अवघड गड चढत असताना अर्ध्यावर सावलीखाली टेकावं आणि मागे पहावं. त्या वेड्यावाकड्या पाऊलवाटा, ही घसरडी उतरंड, काटे, झुडुपं, पायऱ्या, दगडांच्या राशी हे सगळं चुकवत वरपर्यंत आलेलो आपणच का? कधीही डोंगर पार न करणाऱ्या आपण एवढं चालू शकलो? एवढी ताकद होती आपल्यात? यांसारखे प्रश्न डोंगरांसारखे उभे राहतात.
निवृत्त झाल्यावर, मुक्ती मिळाल्यावर जे जे करायचंय, ते ते आत्ताच करून खऱ्या अर्थाने अनुभवसमृद्ध व्हायचंय...
फिरणं होतंय, नवीन प्रदेश पाहणं होतंय.
धबाबा तोय आदळणारे धबधबे पाहून नेत्र तृप्त होतात, दोन डोळ्यांत न मावणारा अद्भुत नैसर्गिक आविष्कार पाहताना मन किती सुखावतं.
मग याच निसर्गातून कोसळणाऱ्या सकारात्मक लहरींच्या उल्का झेलण्यासाठी देहाची ओंजळ होते. इतकंच काय? तारकांच्या हालचालींवर लक्ष ठेव, असा आकाशाला दम देण्याची ही हिंमत अंगी येते!
मैलोनमैल वाळवंटात चालणाऱ्या एखाद्याला पाण्याचं तळ सापडलं की तो कसा पोट फुटेपर्यंत पाणी पिईल?
अगदी तशीच काहीशी अवस्था होते.
😍☺️

No comments:
Post a Comment