दिवाळी - मनातून मनाकडे!
विरो अंतर्बाह्य अंधाराचे भय
तेजाचे वलय उमलोनि
उजळो अंतरी जाणिवेची ज्योत
जुळो गणगोत चैतन्याशी!
घरातल्या पसाऱ्यासोबतच या दिवाळीत मनातलाही पसारा आवरायचा, नव्या विचारांची कास धरून पर्यावरणाचे रक्षण करायचा संकल्प हृदयी जतन करायचा. प्रदूषणाला फाटा देत प्रकाशाचं कोंदण व्हायचं. पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात, म्हणून बाळांनो यंदा फटाक्यांऐवजी पुस्तके खरेदी करायची. क्षणाच्या आतिषबाजीऐवजी चिरकाल टिकणाऱ्या ज्ञानाची निवड करायची. दिवाळी अंक, किशोर मासिकं, गोष्टी आणि वैज्ञानिक शोध यांच्या पुस्तकात बिनधास्त रमून जायचं. एखादं रोप लावायचं कुंडीत किंवा अंगणात अन् त्याची वाढ होताना पहायचं उघड्या डोळ्यांनी. प्रत्येक पानागणिक झाडाची होणारी वाढ तुमचं कुतूहल वृद्धिंगत करेल.
आई-वडिलांसोबत नजिकच्या अनाथालयांना भेट द्यायची, आईबापाचं छत्र गमावलेली पोरं कसं जगतात? काय खातात? याचि देही याचि डोळा पाहून घ्यायचं म्हणजे पिझ्झा बर्गर ची चटक विसरून जाईल आपली. उदार मनाने छोटीशी का होईना भेट द्यायची तिथे. देण्यात काय परमोच्च सुख मिळते ते प्रत्यक्ष अनुभवायचं. हो, पण दानधर्माचं इव्हेंट करत फोटोग्राफी सुरू करायच्या फंदात नाही पडायचं. नडलेल्या अडलेल्यांची हाक आपल्या काळजापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार मानायचे कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने आपली निवड केली. कोणाच्यातरी फाटक्या आभाळात सहकार्याचं, आनंदाचं इंद्रधनुष्य होण्याचं सौभाग्य प्राप्त करण्याची संधी दवडायची नाही. कारण मदत करताना सुगंधित झालेले हात हे एक वरदानच.
घर सजवताना आपल्यासोबत लेकरांची मनं सजवली पाहिजेत याचा पालकांनी विचार करायचा. संस्कार म्हणजे काही गंडेदोरे नव्हेत, बांधलं हातात की झाला मुलगा किंवा मुलगी सद्वर्तनी? पाठांतराने किंवा अनुभवाच्या एका फटकाऱ्याने संस्कार होत नाहीत. विविध अनुभव, त्यांची आवर्तनं घडवतात पोरांची मनं. घराशेजारी, गल्लीत असेल कोणी गरीब तर मनमोकळेपणाने मदत करा. दुसऱ्यांच्या फाटलेल्या आयुष्याला मिठी दिल्या की बऱ्याचदा आपली ठिगळं बुजवता येतात. दिवाळीचे दिवे, आकाशकंदील, रांगोळी शक्यतो गोरगरीब विक्रेत्यांकडून घ्या, तेवढाच त्यांच्या दिवाळीला हातभार! चकाचक माॅलचा गल्ला तुडुंब भरण्याऐवजी कष्टकऱ्यांच्या फाटक्या खिशात एखादी नोट जाऊ द्या. लक्षात ठेवा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या नसतात, कारण त्यांना पुन्हा ओसंडून भरण्याचे वरदान लाभलेले असते.
नवीन जगण्या काही
स्पर्श मनाला, चराचराला
अविरत घडण्या काही!
असं म्हणत सतत कार्यमग्न रहायचं. वेडीवाकडी का होईना मुलांना रांगोळी काढायला द्यायची, मातीत खेळत किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारायला प्रोत्साहन द्यायचं, सोबतच त्या किल्ल्यावर घडलेल्या घटनेला उजाळा देत इतिहासाचं भान जपायचं. एका पिढीच्या हातून दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द करण्यात येणारं हे महाराष्ट्रीय संस्कृतीचं वैभव आवर्जून जपायला हवं. मग पोरांची कल्पकता बघा नियमांचे कसे बांध तोडतेय. कल्पनांच्या भराऱ्यात मनोमन तरंगायला हवं पोरांनी. असंख्य दिवे उजळावे कल्पनांचे यासाठी मुलांच्या हाती रंग द्या, माती द्या. फुलत्या कोवळ्या झाडांना चौकटीत ठेवून सर्जनशील हाती फटाके, फुलबाजे, सुतळी बाॅम्ब यांतून अनैसर्गिक आकार देण्याचा प्रयत्न कशासाठी करायचा? फुलपाखरू फुलांवर बागडावे तसं मुलांना बागडू द्यायला हवं. आजी-आजोबांशी गप्पा मारत पारंपारिक खेळ त्यांना खेळू द्या, भटकू द्या रानोमाळ, शेतातले काम पाहू द्या. शिकलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं सगळं काही त्यांच्या अंतरंगात तरंगत राहिलं पाहिजे. डोळ्यांतून ओसंडून वाहीलं पाहिजे.
उटणं किंवा चंदनापेक्षाही कृतीने उजळणारे पोरांचे चेहरे, मित्रांना पुस्तकातल्या रंजक गोष्टी सांगताना हरपून गेलेलं भान, स्वहस्ताक्षरात लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड देताना दिपून गेलेले डोळे म्हणजे झाली की इकोफ्रेंडली दिवाळी साजरी. मूल्यशिक्षण कोणी कोणाला द्यायची बाब नाही. मनावर, डोळ्यांवर, हातांवर होणाऱ्या संस्कारांचे प्रतिबिंब असतं ते.
दिवाळी मनात असते. आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूपं. एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची गर्दी काळजात व्हायला हवी. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम, स्नेह, माया, वात्सल्य, आपलेपणा जपणं हीच खरी दिवाळी. आपल्या आणि इतरांच्याही मनाचा गाभारा प्रसन्न करत, चैतन्याची उधळण करणारे दीप लावून प्रकाशबीजं रोवूया. म्हणजे अनाथ,पोरक्यांसाठी सहकार्याचं वलय आणि भुकेल्यांसाठी दातृत्वाचा सुगंध दरवळत राहील, तीच खरी दिवाळी पहाट ठरेल. त्यासाठी प्रत्येक वेळी 'मोती' साबणच कशाला हवाय? कर्तृत्वाचाही दरवळ चिरकाल टिकतोच की.
वाटीभर खीर पाहताना दूध, सुकामेवा, शेवया दिसतात पण ज्यामुळे माधुर्य लाभलं ती साखर कुठे दिसत नाही. शेवट सगळ्यांना गोड हवा असतो मग साखर पेरायचं काम कोणी करायचं? कोणाच्यातरी आयुष्यात क्षणभर का होईना गोडवा आणता आला तर काय हरकत आहे? दुसऱ्याच्या दारात सुखाचं झाड लावलं की, आनंदाची फुलं आपल्याच दारात पडतात. फक्त ती दानत कमवायला हवी.
अशा हेल्पफुल्ल, सुखद, समृद्ध दिवाळीच्या मनाकडून मनाकडे स्नेहमयी शुभेच्छा!!
आयुब कलाम शेख
प्राथमिक शिक्षक
म.न.पा.शाळा क्र.१७४बी, कोंढवा बुद्रुक पुणे. मो. 9552941271

Very nice sir..
ReplyDeleteThank you so much
Deleteसुंदर लिखाण आयुब सर
ReplyDeleteThank you
Deleteक्या बात है गुरु! खूप छान....
ReplyDeleteया दीपावलीत स्नेह ,आनंद आणि उत्साहाने प्रत्येकाचे हृदय उजळून निघावे. दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा!
Thank you so much
Delete