही या मंदिराच्या वैभवाचे दर्शन घडवते. मंदिराच्या उजवीकडे कोरलेली भलीमोठी गुहा आहे. यात भलीमोठी पिंड व चार खांब आहेत. हे चार खांब चार युगांचे दर्शक आहेत अशी आख्यायिका ऐकण्यास मिळते. गुहेसमोर रवी काळे सरांसोबत सर्वांनी प्रत्येक शिवप्रेमीला स्फुरण चढवणारी 'प्रौढप्रतापपुरंदर सिंहासनाधीश्वर....' ही आसमंताला दणाणून सोडणारी घोषणा दिली. 'श्वासाश्वासांमध्ये शिवराय' ही म्हण सार्थ ठरवणारा हा अनुभव. यानंतर मंदिरापासून १२४० मीटर अंतरावर असणारा, गडाच्या पश्चिमेकडचा 'कोकणकडा' या गडाचे सर्वांत मोठे आकर्षण आहे. हवा स्वच्छ असली की येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. इंग्रजी यु आकाराचा कडा अंतर्गोल आहे. समोरून बघितला की नागाच्या फण्यासारखा दिसतो. तिथे आम्ही गेलो पण दुर्दैव असे की पावसामुळे धुके इतके होते की पांढऱ्याशुभ्र वलयांशिवाय काहीच दिसत नव्हतं. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा बघता आला नाही हे डोळ्यांचे दुर्दैव. तिथे काही फोटो घेतले.

                   लोकं मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याची आशा व्यक्त करतात पण आम्ही तर जिवंतपणीच सह्याद्री रुपी स्वर्गाचे दर्शन घेत होतो. निसर्ग डोळ्यांमध्ये आणि क्षण काळजामध्ये सामावून पुढे तारामती शिखराकडे आम्ही निघालो. तिकडे जाण्याचा मार्ग माहित नव्हता. तरीही ५०० मीटर जंगल सदृश्य वेढलेल्या झाडाझुडपांतून आम्ही पुढे गेलो. मात्र निराशा पदरी आली. दाट धुक्यामुळे आम्हाला पुढचा मार्ग दिसत नव्हता. खबरदारी म्हणून नाईलाजाने माघारी फिरलो. प्रयत्नांना अपयश आणणारा हा अनुभव मात्र 'इतना तो चलता है!' म्हणत आम्ही सर्वजण माघारी फिरलो. भेळीचे मोकळे प्लास्टिकचे पुडे, पाण्याच्या बाटल्या सर्वकाही आम्ही खाली घेऊन आलो. 'गडकिल्ले हा आपला स्वाभिमान आणि आम्ही स्वाभिमानाला जपतो!' हे रवी काळे सरांचं मत आम्ही जपलं.

                    भुकेमुळे पायथ्याची ओढ पायांना अशी लागली होती की एक तास ४५ मिनिटांत सलग चालत आम्ही पायथा गाठला. ज्यासाठी आम्हाला जाताना चार तास लागले होते. ढगाआडच्या सूर्यनारायणाचे शेवटपर्यंत दर्शन झालेच नाही. त्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत पण दोन चार मित्रांचे वॉटर प्रूफ मोबाईल असल्यामुळे फोटोंचा खजिना रिता झाला. त्यांचे खूप खूप आभार. श्रावणामुळे शाकाहारी मंडळींनी आधी भोजन केले आणि नंतर मांसाहारी मंडळींनी चिकन-भाकरी वर ताव मारला. दुपारी साडेतीन वाजता आम्ही तिथून निघालो. रस्ता थोडा खराब असल्यामुळे दहा वाजता निमगाव म्हाळुंगी गावात पोहोचलो.

सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि यशस्वी ट्रिपचे प्रतिबिंब सहज प्रतिबिंबित झाले होते.

हिंडण्याचा नित्य घडो गुन्हा,

सजा सह्याद्रीची कैद हवी!!

मी आणि शुभम पुण्याला निघणार म्हणून काळे सरांच्या घरी भरपूर जेवलो. घरच्या माऊलींनी सुरेख जेवणाचा बेत केला होता. रात्री बारा वाजता पुण्यात पोहोचलो.

अशी अविस्मरणीय हरिश्चंद्रगडाची भ्रमणगाथा.

नव्या उमेदीने पुढच्या महिन्यात नवागड बघण्याचा निश्चय उराशी बाळगून थांबतो.

तोपर्यंत

जय शिवराय, जय महाराष्ट्र!!

आयोजक

रवी काळे सर

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान

निमगाव म्हाळुंगी

90964 65675


मार्गदर्शन

पंकज माने सर


शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक

पुणे महानगरपालिका

9552941271

🙏🏻⛳

शिक्षकांच्या मनातल्या भावना शब्दांत पेरण्याचा यत्न


नुकतीच सुरू झालेली शाळा आणि प्रभागरचनेच्या आदेशाची सणसणीत चपराक!

एकाच शाळेतल्या ११ शिक्षकांना ऑर्डर असेल तर शाळा चालवायची कशी?

शिक्षकांच्या मनातल्या भावना शब्दांत पेरण्याचा यत्न...


सुप्तावस्थेतल्या बियांना

कष्टाचं शिंपण देत,

ज्ञानासोबतच सुसंस्काराचे

कुंपण देतो आम्ही...

शाळाबंदीच्या लॉकडाऊन नामक

शिशिरानंतर

नुकतीच कुठे शिक्षणाची पालवी

बहरण्याची संधी देताना...

मध्येच प्रभागरचना, बीएलओ,

कोव्हिड ड्युट्यांची कित्येक बांडगुळं

जबरदस्तीने आमच्या

कार्यक्षेत्रावर पसरवली जातात...

चिमुकल्यांसाठी एकवटलेला

सगळा जोम पिळून,

अशैक्षणिक कामांच्या

मुळाशी ओतला जातो...

एवढं करूनही दमल्या भागल्या

त्याच शिक्षकी जीवांना

पुन्हा ऊर फुटेस्तोवर

धावायला भाग पाडतात,

वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या

गोंडस मथळ्याखाली...

अन् त्याच सरकारी शाळांचं

मरणासन्न रुपडं

दर्शवलं जातं चोहीकडे...

तितक्याच विद्रूप पद्धतीने...

मराठी शाळांच्या

दर्जाहीनतेची संमेलनं,

वर्तमानपत्राच्या पानापानावर

भरवली जातात...

अशी ही दैना सरकारी प्राथमिक

शाळांची अन् शिक्षकांचीही...

त्यापेक्षाही भलं-थोरलं कधीही

न भरणारं नुकसान असतं...

ते शाळेतल्या उज्ज्वल भारताचं!

सरतेशेवटी ज्यांचं कोणालाच

काहीही घेणं देणं नसतं!

गुणवत्ता नेहमीच

सिद्ध करतो आम्ही,

पुढेही करूच नित्यनेमाने...

पण बाबांनो....

क्षणभर पोरांसोबत थांबू तर द्या...

दिड दोन वर्ष काळवंडलेल्या

पिकांची निदान

पाहणी तर करू द्या...

शिक्षणक्षेत्रात भरघोस उत्पादनाची स्वप्नं रंगवणाऱ्यांनो,

अक्षरांची पेरणी करण्यासाठी

थोडा वेळ तर द्या...

सतत शिक्षकांना वेठीस धरण्याचा...

असा अट्टाहास बरा नव्हे!

सुज्ञास सांगणे न लगे!

✍🏼

आयुब कलाम शेख

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

9552941271

एक सरकारी शाळेतील प्राथमिक शिक्षक...

😞

वासोटा किल्ला - एक स्वर्गीय अनुभव गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी लेखन आयुब कलाम शेख



  

वासोटा किल्ला - एक स्वर्गीय अनुभव

                     १२ मार्च २०२२ रोजी रात्री साडेदहा वाजता निमगाव म्हाळुंगीमधून गाडी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपचे ४९ शिलेदार घेऊन शिक्रापूर, हडपसर, कात्रज मार्गे वासोट्याकडे रवाना झाली. महाराष्ट्रभूमीत सह्याद्रीच्या पंगतीला बसणारा, सातारा जिल्ह्यातील दुर्ग भ्रमंतीची विलक्षण अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.

                      पावशा पक्ष्यानं दरवर्षी तहान भागवण्यासाठी आभाळाकडे पाहत पावसाच्या पहिल्यावहिल्या थेंबाची वाट पहावी, अगदी तशाच आतुरतेने आम्ही प्रत्येक महिन्याला गड-किल्ले सफरीची वाट पाहतो. यंदा मात्र यात थोडं निराळेपण होतं, कारण यावेळी आयोजक रवी काळे सरांनी एकट्या दुकट्याची नव्हे तर कुटुंबाची सफर आयोजित केली होती. दर महिन्याला आमच्या बहारदार ट्रीपचं आयोजन सर अगदी यशस्वीपणे करतात. यावेळी रविंद्र काळे, विद्या काळे, आरूष काळे, गणेश घोरपडे, ज्योती घोरपडे, तनिष्का घोरपडे, अनुष्का घोरपडे, शरद काळे, वर्षा काळे, यज्ञ काळे, शौर्य काळे, वैभव करपे, ऋत्विक करपे, भरत साकोरे, प्रांजली साकोरे, स्वरूप साकोरे, वैशाली चव्हाण, कार्तिक चव्हाण, माऊली मामा, विक्रम सुर्यवंशी, अश्विनी सुर्यवंशी, सृष्टी कुसालकर, स्वराज पवळे, अमोल टाखळकर, प्रगती टाखळकर, राजेंद्र चव्हाण, मोनिका चव्हाण, विकास कापरे, श्वेता कापरे, घारमळकर रोहिदास, घारमळकर रेश्मा, विजय माने, वैशाली माने, श्रावणी माने, वेदांत माने, आयुब शेख, तमन्ना शेख, सुभाष बोरकर, स्वाती बोरकर, सुयश बोरकर, नवनाथ काळे, रागिणी काळे, यश काळे, सृष्टी काळे,  गणेश पवळे, ज्योती पवळे, या कुटुंबांसोबत अप्पा रणसिंग, शुभम डमरे या दोन अविवाहितांनाही सामावून घेतले. या सर्वांमध्ये अनेक कंपनी कामगार, आयटी, शिक्षक, शेतकरी सर्वांचा समावेश. चार वर्षांच्या चिमुरड्यांपासून पन्नाशीपर्यंत सगळेच. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं अन् त्यांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे रवी काळे सर. कोण? कुठे? कसं भेटतं? आणि ओळखीचं नातं निर्माण होतं, काहीच सांगू शकत नाही हे त्यांचं ठाम मत. 

                  सत्तेत वर्षानुवर्ष राहिलेल्या राजकारण्यांनाही आश्वासनांची खैरात करावी लागते, माणसं गोळा करण्यासाठी. इथे केवळ एका पोस्टवर माणसं तयार होतात पोराबाळांसहीत. सर्वांच्या विश्वासाचं कोंदण ललाटी लाभलेले काळे सर ही व्यक्ती केवळ अतुलनीयच. दिखाऊपणा, पैशांबाबत खादाड वृत्ती जगात बळावलेली असतानाही प्रामाणिकपणाचा चेहरा लाभलेला असा अवलिया माणूस माझ्या पाहण्यात नाही. या ट्रेकवेळी आमचे मार्गदर्शक पंकज माने सर आणि रात्रभर ड्रायव्हरला मार्ग दाखवणारा बापू हे दोघे काही कारणास्तव सोबत नव्हते, त्यांची उणीव भासत होती. तरीही त्यांच्या अनुपस्थितीत आम्हा सर्वांची जबाबदारी शरद काळे व रवी काळे यांनी यथायोग्य सांभाळली.

                   पुरुष मंडळी, बायका, चिल्लीपिल्ली पहाटे चारच्या सुमारास पेट्रीगावी एका हाॅटेलात थांबले. फ्रेश होऊन चहा बिस्किटे खाल्ली. दुपारसाठी बटाट्याची भाजी आणि चपाती पार्सल घेऊन पुढे निघालो. पुन्हा दीडेक तासांच्या प्रवासानंतर कासपठार, बामणोली वरून शेमडी गावी उतरलो. काकडी, लिंबू, पेपरमेंटच्या गोळ्यांचे वाटप आयोजकांकडून झाले. कोयना धरणाचे बॅक वॉटर म्हणजेच शिवसागर जलाशयाच्या पूर्वेकडून वासोट्याकडे जाण्यासाठी तीन बोटींमध्ये निघालो.

                       व्याघ्रगड म्हणून परिचित असणारा, नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला 'शिवसागर' ऐसे नाव. तापोळापर्यंत पसरलेले हे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते असेच म्हणावे लागेल. सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. बोटींगचा मनसोक्त आनंद आम्ही लुटला. डोळ्यांचं पारणं फेडणारा नजारा कॅमेऱ्यात कैद करण्याचा अट्टाहासही झाला.

              किनाऱ्यावर उतरून वनखात्याच्या परवानगीसाठी रांगेत थांबलो. प्लास्टिक पिशव्या, बॉटल येथे काटेकोरपणे मोजल्या जातात. डिपाॅझिट घेऊन आहे तेवढाच कचरा परत आणला की डिपाॅझिट परत केले जाईल अशी तंबीही दिली गेली. काय भारी आयडिया वापरली होती, मनुष्य नावाच्या प्राण्याला निसर्गात घाण करण्यापासून रोखण्यासाठी. पैसा अडकलाय म्हटल्यावर कशाला कचरा वाटेत टाकेल माणूस? नाक दाबलं की थोबाड उघडणारच की! मलेरिया होतो म्हणून डास मारत बसण्यापेक्षा डबकीच होऊ नयेत याची वनखात्याने घेतलेली दक्षता आवडली आपल्याला. त्यामुळे एकही प्लास्टिक बॉटल गडाच्या परिसरात आम्हाला दिसली नाही. अशीच व्यवस्था खांदेरीवर केली तर काय बरं होईल! आपल्याला जग सुंदर हवं असतं पण ते लोकांनी करावं अशी अपेक्षा असते. इतरांनी केलेल्या त्या सुंदरतेचे आपण मात्र फोटो काढून स्टेटस ला ठेवणार अन् प्रत्येक दोन मिनिटांनी कोणीकोणी बघितलंय हे न्याहाळणार. आपली जबाबदारी तेवढीच, २४ तासांपुरती. सगळंच आभासी. पण आमचा ग्रुप असा नाही. स्वतःहून कचरा उचलून गड साफ करणारा हा ग्रुप आहे. इथे कोणाच्याही जातीची चर्चा केली जात नाही, कामाची मात्र दिलखुलास चर्चा होते. देव प्रसन्न व्हावा म्हणून नैवेद्य दाखवणारे बरेच असतील पण अखंड महाराष्ट्राच्या दैवताचे गड पोरांना दाखवायचं सुचतं ते आमचे ग्रुप मेंबर!

              पुढे ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. आंब्याचा मोहोर, करवंदीच्या जाळ्यातली टपोरी पांढरीशुभ्र फुलं, लगडलेले फणस, नुसतीच हिरवळ. काय मनोहारी दृश्य दिसत होतं. भर उन्हातही किती गार अन् गडद सावली होती म्हणून सांगू. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कामी येत नाही पण झाडांच्या सावलीत कित्येक जण विसावतात. हा अनुभव आम्ही याचि देही याचि डोळा घेतला. रस्त्यात ठिकठिकाणी परिसरातील प्राणी, पक्षी, किटकांची माहिती देणारे बोर्ड लावलेत. पोरं, बायका यांसोबत ट्रेक करणार्‍या सगळ्या पुरुषांवर जबाबदारी सोबत साहित्याचंही ओझं होतंच.

                भक्कम पोलादी शरीर असणारा बाप अन् त्याच्या हृदयातल्या हळव्या कप्प्यातलं गुज सांगणारी ही भ्रमंती मी खूप जवळून निरखून पाहिली. आमचा मित्र वैभव करपे, पोराला घेऊन आलेला मातृहृदयी बाप मी पाहिला. तसा बघितला तर हा वजनदार माणूस पण ट्रेकला कधी हरला नाही. प्रत्येक वेळी आम्हा सगळ्यांसोबतच. पण आज प्रत्येक पाऊल पोराच्या चालीनं, गतीनं टाकत होता. त्याला काय हवं? काय नको? याची आई पेक्षाही जास्त काळजी वाहत होता. आरुषचे बाबा अन् आई सर्वांत शेवटी. चार वर्षाचं पोरगं चाळीस वर्षांच्या माणसालाही मागे टाकत दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या उत्साहात गड चढत होतं.

               प्रत्येक व्यक्तीत एक 'वल्ली' दडलेली असते. जिथे भल्यामोठ्यांची गाळण झाली तिथे चार-पाच वर्षांची पोरं मजल मारत होती आणि तळहातावर द्रोणागिरी पर्वत उचलणाऱ्या हनुमंतासारखे भीमरूपी महारुद्र झालेल्या बापाचं काळीज सुपाएवढं झालेलं आम्ही या उघड्या डोळ्यांनी पाहिलं. लाकडी बंदुकीने ठोठो गोळ्या झाडणारा सुयश, हसरा उत्साही चार वर्षांचा आरुष, न थकता गड चढणारा पाच वर्षांचा वेदांत, अनुष्का, तनिष्का, श्रावणी ज्यांनी आमच्यासोबत धरणात पोहण्याचा आनंद घेतला, स्वरूप ज्याने प्रथम गडाचं टोक गाठलं, न थकता पावलं टाकणारा पाच वर्षांचा चिमुरडा ऋत्विक, स्वराज, शौर्य यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. धन्य ते पालक ज्यांनी पबजी, फ्री फायर यांसारख्या गेम मधून पोरांना बाहेर काढत राजांचे गड दाखवण्याचा निश्चय मनाशी बांधला आणि तो सत्यात उतरवला.

              अर्धाअधिक किल्ला चढल्यावर किर्र आवाजात किड्यांनी आमचं स्वागत केलं. निसर्गाला हानी पोहोचवत वृक्षतोड तर करायला ही गर्दी जमली नाही ना? असं मनाशी ठरवत जास्तीत जास्त ओरडण्याचा ते किडे प्रयत्न करत होते, असा भास होत होता. लक्ष वेधून घेण्यासाठी, नुसताच गोंधळ घालणाऱ्या हट्टी लेकरांसारखं. या कल्लोळात निसर्ग जपण्याची तंबी देणारा हा प्रखर आवाज माणसाला ओळखता येईल का? हाच विचार डोक्यात वळवळत होता. काहीसं पुढे गेल्यावर घसरणारी मातकट उतारी पायवाट आहे. आम्ही बरेचजण घसरलो. महिला मंडळ पुढे होतंच, पण एका वहिनींनी साडी नेसून गड सर केला याचे कौतुक आम्ही सर्वांनी केले. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीच्या रानातून किल्ल्याच्या पायर्‍या लागल्या. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश केला.

              गडाच्या प्रवेशद्वारावरून दिसणारा निसर्गरम्य देखावा आपल्याला मुग्ध करतो. पुढे पाण्याचे टाके आहेत. गडावरच्या कित्येक वास्तू लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वाटेवर मारुती मंदिर नजरेस पडते. वेदांत आणि स्वरूप या चारपाच वर्षांच्या चिमुकल्या जीवांनी गडावर प्रथम वर्दी दिली. सावली बघून एकत्रित वनभोजनाचा आस्वाद आम्ही घेतला. चिक्की, द्राक्षे, काकड्या, लोणचं, चिवडा सगळं काही एकमेकांना वाटून खाल्लं! श्रावणीने शिवगारद, वेदांतने छोटंसं भाषण केलं. माने सरांच्या शिवरायांवर आधारित कवितांचा रसास्वाद घेतला. सरांनी सर्वांना शब्दवलय काव्यसंग्रह भेट दिला.

            पुढे महादेव मंदिराजवळून उत्तरेकडील माची पाहिली. इतर गडांसारखं या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. येथून नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणाऱ्या पवनऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्याही सौंदर्यात भरच घालतात. अनेक डोळे असेही आहेत जगात ज्यांनी फुलं पाहिली नाहीत, आभाळाचा रंग पाहिला नाही, जन्मदात्री आई, सूर्य, चंद्र पाहिला नाही कारण डोळेच दिले नाहीत निसर्गाने त्यांना. आपण तर डोळस आहोत, कमावते आहोत, काय हरकत आहे असा निसर्गानुभव घ्यायला. मन भरून सुगंध आणि आकंठ निसर्गरम्य दृश्य डोळ्यांत सामावून घ्यायची इच्छा ठेवून सज्ज व्हायला हवे.

            वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य याची पुरेपूर प्रचिती आम्हाला आली. महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला ६ जून १६६० रोजी घेतला, अशी माहिती इतिहास दप्तरी नोंद आहे. दोनेक तासानंतर गड उतरून थकूनभागून आम्ही एका झऱ्याकाठी थांबलो, फ्रेश होण्यासाठी. तेवढ्यात एक उच्चशिक्षित महिला आपल्या छोट्या मुलीला, "तुला पाण्यातले मासे पहायचेत का? असं सांगताना दादा आणि अप्पा यांनी ऐकले. 'पाण्यातले मासे' म्हणत भरपूर हसवलं. ज्यांना मनसोक्त हसायला आवडतं त्या प्रत्येकाला दादा, तुम्ही आवडता! तरी बरं डाॅक्टर आणि नाना यावेळी नव्हते, नाही तर पोट दुखेपर्यंत नेहमीच आम्ही हसतो. तिथून पुढं 'पाण्यातले मासे, पाण्यातले खेकडे' अश्या विनोदांची लहरच आली.

             खरं सांगायचं तर, अमरत्व कोणाला लाभलंय जगात? असा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांच उत्तर एकच... आपल्या स्मृतीतून जो कधीच नाहीसा होत नाही तो अमरच की! या ग्रुपची ही सगळी माणसं जीवनाच्या अंतापर्यंत लक्षात राहतील, ह्रदयाच्या गाभाऱ्यात अमर होतील, एवढं मात्र नक्की. पुन्हा शिवसागरातून बोटींच्या प्रवासानंतर काठावर उतरून मनसोक्त पोहलो. सगळा शीण निघून गेला.

           पेट्रीगावी येऊन चिकणभाकरीवर ताव मारला. सगळ्यांत शेवटी आयोजक जेवले. लेकीचं लग्न लावताना सगळं कसं सुरळीत पार पडलं या प्रसन्नतेने बाप असाच शेवटी दोन घास पोटात ढकलतो. वेळोवेळी हजेरी घेणारे काळे सर मला लहाणपणीच्या सहलीतले शिक्षकच वाटतात. ज्यांच्यावर प्रत्येक मुलाच्या आईने 'माझ्या मुलावर लक्ष ठेवा' अशी विनंतीवजा ताकीद दिलेली असते. गाडीत बसल्यावर थकलेल्या जीवांची ब्रम्हानंदी टाळी लागावी अशी अवस्था. सुखाची व्याख्या यापेक्षा काय निराळी असेल? असा विचार करत मी ही झोपलो. कारण यावेळी शेवटच्या सीटवर बसून माझी नीट झोपच झाली नव्हती. हा हा हा हा हा...

            अकरा वाजता घरी सुखरूप पोहोचलो. दुर्ग भ्रमणाची मनीषा या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपमुळे सत्यात उतरली. प्रतिव्यक्ती केवळ ११५०/- रुपयांमध्ये स्वर्गीय सुखाचा अनुभव आम्हाला मिळाला. यावेळी ट्रेकिंगच्या खर्चापेक्षा महिला मंडळाच्या खरेदीलाच जास्त पैसे गेल्याचे सर्व पुरुष मंडळींनी कबूल केले. सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या आठ चिमुकल्या पोरांना मोफत ही सफर घडवून आणणाऱ्या आयोजकांचे आभार.

नारायण सुर्वे म्हणतात,

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दिवस दुःखात गेले.

हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे?

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली.

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली!

       अशी आपली गत होऊ नये म्हणून कमावताय तुम्ही पैसे तर त्याचा उपभोगही तुम्हीच घ्या ना. आयुष्यात काय कमावलं? असा प्रश्न पडू नये आणि पडला तर त्याचं उत्तर फक्त पैसा असू नये, असं मनापासून वाटतं. संपत्तीचा डोंगर उभारून पुढच्या पिढीच्या पोरांना आयदाड बनवण्यात कसलं आलंय शहाणपण? शिवरायांच्या पायाशी जडलेली नजर सुटू नये यासाठी राजांचे जोडे उराशी कवटाळून श्रीमंत सकल सौभाग्यसंपन्न पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या. आपल्याला त्याच राजांचे ऐतिहासिक साक्ष देणारे किल्ले पाहता आले तरी जन्म सफल झाला म्हणता येईल.

चला तर मग, पुढच्या महिन्यात नवीन दुर्ग पाहू...


आयोजक

रवी काळे सर

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान

निमगाव म्हाळुंगी

90964 65675


मार्गदर्शन

पंकज माने सर

7709159044


शब्दांकन

आयुब शेख सर

प्राथमिक शिक्षक

पुणे महानगरपालिका

9552941271

🙏🏻⛳

Monday, March 7, 2022

वैचारिक महिला दिन! लेखन - आयुब कलाम शेख प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका

 







वैचारिक महिला दिन! 

                         विज्ञान दिन, मातृभाषा दिन, स्वातंत्र्यदिन हल्ली असे बरेच दिवस इव्हेंटप्रमाणे साजरे करतोय आपण. फक्त स्टेटस ठेवणं किंवा शुभेच्छा देण्यापुरतंच मर्यादित नसेल तर खरोखरच चांगली गोष्ट आहे ही सुद्धा. निदान या दिनांच्या निमित्ताने जाणीव तरी होते असं काहीतरी असतं याची. आज ८ मार्च, जागतिक महिला दिन. खरं तर एका दिवसापुरतं साजरं करण्याइतपतच संक्षिप्त स्वरुप या दिनाला नाहीच मुळी. उभ्या आयुष्याची सुरुवातच जिच्या असण्याने होते, अशा स्त्रीचा फक्त एक दिवस कसा असू शकेल बुवा? पण महिला दिनानिमित्त रांगोळी, मेहंदी, केशभूषा, सौंदर्य स्पर्धांचे अनेक ठिकाणी आयोजन केलेलं पाहिलं की वाटतं, सगळ्यांच्या लेखी महिला अजूनही सजवायचीच वस्तू आहे की काय? यांसोबतच कर्तृत्व दाखवणाऱ्या स्पर्धांचंही आयोजन आवर्जून व्हायलाच हवं.

                            पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्ञानेश्वराचा राग आणि चांगदेवाचा अहंकार घालवणारी मुक्ताई, बुरसटलेल्या विचारांच्या नवऱ्याला तुकोबांसारखा गुरु मिळवून देणारी बहिणाबाई, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यात उतरवणारी शिवबा निर्माती जिजाऊ, अखंड उपेक्षितांची आई, बाबासाहेबांची सावली रमाई, मुलींसाठी शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेली साऊमाई आणि तितक्याच प्रखरपणे साथ देणारी फातिमाबी शेख, निर्भीड लेखिका ताराबाई शिंदे, आदर्श राज्यकारभार करणारी अहिल्याबाई होळकर, पाठीवर मुलाला घेऊन लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अंतराळाची सफर करणारी कल्पना यांसारख्या कित्येक स्त्री-प्रवाहांनी प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवून दिलंय स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व. या स्त्रियांची थोरवी आभाळमोलाची आहेच पण प्रत्येक कुटुंबासाठी झटणारी आजची स्त्री यांपेक्षा निराळी नाहीच मुळी! घराबाहेर राबणाऱ्या आईच्या चिमुकल्या मुली तर लहानपणापासूनच आपल्या छोट्या भावंडांची आई बनून जातात. अनेक महिलांचं कर्तृत्व आपण पाहतोय उघड्या डोळ्यांनी. नुकतंच भारतीय महिलांच्या क्रिकेट टीमनं विश्वचषकात अंतिम फेरीत स्थान पटकावलं, विजांसारख्या त्या कडाडल्या. क्रिकेटसारखा खेळ फक्त पुरुषांची मक्तेदारी असण्याच्या कार्यक्षेत्रात स्त्रियांनी विजयाचे झेंडे रोवले. महिलांकडे पाहण्याची अक्षरशः नजरच बदलून टाकली.

त्यांच्या तर उंबऱ्यानेही गाठली उंची नभाची,

ज्यांची चौकट चुलीपाशी जगाने बांधली होती!

असं चित्र रेखाटले आहे आजच्या पोरींनी. तरी आजही लेकीच्या जन्मावेळी बापाचा धीर खचतो. मुलीची नाळ आईपासून अलग होते न होते तोच हुंड्याची तडजोड, सुरक्षिततेचा प्रश्न डोक्यात वळवळू लागतो. मुली फक्त वंशाच्या दिव्याची सोय करणाऱ्या ठरतात, आजही.

                   किती निर्बंध पोरींवर? शालेय विद्यार्थ्यांना पुढे करत कुणीतरी पेटवतंय हिजाब आणि भगव्या शेल्यांचं राजकारण अगदी शाळा महाविद्यालयांच्या सुपीक रानातही. जिथे समता, समभावाची शिकवण पेरली जाते, उज्ज्वल भारताच्या भविष्याचं पीक घेतलं जातं. तिथं जातीवादाच्या दंगली घडवणाऱ्या अंधभक्तांनी नासधूस माजवलीये. मुलींनी कोणता पेहराव करायचा? हे मुलींनाच ठरवू द्या ना. तिच्या हिजाबला विरोध करणाऱ्या किंवा मुलींनी किती अंग झाकावं, किती उघडं ठेवावं? याचे पूर्वापार नियम बनवणाऱ्या किती जणांनी आपल्या बहिणीला ड्रेस घेतलाय? कित्येकांनी आईला साडी दिलीये, स्वतःच्या कमाईतून? याचीही चर्चा होऊ द्या की. जिवंत माणसांच्या कवट्या फुटायची वेळ आली तरी जातींचे मुडदे जळत नाहीत, अशी दयनीय अवस्था काय कामाची?

                           कित्येकदा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तो सगळ्यात मोठी अडचण आपल्या बायकोची करतो. निराधार करून जातो तिला. दुष्काळाला कंटाळून महिला शेतकऱ्यांनी किंवा बळीराजाच्या बायकांनी आत्महत्या केल्याचे चित्र सहसा दृष्टीक्षेपात नाहीच. शेतकऱ्यांच्या बायकांना जीव द्यायचीही सोय नाही. लेकरांचे चिमणे चेहरे दिसतात त्यांना आणि हात पुन्हा कष्टांकडे वळतात, अगदी सहज. आत्महत्या करण्यात पुरुष आघाडीवर तर स्त्रिया शेतात राबण्यात अव्वल आहेत. कुठून एवढा आशावाद या मायमाऊलींमध्ये येतो कुणास ठाऊक? कधी नकोसं वाटलंच जिणं तर अशावेळी 'नाम' सारख्या संस्था पाठीशी भावासारख्या भक्कम उभ्या राहतात. अश्रू पुसण्यासोबत आधाराचा हात देतात. आपणही अशा वेळी सहकार्य करण्याची दानत दाखवायला हवी. रस्त्याला भाजीपाला विकायला बसणाऱ्या शेतकरी मायमाऊलीला कोणताही मोलभाव न करता खरेदी करायला हवी. दत्ता हलसगीकर सुचवतात,

ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी  दोन फुले द्यावीत,

ज्यांचे सूर जुळून आले, त्यांनी दोन गाणी द्यावीत!

ज्यांच्या अंगणात झुकले ढग, त्यांनी ओंजळ पाणी द्यावे,

आपले श्रीमंत हृदय त्यांनी, रिते करून भरून घ्यावे!

आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे,

मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडं उचलून घ्यावे!

यानुसार जगायला काय हरकत आहे?

                          ऑस्ट्रेलियातून शिकून आलेला, आयटी क्षेत्रात उद्योग सुरू करणारा संगमनेरमधील गिरीश लाड हा एक तरुण. तंत्रज्ञानाचा वापर करत 'सेव्ह द गर्ल' उपक्रमाचा त्याने पाया रोवला. कोल्हापुरात सोनोग्राफी मशीनसाठी एक ट्रॅकिंग यंत्रणा लावली. त्यामुळे गर्भपाताला आळा बसायला मोठी मदत झाली. मुलींचं हजारामागे ८२९ प्रमाण होतं ते ८८० पर्यंत वाढलं. स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर लिहिणारे, आतडीला पीळ बसेल एवढं कोकलणारे खूप. पण 'सायलेंट ऑब्झर्व्हर' या मोहिमेत स्त्रीभ्रूणहत्या प्रमाण कमी करणारे गिरीश लाड देशासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. 'बेटी बचाव' च्या जाहिरातीवर होणारा सगळा खर्च योग्य कृतींसाठी वापरला तर चित्र वेगळं दिसेल, एवढं मात्र नक्की.

                                 एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. माझ्या शाळेतल्या वार्षिक स्नेहसंमेलनात चौथीच्या 'देश रंगीला' या नृत्यात सावळ्या थोडक्यात काळ्या रंगाच्या पोरीला भारत माता का दाखवली ? जरा उजळ पोरगी नव्हती का ? असा प्रश्न विचारणारी सहकारी स्त्री शिक्षिका मला अजूनही लक्षात आहे. भारतभूमी, धरणीमाय  काळीच असते मग भारतमातेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरीचं काळं रुप का चालत नाही ? का पचत नाही आपल्याला ? मुलींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जो आतून स्वच्छ तोच बाहेरून चमकतो. तुम्ही कसे दिसता याच्याशी आनंदाला काहीही घेणं देणं नसतं. तो कुणाच्याही चेहऱ्यावर येतो. तो चेहरा कसाही का असेना. आपोआप सुंदर दिसू लागतो. घामाच्या थेंबांनी डवरलेल्या साजसौंदर्याची तुलना मेकअप केलेल्या भपकेगिरीशी कशी करता येईल? निराशेची चौकट काढून टाकली की आत्मविश्वासाने उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावणारच नाही मुळी! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा वेगळाच दृष्टीकोन असतो. आपण मात्र आपल्याच रंगात रंगायचं. खुल्या मनाने, मोठ्या दिलाने विचार करायचा. मुखवटा वापरायचाच नाही, आंतरिक सौंदर्यावर भर द्यायचा. फेअरनेस क्रीम, पावडर, लिपस्टिक यांचा वशीला हवाच कशाला? आतून उजळण्यासाठी कला, कौशल्य, पुस्तकं, साहित्य, पदव्या, शिक्षण अशा आभूषणांनी कर्तृत्वाची उंची गाठायची! केवळ वरलिया रंगा भुलू नये, मनही लोभसवाणं आहे अशी माणसं जगात खूप दुर्मिळ असतात. आपणही त्यातलंच एक व्हावं, हे लक्षात ठेवायला हवं.

                         लोकल ट्रेनमध्ये लेडीज डब्यात भाज्या निवडत घरी जाणाऱ्या बायका आणि जनरल डब्यात जगभराच्या गप्पा मारणारे पुरुष कितीदा पाहतो आपण. आयुष्यभर संसाराचीच काळजी वाहतात बायका. तरीही उपेक्षितच राहतात. पण काही पुरुष देतात समानतेचा हक्क स्त्रियांना. मुलामुलींमध्ये नाहीत भेद करत. लेकीला परीसारखं जपतात. केवळ एकच मुलगी अपत्य असणारी कित्येक घरं मी पाहिलीयेत. त्या घरांत महिला दिन साजरा करण्यासाठी ८ मार्चची वाट बघत असतील का?

                        आदीवासींचा संघर्ष, धरणग्रस्तांची हाक आणि नर्मदेच्या पाण्यासाठी लढणाऱ्या समाजसेविका मेधाताई पाटकर, बाबा आमटेंची अर्धांगिनी, कुष्ठरोग्यांसाठी 'आयुष्याची समिधा' अर्पण करणाऱ्या साधनाताई आमटे, गडचिरोलीत महिलांच्या आरोग्याची काळजीवाहू डॉ. राणी बंग, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांसारख्या असंख्य स्त्रिया समाजोद्धाराच्या वाटा धुंडाळत आहेत, नव्याने स्वत्व शोधत कर्तृत्वाची मोहर उमटवत आहेत. त्यांचं कार्य या दिनानिमित्त अधोरेखित होणे गरजेचे आहे, समस्त महिलांना ऊर्जा मिळण्यासाठी.

                        करिअर ऐन भरात असताना अनघा मोडकची डेंग्यूच्या निमित्ताने दृष्टी गेली. कायमच्या अंधत्वावर मात करत आकाशवाणीवर ती निवेदिका झाली. अंधाराला प्रकाशाचं कोंदण ठरली. छंदाचा मुक्तछंद करत आत्मविश्वासाने तिच्या प्रतिभेचा गाभारा उजळत राहिला. दुःखालाही चिमटीमध्ये धरत त्याचं फुलपाखरू तिनं केलं. दूरदर्शनवर एबीपी माझाच्या 'माझा संघर्ष आणि मी' या कार्यक्रमात निवेदिका होत अनेक अंध, अपंग, मतिमंदांच्या उत्कर्षाच्या कहाण्या तिने मांडल्या पण हरली नाही, रडली तर मुळीच नाही. तिचा कार्यक्रम पाहताना गुरु ठाकूरच्या ओळी मला आठवल्या,

खोचते वीज पंखात जरी पदरात

तिच्या सांडून चालली माया,

ओठात हसू गोंदून उभी निक्षून

जणू उभं आभाळ पेलाया!

                            आणखी एक उदाहरण. डॉ. उज्ज्वला सहाणे यांनी आपल्या १००% कर्णबधिर अन् जन्मतःच पांगळ्या पोरीला भरत नाट्यातली श्रेष्ठ नृत्यांगना म्हणून जगासमोर उभं केलं. हेलन केलर वाचली आणि पोरीसोबत आत्महत्येचा त्यांचा विचार गळून पडला. नवीन आयुष्याचा प्रारंभ झाला. निसर्गाने दिलेल्या आपत्तीची संपत्ती करत लेकीच्या आयुष्यात पश्चात्तापाऐवजी नृत्याची हळुवार निःशब्द कविता त्यांच्यामार्फत उमटली. अशा असतात स्त्रिया ज्यांना वर्षानुवर्षे आपण अबला म्हणत राहिलो, त्यांनी सबला असण्याचं अढळपद सिद्ध केलं.

                       आपण जाणतोच, मृत्यूसाठी असंख्य वाटा असतील पण जन्मासाठी एकच, ती म्हणजे आई! बाळाच्या सुखासाठी देहाच्या चिंध्या करणारी प्रत्येक आई हिरकणीच असते. काही दिवसांपूर्वी वाचलेला एक प्रसंग नेहमी माझं मन सुन्न करून टाकतो. एका वृद्ध आईच्या दोन मुलांपैकी सकाळचं जेवण एक मुलगा आणि रात्रीचं दुसरा देतो. आईच्या जेवणाची अशी समानतेची शिकवण देणारी वाटणी फक्त मायदेशातच घडत असावी बहुतेक. आईच्या चेहऱ्यावर याबाबत चिंता स्पष्ट जाणवत होती. कोणीतरी सहज विचारताच थरथरत तिचे बोल पाझरू लागले. "थोरल्या लेकाची काळजी वाटते रे. त्याला एकुलता एक पोरगा. तो आत्ताच हे सारं बघतोय. बापाला म्हातारपणी संध्याकाळचं जेवण मिळणारच नाही बघ!" अतीव दुःखाने मिटलेल्या तिच्या पापण्या आणि चेहऱ्यावरचं विकृत हास्य अस्वस्थ करणारं होतं. 'पुरुषी पांडुरंगालाही माऊली' म्हणणार्‍यांना आपल्या घरातलं हे दैवत का दिसतं नसावं?

                        आणखी एक अनुभवलेला खराखुरा किस्सा सांगू इच्छितो. आईवडिलांपासून वेगळं राहणारा, बऱ्याचदा आईला नावं ठेवणारा एक मित्र मी खूप जवळून अनुभवला. काही दिवसांपूर्वी आईच्या वर्षश्राद्धानिमित्त 'आई तुझी खूप आठवण येते, तू अजून हवी होतीस!' असं त्याचं स्टेटस ठेवलेलं मी परवा पाहिलं. हे बोल समोर ती व्यक्ती जिवंत असताना बोलावं असं का वाटलं नाही त्याला?

                    वेळ निघून गेली खरंतर. आता सूर्यास्तानंतर रेंगाळणाऱ्या धूसर, अस्पष्ट संधिप्रकाशासारख्या या स्मृती जतन करण्याऐवजी त्याचवेळी प्रखर ऊन्हासारखं एकदा कडकडून आईला भेटता आलं असतं तर? जन्मदात्या आईचं असं काय चुकलं असेल की तिला पूर्णतः आयुष्यातून बहिष्कृत करावसं वाटलं असेल एखाद्या मुलाला? धडधडणारं हृदय अन् त्यासोबत लेकराला अमूल्य जीवनाचं दान बहाल करणाऱ्या आईचा एखादाही अपराध आपल्याला पोटात घालता येत नसेल तर आपण तिचं अपत्य म्हणायच्या तरी लायकीचे आहोत का? आई नामक त्या ज्योतीची शक्ती उमगण्यासाठी कायमचा अंधार होण्याचीच वाट पहायची का?

                      आई मेल्यावर तसबिरींना बकुळीचा घमघमणारा हार घालणं, वृत्तपत्रात किंवा स्टेटसला 'तुझ्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही.' अशा दिखाऊ वात्सल्याच्या जाहिराती सर्रास देणं या सर्वांपेक्षा मोलाची आहे, जिवंत असताना त्या क्षणी दिलेली आर्त साद, तो आपुलकीचा संवाद. उभा जन्म लेकरांच्या जिंदगानीवरून ओवाळून टाकणाऱ्या आईला दोन सुखाचे घास भरवता येत नसेल तर त्यासारखं नरकजिणं कोणतं? मुलं हेच आपलं विश्व समजणारी जन्मदात्री अचानक कशी काय एवढी जड वाटू लागते? की घरातली एखादी अडगळ भासू लागते. आपल्या धडधडणाऱ्या ह्रदयाला तिच्या कित्येक त्यागाचं कोंदण लाभलंय याची मुलाला कधी चाहूलच जाणवतच नसेल का? पुरुषार्थ कितीही गगनभेदी असला तरी तो निपजतो स्त्रीच्या ममतामयी कुशीतच. आपल्याकडे फुलं आहेत पण ती आपल्याला जिवंत माणसाला देण्याऐवजी कुणाच्यातरी समाधीवर वाहण्याची जास्त इच्छा असते, हेच खरं.

                        मुलाचा अट्टाहास करणाऱ्यांनो, जर मावळत्या काळात अंधारच असेल तर वंशाचे दिवे तुम्हाला हवेतच कशाला? पणत्यांचा प्रकाश कुठे अपुरा पडतोय सध्या? कित्येकांना वृद्धापकाळात आधारासाठी वेलींचाही आधार होतोयच की!प्रत्येक आव्हानांना स्त्री संयमानं, सकारात्मकतेनं सामोरी जाते. समजुतदारपणा, क्षमाभाव, सहनशीलता, वात्सल्य, अमाप प्रेम ही फक्त स्त्रियांची कशी काय मक्तेदारी असू शकते? असा नेहमी विचार डोक्यात येतो.

                        परवा सुमित्रा भावे यांचा 'बाई' नावाचा चित्रपट पाहिला. महानगरपालिकेतील एक झाडूवाली. तिचा बेवडा नवरा जाम मारायचा तिला. तिनं कष्टाने दोन पोरं मोठी केली, शिकवली. एके दिवशी आईला मारताना मध्ये पडली दोघं. चित्र बदललं. नवरा हादरला. पिऊन आला की कोपऱ्यात गप्प बसायचा. मध्यरात्री किचनमध्ये भांड्यांचा अचानक तिला आवाज आला. उठून बघितलं नवरा चोरून काहीतरी खात होता. बाईला रडू आलं. "अरे घर तुझंय बाबा, मी नाही तुला उपाशी ठेवायची. खा पोटभर." म्हणत मागचे सगळे हाल विसरत नवऱ्यासाठी तिनं हंबरडा फोडला. अशा घर संसार चालवणाऱ्या शहाण्या बायका भारतात घरटी एक या संख्येने आहेत, म्हणून संसार व्यवस्था टिकून आहे.

                       लग्नानंतर नावात बदल करत आयुष्यभर दुसर्‍याचं नाव घेत मिरवणं पुरुषांना जमेल का? कित्येक नवरे तर लग्नापर्यंत जपलेलं स्त्रियांचं नावरुपी अस्तित्व केवळ भटांच्या सांगण्यावरून बदलून घेतात. आजपर्यंत ओळख असणारं नाव बदलणं ही सोपी गोष्ट नव्हे. बेवड्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करत सात जन्माचं नातं विणण्याचा निरर्थक प्रयत्नही स्त्री करतेच. कोठून आणते एवढा उदारपणा देव जाणे. स्त्रियांसोबत वटपौर्णिमेला पतीनंही एक व्रत जोपासावं. जेव्हा कधी जोडीदाराला आपल्या आधाराची गरज असेल तेव्हा वटवृक्ष व्हावं. प्रेयसीला चंद्र, तारे तोडून आणण्याच्या बाता मारणाऱ्यांनी बायकोला दोन चार फुलं तोडून आणावीत, निदान त्यांचा गजरा तरी करेल ती, केसात माळण्यासाठी.

                         दुसरीकडे कित्येक दलालांच्या तावडीत अडकलेल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी बुधवार पेठेसारख्या वासनेच्या बाजारात अख्खं आयुष्य नासवावं लागतं एखाद्या स्त्रीला. यासारखं दुर्दैव कोणतं? वेश्याव्यवसाय करणाऱ्या त्या महिलांना कोणत्या तोंडाने महिला दिनाच्या शुभेच्छा देता येतील?

                         बलात्कार झाला म्हणून मोर्चे काढणं, मेणबत्त्या पेटवत शांततेत कॅन्डल मार्च करणं यांसोबतच संपर्कातल्या महिलांविषयी आदराची भावना, मदतीचा हात देणं, उघड्या डोळ्यांनी समाजातले स्त्रियांवरचे अत्याचार पाहून आवाज उठवणं महत्त्वाचं. एखाद्या जरी स्त्रीला संकटकाळी सहकार्य केले तरी पुरेसे. इथल्या जातिव्यवस्थेमुळे दिड दिवसाची शाळा शिकणारे अण्णाभाऊ साठे स्वतः वाचायला, लिहायला शिकले. त्यांनी प्रस्थापित साहित्याला प्रचंड तडाखे देत समाजात हिणवले जाणार्‍यांना नायक-नायिका म्हणून उभं केलं. त्यांना 'स्त्री' शब्द कधीही लिहिता आला नाही मात्र त्यांनी बंड करणाऱ्या सशक्त नायिका उभ्या केल्या, अगदी तसंच स्वतः शिकलेल्या स्त्रीने तृप्तीची ढेकर न देता इतर स्त्रियांसाठीच्या आवश्यक बदलासाठी प्रयत्न करत प्रखर इच्छाशक्तीने पावलं उचलायला हवीत. दोन साड्यांवर टब विकणाऱ्या गरीब, फाटक्या साडीतल्या त्या बाईला एखादी साडी भेट द्यावी वाटली तर तुमचं बाईपण अजूनही शाबुत आहे एवढं नक्की!

गुरु ठाकूरच्या भाषेत सांगायचं तर,

लाज द्रौपदीची वेशीवर जळे आमचे उमाळे कोरडेच,

फुकाच्या चर्चा फुकाचे निवाडे न्यायासाठी मढे वाट पाही.

अशी आपली गत होऊ नये म्हणजे मिळवलं.

                   स्त्रियांचं महत्व सांगताना, काहीवेळा महिला स्त्रित्वाचा गैरवापर करून पुरुषांना गोत्यात आणतात. त्यांचाही समाचार घेणं गरजेचं आहे. द्राक्षांच्या पिकलेल्या घोसातही एखादं आंबट द्राक्ष निघतंच की, अगदी तसंच काही स्त्रिया घातक ठरतात. मुद्दाम एखाद्या आरोपात विनाकारण फसवू पाहतात. वंशाच्या दिव्यासाठी कित्येक सासवा सुनांचा छळ करतात. तसंच सासूला त्रास देणाऱ्या सुनादेखील कमी नाहीत. कामाच्या ठिकाणी काम सोडून साडी, बांगड्या, स्वयंपाकाच्या गप्पा मारणाऱ्या महिलांनी नोकऱ्या करूच नयेत असं वाटतं.

                   प्रवास करताना गाडीत महिला सीटवर तुमचा १००% हक्क, अधिकारच आहे. पण तरुण असाल आणि एखादा वृद्ध उभा असेल शेजारी तर द्या ना त्याला क्षणभर विश्रांती. मनोरंजनाचा अधिकार महिलांनाही आहेच पण तासनतास टीव्हीसमोर ठाण मांडून बसणाऱ्या, त्याच त्या भंपक मसालेदार कौटुंबिक कलहाच्या मालिका तासनतास चघळत बसण्याला काही अंत?

कित्येक महिलांच्या कर्तृत्वाचे दाखले द्यायचे अन आपण मात्र वायफळ गप्पा मारत कित्येकांची धुणी धुवायची, कशासाठी? पुढच्या महिला दिनानिमित्त आपलीही कोणीतरी आठवण काढेल अशा कार्याची नांदी ठरवत सुरुवात करू.

शेवटी जाताजाता स्त्री जन्माची कहाणी...

महिला दिनाच्या संध्यासमयी

शिळ्या प्रासंगिक शुभेच्छांचा पसारा

अगदी सहज आवरून

ह्रदयाच्या कुठल्याशा कोपऱ्यात ठेवत

पुन्हा एकदा घरादारासाठी

ती अखंड राबत राहील,

पोळ्याच्या बैलासारखी!

तरीदेखील समस्त स्त्रीवर्गास महिला दिनाच्या आभाळभर शुभेच्छा!!

आयुब कलाम शेख,

प्राथमिक शिक्षक, पुणे महानगरपालिका

९५५२९४१२७१

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...