Friday, May 30, 2025

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

 उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक'

किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड

प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत असतो आणि काळे सर गडभ्रमंतीची आमची ही तहान नित्यनेमाने भागवतात.

एकमेकांशी संवाद जोडण्यासाठी मांडलेला हा थाट पंढरपूरच्या वारीप्रमाणे अखंड सुरू आहे, सुरू राहील.

इंग्रजी महिन्यानुसार फक्त म्हणायला उन्हाळा सुरू आहे पण हा आमचा पावसाळी पहिला ट्रेक होता, असंही म्हणायला हरकत नव्हती.

खरं सौंदर्य प्रवासात असतं,  मुक्कामातलं ते 'साठलेपण' नकोच, असं म्हणत २४ मे २०२५ शनिवारी रात्री रांजणगाव गणपतीवरून गाडी घेऊन विशाल पाचुंदकर निमगाव म्हाळुंगी मध्ये आले. तिथून गाडी विठ्ठल वडघुले यांनी सांभाळली. ट्रॅफिकमुळे नियमित वेळेपेक्षा दीड तास गाडी पुढच्या प्रत्येक थांब्यावर उशिरा येत होती.

रात्री दोन वाजता वाघोली मधून चंदननगर बायपास, येरवडा असं करत गाडी पनवेलच्या दिशेने निघाली.

विशाल पाचुंदकर, पायल खेडेकर, विठ्ठल जाधव, दत्ता पारेकर, माधुरी वडघुले, अश्विनी पवार, कुलदीप म्हसडे, किरण शिंदे, स्वाती शिंदे, विश्वंभर पवार, विक्रम केदारी, जयदीप पुंडे, विद्या वाबळे, ज्योती जाधव, तनिष्का जाधव, समर्थ जाधव, साक्षी बांदल, वैभवी शेळके, सुषमा घावटे, सागर रामदास सासवडे, गौरी घावटे, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे, मुरलीधर कटके, वनिता कटके, शारदा मस्के, प्रदीप गवळी, ओंकार साकोरे, प्रांजळ टाकळकर, शशांक तिवारी, बलभीम बोदगे, वैभव वडघुले, रवी नरसाळे, संदीप गीते, सुषमा गीते, वैभव कोळपे, रविंद्र काळे सर आणि मी सज्ज झालो कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य पाहण्यासाठी. खरंतर 'कैलासगड' ठरलेला असताना अनपेक्षितपणे सरांनी हा गड निवडून सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता.

सरांच्या योजना आम्हा सर्वांच्या इच्छेपेक्षाही सुंदर असतात, रात्रीनंतर उगवणाऱ्या सुंदर पहाटेसारख्या.

यावेळी मार्गदर्शक पंकज सर, हास्यसम्राट दादा घोरपडे, अन्नदाता बाळाभाऊ, जिमबॉय वैभव करपे, गझलकार विजय माने सर, बॅजेस लोगो डिझायनर वैभव नरवडे, विशेष म्हणजे माझा पार्टनर, फोटोग्राफर गिरीश, बापू, काका ही मंडळी सोबत नव्हती. बरंचसं चुकल्यासारखं वाटत होतं.

मध्यरात्रीची वेळ, गाडीत झोप लागताच गीते सरांचं ओरडणं आमच्या कानी आलं. 

"थांबा मारू नका, बाजूला घेतो. मारू नका, बाजूला घेतो."

टोलनाक्याजवळ गाडी थांबली होती, हा संवाद ऐकताच आम्हाला वाटलं ड्रायव्हरने गाडी कोणाला तरी ठोकली.

सर्वजण ड्रायव्हरच्या अवतीभवती गोळा झाले होते. थोड्या वेळाने समजलं, फास्टटॅगचा रिचार्ज संपला होता, ड्रायव्हरने त्याच्या दुसऱ्या गाडीवर रिचार्ज केला होता, तो वेगळीच गाडी आज घेऊन आला होता आणि फास्टटॅगशिवाय  टोलनाक्यावरचा बसणारा डबल फाईन वाचावा म्हणून "फाईन मारू नका, मी गाडी बाजूला घेतो", अशी विनवणी गीते सर करत होते. सावळागोंधळ नुसता. एकतर माझ्याकडून सगळ्यांना फ्री आंबे खायला देतो म्हणून काळे सरांनी आधीच फसवलं होतं, त्यात ही घटना. आजचा दिवसच "पोपट होण्याचा होता तर!"

पहाटे गाडी अभयारण्यासमोरच्या पुलाखाली थांबली. विठ्ठल वडघुले, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे आणि इतर मावळ्यांनी चहा, शेवया बनवल्या आणि आम्ही मनसोक्त ताव मारला. अन्नदाता बाळाभाऊ सोबत नसले तरी नाश्त्यासाठी लागणारे प्रत्येक साहित्य ते निमगाव म्हाळुंगीतून पॅकिंग करून देतात. सकाळचा नाश्ता करताना ही मंडळी पाहून पहिला घास घेताना साऱ्या जगातली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आमच्या दृष्टीत साठलेली असते. 'माझा गडकिल्ले प्रेमी ग्रुप' या भावनेने प्रेरित होऊन ही लोकं कामं करतात.

इथे येणारा प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातला 'सम्राट' आहे. कोणी शेतकरी, कोणी उद्योजक, शिक्षक, कॉलेजचे विद्यार्थी, राजकारणी, कंपनी कामगार, गृहीणी महिलाही आहेत पण इथे सगळे समान. गडभ्रमंतीच्या पालखीचे भोई!

अनेक ज्ञात अज्ञात सारथ्यांचे हात या ग्रुपच्या कामासाठी लागतात.

गडकिल्ले प्रेमी ग्रुप नावाच्या या 'गर्भरेशमी पैठणीला' कुणीतरी जरतारी काठ पदर लावतं, कुणी मोराची नक्षीकाम केल्यासारखं मदतीला येतं, आणि कुणीतरी मनाच्या कोपऱ्यात हळुवार जपून ठेवतं. असा याचा लौकिक!

रवी काळे सर, यांच्याविषयी काय सांगू? मला तर ते श्रीकृष्णाचा तो अवतार वाटतात, जे आमच्यासारख्या शिशुपालाचे ९९ काय सगळेच अपराध पोटात घालून क्षमा करतात. मेंढरं हाकण्यासारखं त्यांचं काम. चला पुढे म्हणत ढकलत नेण्यासारखं. काळे सरांच्या जन्मावेळी त्यांच्या आईला 'मधाचे डोहाळे' लागले असावेत बहुतेक. उगीच नाही इतका गोड स्वभाव झालाय त्यांचा. एखादी गोष्ट सुरू करणं सोप्पं असतं. खरा कस लागतो त्यात सातत्य ठेवायला. ७९ ट्रेक या माणसानं अव्याहतपणे सुरू ठेवलेत, हे विशेष.

अभयारण्याच्या प्रवेशाद्वाराशी काळे सरांनी प्लास्टिक कचरा, गडभ्रमंती, शिस्त यांविषयी सूचना दिल्या.

मी गडाविषयी मला माहित असलेली माहिती माझ्या सहकाऱ्यांना सांगितली. वर्गात पोरं ऐकतात तितक्याच उत्कटतेने ही थोर मंडळी ऐकतात, ही गोष्ट भारी वाटते.

कर्नाळा हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून १२ किमी अंतरावरचा एक डोंगरी किल्ला. ह्या किल्ल्यालगतचा परिसर कर्नाळा अभयारण्य म्हणून ओळखला जातो. शिरढोण हे जवळचं गाव.

देवगिरी यादव (१२४८) आणि तुघलक शासक (१३१८) यांच्याअंतर्गत किल्ला बांधला गेला असण्याची शक्यता आहे. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशाहने त्याचा ताबा घेतला. नंतर पोर्तुगीजांकडे आला. शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये मोगलांकडून जिंकला. त्यानंतर १७४० पेशव्यांकडे आणि १८१८ मध्ये ब्रिटिशांनी बळकावला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा या किल्ल्याचे किल्लेदार होते. पूर्वी बोरघाटद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. किल्ल्याचा सुळका विशेष लक्षवेधी आहे, हा सुळका अंगठ्यासारखा दिसतो. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर एक मोठा वाडा लागतो. परंतु सध्या तो सुस्थितीत नाही. करणाई देवीचे मंदिर, तटबंदी, जुने बांधकाम व थंड पाण्याच्या टाक्या आहेत. गो. नी.दांडेकर(अप्पा) आणि निनाद बेडेकर यांच्या पुस्तकात किल्ल्याविषयी सविस्तर माहिती मिळते.

त्यानंतर वैभव कोळपेने शिवगारद देऊन स्फुरण चढवले. यावेळी किल्ल्याचे बॅजेस बनवून विशाल पाचुंदकर यांनी चार चांद लावले.

आणि सुरू झाला कर्नाळा किल्ला प्रवास.

कोकणपट्टी म्हणजे दमट हवामान. ढगाळ वातावरणामुळे 'भास्करराव' लपंडाव खेळत होते पण त्यांचं अस्तित्व मात्र जाणवत होतं. जोवर क्षितिजावर सूर्य येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार, याची ग्वाही देत किल्ला सज्ज उभा होता.

पावसाची नाजूकशी सर बरसत होती. कर्नाळ्याचे हे पक्षी अभयारण्य म्हणजे श्वसनासाठीचं राखीव झाडंच म्हणावं लागेल. 

या निसर्गाचं हिरवेपण पाहून आमच्या वृत्तीलासुद्धा नवी पालवी फुटली होती. अशावेळी आपणही हिरवेगार होऊन जातो, त्या शुद्ध मोकळ्या हवेत फुप्फुसांची एकूण एक कवाडं उघडी होत होती आणि गात्रागात्रांतून उत्साह सळसळत होता. मोकळं आकाश आणि हिरवी धरित्री. तब्बल ५० दिवसांनंतर आम्ही एकत्र जमलो होतो.

या ट्रेकमुळं एकमेकांसोबत घालवलेले हे क्षण फुलवता येतात, जगता येतात.

घसरडी मातकट वाट, दगड धोंडे, हिरवी वनराई, दमट वातावरण यांच्यातून ओळीनं रांगेत चाललो आम्ही. निसर्ग न्याहाळत होतो, पक्ष्यांचे विविध आवाज ऐकत होतो, बुलबुल पक्ष्याविषयी सविस्तर माहिती विठ्ठल वडघुले यांनी सांगितली. या पक्ष्याचं 'गावठी नाव' प्रदीप गवळी सरांनी सांगितलं आणि एकच हशा पिकला. गप्पा गोष्टी, चेष्टामस्करी करत पुढे निघत होतो.

इंस्टाग्राम वर प्रसिद्ध झालेला 'चंगळ्या' याची एक सुंदर रील आम्ही बनवली. चंगळ्या बोले कु हू.. इथून पुढे आमचा चंगळ्या रवी अण्णा नरसाळे यावर शिक्कामोर्तब झालं. वैभव वडघुले याने शुटिंग केलं. आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वांत सुंदर पान म्हणजे सह्याद्रीची भटकंती आणि स्वर्ग पृथ्वीवर खेचून आणणारे हे जॉली मित्र. सुपर कॉम्बिनेशन! गिरीश नसल्यामुळे माझ्या फोटोग्राफी अन् शुटींगची जबाबदारी वैभव वडघुले याने लीलया पार पाडली. दीड तासांच्या पायपीटीनंतर गडाचे अवशेष दिसायला लागले. 

लहानशी तटबंदी, बुरुज, महादरवाजा. गडाचं वैशिष्ट्य असणारा सुळका लांबूनच लक्ष वेधत होता. मुसळधार म्हणावा असा पाऊस नसल्यामुळे फोटोग्राफी जय्यत झाली. सोबत आणलेला कोरडा खाऊ खाल्ला. विठ्ठल जाधव सर, आम्ही त्यांना 'मामा' म्हणतो आणि त्यांच्या धर्मपत्नी. दोघांनीही बाजरीची भाकरी आणि शेंगदाण्याची ठेचाटाईप चटणी बांधून आणली होती. आहाहा! पावसाच्या त्या वातावरणात काय खुमासदार चव लागत होती म्हणून सांगू. साक्षात अन्नपूर्णा वास करते हो मामींच्या हातात. 'अन्नदाता सुखी भव' म्हणत आम्ही अनेक आशीर्वाद दिले. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीही गॅरंटी मागत नाहीत, हेच खरं.

गड उतरण्यास परतीच्या मार्गाला लागलो. साडेअकरा पर्यंत खाली पोहोचण्याचा दम काळे सरांनी जाताना दिला होताच.

विहित वेळेत खाली पोहोचलो. अभयारण्य असल्यामुळे भरपूर छान पद्धतीने गड आणि गडाचा परिसर सांभाळण्यात आला आहे. प्लास्टिक कचरा नाहीच. लहान मुलांसाठी जागोजागी खेळणी, पक्ष्यांच्या प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. सहकुटुंब करता येईल असा ट्रेक आहे.

ग्रुपमधली सगळी जिवाभावाची माणसं. एकमेकांना सहकार्य करणारी.

व.पु. म्हणतात, ज्याला दुसऱ्यासाठी सख्खं होता येतं, त्यालाच कोणीतरी सख्खं असतं. बाकी फक्त परिचितांची यादी असते. नको असलेल्या माणसांची गर्दी असते. आपल्या जवळचं खायचं, प्यायचं सगळं साहित्य सगळ्यांसमोर खुलं केलं जातं. अर्ध पोट या पाहुणचारानेच भरतं.

गड पायउतार झालो. ओले कपडे बदलले. सपाटून भुका लागल्या होत्या पण यावेळी अचानक ठरलेल्या गडामुळे जेवणाची व्यवस्था कुठल्यातरी हॉटेलमध्ये चौकशी करून करण्यात येणार होती. 

पनवेल गेलं, लोणावळा गेला. संध्याकाळी साडेचार वाजता जेवणासाठी काळे सरांनी हॉटेल निवडलं आणि तेव्हा कुठे आम्ही पेटपूजा केली. मस्त झालं जेवण. 

के.के.किचन यांचे सर्वेसर्वा स्वातीताई शिंदे आणि किरणदाजी शिंदे दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता.

ट्रेकमध्ये आलेल्या सगळ्यांना आईस्क्रीमची पार्टी दोघांनी दिली. दिलदार जोडीला भरभरून शुभेच्छा देऊन पुण्याकडे परतीची वाट आम्ही धरली.

नभांगणातल्या चांदण्या मोजायच्या नसतात. आपल्यावर त्यांचं छत आहे, या आनंदात मनसोक्त विहार करायचा असतो फक्त. हे नक्षत्रांचं देणं कधीच चुकवता येणार नाही. अशा अलौकिक चांदण्या, तेजस्वी तारे अवतीभवती वावरतात तिथे आपण केवळ माथा झुकवावा.

आम्ही तेच करतो. डोळे झाकून काळे सर आणि पंकज सरांच्या मागे चालत राहतो. डोळे उघडले जातात तेव्हा फक्त स्वर्गाहून सुंदर सौंदर्यच दिसतं. सह्याद्रीच्या कुशीतून महाराज नजरेस पडतात.

रोजच्या त्याच त्या कामातून मोकळीक म्हणून आम्ही या ग्रुप सोबत फिरतो. मन कसं शांत होतं. पुन्हा ऊर्जा मिळते नव्या कामासाठी.

व.पु.लिहितात,

कुणाच्या आगळी वृत्ती

कुणाची वेगळी मुक्ती,

अशा साऱ्या निमित्तांची

एकेक कथा झाली!

किती अज्ञात ही दुःखे

तरी हसतात चेहरे,

तशा प्रत्येक चेहऱ्याची

एकेक कथा झाली.

गडकिल्ले प्रेमी ग्रुप हा आमचा असाच एक ग्रंथ आहे, जिथं प्रत्येकाची वेगळी कथा आहे. जी प्रत्येकाने स्वतः लिहिलीये.

माझा 'गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान, निमगाव म्हाळुंगी पुणे' ग्रुप म्हणजे वैविध्यपूर्ण माणसांचं एक सुंदर उद्यान, सकारात्मक विचारांचं भरगच्च कोठार, सर्व प्रेमळ भावभावनांच्या पक्वानांनी भरलेली मेजवानी, आपलासा वाटणारा जवळचा मित्र, चुकल्यास वाट दाखवणारा एक वाटाड्या आणि आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा एक सल्लागार! पौर्णिमेच्या वाटोळ्या चंद्राप्रमाणे प्रत्येक महिन्याकाठी गडभ्रमंतीची शीतलला देणारा हा ग्रुप सदैव आयुष्यात सोबत रहावा, हीच सदिच्छा.


पुढचा ट्रेक

८जून२०२५

शिवराज्याभिषेकानंतर दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडी झालेला कचरा उचलून स्वच्छता मोहीम करणे असा आहे.

अत्यंत सुंदर, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाला साजेशी, थोरल्या महाराजांच्या चरणी खरी श्रद्धा वाहण्याची स्तुत्य कल्पना!

पंकज सर आणि रवी सर यांच्या माध्यमातून सत्यात उतरेल. आम्हीही मावळे म्हणून या स्वच्छता मोहीमेच्या पालखीचे भोई होऊ, हेच या जन्माचं सार्थक!

सामर्थ्य आहे चळवळीचे,

जो जो करील तयांचे!

आपणांस सहभागी व्हायचे असेल तर आयोजकांशी संपर्क साधा.

एकच ध्यास, रायगडाची आस.

तोपर्यंत जय शिवराय!

⛳⛳⛳⛳

मार्गदर्शक पंकज माने सर

86682 51375

आयोजक रवी काळे सर 

90964 65675

लेखन आयुब शेख सर

9552941271

Monday, May 12, 2025

धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची -शिवराज पिंपुडे अभ्यास सहलींच्या अनुभव कथनाचा सुंदर आविष्कार! लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 


धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची

-शिवराज पिंपुडे

अभ्यास सहलींच्या अनुभव कथनाचा सुंदर आविष्कार!

शिकणं या स्वाभाविक प्रक्रियेला चार भिंतीत मर्यादित करून चालणार नाही. त्यामुळे गडकिल्ले, वीरगळी, मंदिरं, अभयारण्य, समुद्र, लेणी, आकाश निरीक्षण यांचा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेला अनुभव त्यांच्या आयुष्यभर स्मरणात राहील.

उघडे डोळे आणि चालणारे पाय यांना जोड मिळते प्रयोगशील अनुकरणीय उपक्रमांची तेव्हा सृजन घडते. 'आपण जे काही केलं ते समाजापुढे आणणं' महत्त्वाचं मानून उपक्रमांचं सार शब्दबद्ध केलंय लेखकाने. ते तशाच निगुतीनं नटवलंय अन् सादर केलंय आपल्या पुढ्यात. खरं तर अनुभवांचा हा एक प्रगल्भ वस्तुपाठच म्हणावा लागेल सर्व शिक्षकांसाठी.

मला तर वाटतं, इथल्या प्रत्येक शिक्षकांच्या हाती लागावेत असे दिवे, जे उजळतील शिक्षणव्यवस्थेचं भाग्य. जिथे मग नोकरी म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं एक साधन न राहता नवनिर्माणाचं विद्यापीठ ठरेल. मुलांना देता येतील पाठ्यपुस्तकाखेरीज चाकोरीबाहेरचे कित्येक अनुभव अन् समृद्ध होतील त्यांच्या ज्ञान ग्रहणाच्या कक्षा.

शिक्षणाची नवी वाट चोखळणारं हे ह्रदयसंवादरुपी पुस्तक मिळवून नक्की वाचा.

धन्यवाद.

आयुब कलाम शेख 

प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका 

9552941271

🙏🏻😍📚✌🏻🍫🌹

Thursday, February 6, 2025

राजहंस! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून नाशिकच्या 'मांगीतुंगी आणि साल्हेर सालोटा' ट्रेक वेळी सकाळी नाष्टा बनवताना एक मुलगा भल्या पहाटे थंडीत कुडकुडत काठ्या विकताना दिसला. त्याची जिद्द, कष्ट आणि गरीबीतही स्वाभिमानाची कमावलेली भाकर पाहून काही ओळी लिहाव्याशा वाटल्या.


गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून नाशिकच्या 'मांगीतुंगी आणि साल्हेर सालोटा' ट्रेक वेळी सकाळी नाष्टा बनवताना एक मुलगा भल्या पहाटे थंडीत कुडकुडत काठ्या विकताना दिसला. त्याची जिद्द, कष्ट आणि गरीबीतही स्वाभिमानाची कमावलेली भाकर पाहून काही ओळी लिहाव्याशा वाटल्या.


राजहंस!


भरल्या चांदण्यांच्या अंगणात 

हा कुट्ट काळोख कसला?

पोटखळगी भरण्याच्या खटपटीत 

कष्टाळू 'राजहंस' एक दिसला!


कसली गुलाबी अन् बोचरी थंडी?

कुणाला मऊ बिछान्याची साखरझोप?

हे सगळं आपल्यालाच लखलाभ 

ते मात्र वाळवंटी तग धरणारं रोप!


आमची कॉन्व्हेंटची लाडाची लेकरं

'ऊठ बाळा' म्हणूनही बिछान्यावर,

इथं राजेहो घरादाराची मदार 

इवल्याश्या कोवळ्या माथ्यावर!


एसीची हवा, ट्युशनची सलाईन 

तरीही गुणांची रात्रंदिन आबाळ,

अशी लेकरं वाळवंटातही फुलवतात

यशाचं देखणं हिरवं आभाळ!


पिझ्झा, बर्गर अन् पार्ट्यांचे

आपले जहागिरदारीचे चोचले,

ब्रँडेड किंमती पायतानातूनही

सुखाचे काटे सतत बोचले!


स्वप्न भविष्याची जप उराशी

जरी असे पाचवीला पुजलेली पडझड,

सूर्य बांधील पडक्या झोपडीला तोरण

लेकरा, फळास येईल तुझी धडपड!


आयुब कलाम शेख.

सदस्य,

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान,

निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुप.

9552941271



Thursday, June 13, 2024

Shrikanth movie

 



Shrikanth!😎

जन्मतःच दृष्टी नसलेल्या मुलाला समाज कचरा समजतो. आयुष्यभराच्या अंधत्वाच्या यातनेतून सुटका म्हणून जमिनीत पुरायला निघालेल्या बापाला आई थोपवते. अन् तोच मुलगा 'अकरावीपासून ब्रेललिपीतून सायन्स' शिक्षणासाठीची कोर्ट केस जिंकून कित्येक visual disable साठी नव्या युगाची नांदी ठरतो.

न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यापूर्वीही कित्येकांनी सफरचंद जमिनीवर पडताना पाहिलं होतं की, सवाल बघणं किंवा डोळ्यांचा नव्हताच मुळी. महत्वाचं होतं विचार करणं, कारणमीमांसा तपासून पाहणं.

मालविका टिचरने आपल्या या विद्यार्थ्याला दिलेली दिशा, सपोर्ट आणि संधी यांची बरोबरी कशासोबतच होऊ शकत नाही, एखाद्याच्या फाटक्या आयुष्यात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न शिक्षक किती सुरेख पद्धतीने करू शकतात. 'रवी' नावाचा मित्र विश्वास ठेवतो, साथ देतो, समजून घेतो. अशी परिसासारखी माणसं सोबत असली तरच लोखंडाचं सोनं होतं, हे चित्र काय सुरेख रंगवलंय!

लहानपणी मित्रांसोबत भांडणं झाली तर मार खाण्याऐवजी तू पळून का जात नाहीस? या वडीलांच्या प्रश्नावर दिलेलं समर्पक उत्तर "मैं भाग नहीं सकता, सिर्फ लढ़ सकता हूँ!" आपल्याला जगण्याचा नवीन आयाम प्राप्त करून देतो.

अंधेरोंको कोसने से ज्यादा बेहतर है,

की एक शमा दिलमें जला दी जाये!

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी २५ लाख रुपये स्टार्टअप साठी दिलेला हा shrikanth!

वेळ काढून ' डोळे लख्ख उघडणारा अंध हिरोचा डोळस चित्रपट' नक्की पहा, आपल्या लेकरांनाही दाखवा.

😍

अमोल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 


अमोल,

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपच्या माध्यमातून 'पदरी पडून पवित्र झालेलं' एक अनमोल माणिक!

हुशार, स्मार्ट, सहकार्यशील, हसरा, माझे ढिगभर फोटो काढून उभे-आडवे-तिरपे व्हिडिओ काढणारा, निमगावातून माझ्यासाठी सीट पकडणारा, एकत्र चहा, नाष्टा, जेवण आणि सगळंच सोबत...

आता तर त्याने वाढदिवसाला ऍप्पल घेतलाय, आता काय कुणाची...😝

काही माणसं जीवनात अपरिहार्य असतात, तर काही ट्रेकमध्ये..

खरं तर,

कम लोग हो, पर अपने हो...

जिंदगी तमाशा थोडी है,

की भीड चाहिये?

अमोल, तुझ्या कौतुकाचा पाढा वाचताना कुणाला किती आनंद होतो माहीत नाही, पण माझी कॉलर नेहमीच ताठ राहणार भावा.

तुझ्यासारखा प्रतिक्षणी आनंदी राहण्याचा वसा घेतला की आयुष्याची कोजागिरी मावळतच नाही, हेच खरं.

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

खूप मोठा हो...

फोटोग्राफीत तुला आणखी कौशल्य मिळू दे, हीच सदिच्छा..

😍😝🍫

झाडवाटा आनंद यादव

 


झाडवाटा

-आनंद यादव

रोजच्या घडणीच्या ग्रामीण कथा. या कथा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतून उमलून आलेल्या वाटतात. जीवनाची अंगोपांगं धुंडाळत राहणाऱ्या विविध रूपाने अवतरलेल्या गावातल्या कथा मातीशी नाळ जोडू पाहतात.

आवडलेली, चित्तथरारक कलाटणी लाभलेली 'एका दगडी घराचा इतिहास' कथा. बदला घेत कुणालातरी मारून संपत्ती लुबाडणाऱ्या एका पिढीचं संक्रमण तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचतं. तेवढ्यात....

"खुळा आहेस तू. डोळ्यातली सगळी जळमटं काढून टाक. ज्याला त्याला ज्याची त्याची फळ मिळाली, मिळणार. आपण आपल्या माणसांबरोबर सुखी राहायचं, माणसात वावरायचं. काळ बदलतोय, वेगळा विचार करायचा!"

कथेतले हे समंजस बोल शेवटी काळीज जिंकतात.

पुस्तक मिळवून नक्की वाचा.

😍

अनुबंध शांता शेळके

 अनुबंध

शांतस्वरूपिणी शांता शेळके 



अनुबंध 

शांतस्वरुपिणी शांता शेळके 

१४भावनिक कथांचा संग्रह.

छोट्या रानफुलांसारख्या निर्मितीच्या पाऊलखूणा उमटवत, फुलवत कथा आभाळाला स्पर्श करू पाहतात आणि वाचनात आपण कधी गुंग होऊन जातो, कळतही नाही.

साहित्य संमेलनाच्या आळंदीच्या अध्यक्षा शांताबाई संमेलन झाल्यावर अरुणाताई ढेरेंसोबत बांगड्या भरून आनंद साजरा करतात, एवढं साधंपण! मनाची श्रीमंती! त्यांनी भरभरून भाषेवर प्रेम केलं, याची प्रचिती कथा वाचताना येते.

शांताबाई नाव उच्चारलं की त्यांचं काव्य आठवतं...

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी,

मजफुल ही रुतावे,हा दैवयोग आहे!

लोकांच्या संबंधांबद्दल खुमासदार चर्चा करणारी रजनीताई पद्मनाभ आणि शोभा यांच्याविषयी चर्चा करते. पद्मनाभ लालबुंद होत, "आम्ही प्रेम करतो, तुम्हीही करून बघा कोणावर. पण छे! ते शक्य नाही,तुमच्या बाबतीत. तुम्ही अशाच रजुताईच राहणार, अगदी मरेपर्यंत."

प्रेम प्रेमिकांच्या प्रेमसंबंधातली कोणत्यावेळी केलेली कोणती ढवळाढवळ तिला भोवली, त्यातल्या कुणाचा तळतळाट तिला बाधला की ती आजन्म प्रेमापासून पारखी राहिली! या आशयाची 'कोडे' कथा काळजाला स्पर्शून जाते.

पुस्तक मिळवून नक्की वाचा.

😍

Tuesday, April 23, 2024

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा...

वाचणं एक प्रकारे पेरणं असतं तर लिहिणं हे उगवणं. उगवण्याच्या अपेक्षेआधी पेरायला हवं. एक दिवस तुमच्या सुपीक शेतात पिकवलेलं धान्य लोकं पेरण्यासाठी घेऊन जातील!

खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात, आपण जपण्यासाठी एखादं तरी पुस्तक निवडावं.

वाचनाचा छंद माणसाला धुंद करतो.

नागराज मंजुळे म्हणतो,

एकट्या दुकट्या माणसानं,

स्वसंरक्षणार्थ काही बाळगांव

म्हणून मी पुस्तकं बाळगतो!

पाडगांवकर म्हणतात, "मी रियाज करतो लिखाणाचा, ठराविक वेळी लवकर उठून, आठवून!

सतत वाचणं, ऐकणं, पाहणं हा रियाज असतो. कवितेचा एक क्षण असतो, त्याला त्याच वेळी सजवता यायला हवं. शब्दांचा साठा साठवायला हवा. कवी शब्दांचा पाऊस साठवतो आणि योग्य वेळी वापरतो.

वाचनाची आवड असण्यापेक्षा व्यसन असावं माणसाला. कारण व्यसनासाठी माणूस वेळ काढतोच. आवडीसाठी सवड काढावी लागते. 

जागतिक पुस्तक दिनाच्या ज्ञानमयी शुभेच्छा!

📚📖🌹🍫😇🏆

Sunday, March 31, 2024

गडकिल्ले प्रेमींची धुळवड समुद्री किल्ल्यांवर... विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान पुणे लेखन आयुब कलाम शेख पुणे महानगरपालिका

 

गडकिल्ले प्रेमींची धुळवड समुद्री किल्ल्यांवर..

                                     शुक्रवारी २२ मार्च २०२४ रात्री दहा वाजता वैभव वडघुले, रवींद्र नरसाळे, सुमित वडघुले, गणेश साळुंके, रोहन विशाल वारे, रवींद्र चव्हाण, संतोष कुतळ, सचिन कुसळकर, प्रदीप गवळी, विनोद बोराटे, प्रदीप वडघुले, सुमित तोरसकर, जालिंदर काने, संदीप धोंगडे, सुशील वाघ, अजिंक्य मांढरे, दत्ता जगदाळे, गौरव पवार, संतोष गायकवाड, उन्मेश दिघे, अक्षय खळदकर, योगेश वीर, हर्षद कळवतकर, आदित्य बोलभात, ओमकार बोलभात, शुभम मेहेर, वैभव कोळपे, अभिषेक चव्हाण, अविनाश धोत्रे, स्वप्नील रोमन, वैभव नरवडे, रविंद्र काळे, आयुब शेख, शरद काळे, अविनाश शिंदे, शैलेश निकम, राजेंद्र साळुंखे, प्रशांत काळे, बजरंग शिंदे, संपत गायकवाड, अमोल नागवे, नितीन सटाले, नवनाथ मेमाणे, विठ्ठल वडघुले या ४७ मावळ्यांना आणि शौर्य, यज्ञ या छोट्या मावळ्यांना घेऊन गाडी निमगाव म्हाळुंगी, शिक्रापूर, वाघोली, चंदननगर बायपास, हडपसर, दिवेघाट मार्गे कोकणाकडे मार्गस्थ झाली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या स्टॉप वर दहा मिनिटे आधी उभा राहतो.

                धुळवड म्हणजे एकमेकांना भेटत एकमेकांच्या रंगात रंगण्याचा दिवस. आम्ही मात्र गड-किल्ल्यांवर धुळवड साजरी करत शिवरंगात रंगण्याचा निश्चय केला. यावेळी दोन दिवसांचा मुक्कामी दौरा असल्यामुळे महिलांचा समावेश नव्हता. मार्गदर्शक पंकज माने, हास्यसम्राट ह.भ.प.गणेश दादा घोरपडे, ग्रुपचे पैलवान वैभव करपे, वजीर सुळक्याचा बादशहा मुरलीधर कटके, गझलकार विजय माने (विदिमा), सुप्रसिद्ध फोटोग्राफर गिरीश तांबे, चॉकलेट बॉय अप्पा, दिलखुलास लग्नाळू अभि चव्हाण डॉक्टर, मित्रवर्य सूरज बोरावके, रिल्सस्टार अक्षयकुमार कांबळे, सुनिल खाडे सर, सहकार्य करणारे अण्णा मोरे, अमोल हरगुडे, ग्रुपचा खमक्या आवाज मुलूख मैदानी तोफ संतोष लांडे, मेजर नरवडे सर, प्रदीप मांढरे भाऊ, ड्रायव्हर सोबत जागणारे बापू चव्हाण यांसारखी नेहमीची मंडळी नसल्यामुळे थोडं चुकल्यासारखंच वाटत होतं.

   गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपमध्ये काही इतकी दानशूर माणसं आहेत की जे ग्रुपसाठी काहीही करू शकतात. वैभव करपे त्यांमधील एक. परवा लिंगाणा गडाच्या पायथ्याशी गडकिल्ले ग्रुपकडून भेट दिलेली एवढी मोठी गिरणी उचलून नेली. कित्येक वेळा बॅजेस स्वखर्चातून ग्रुपसाठी दिले. आजही ५० बॅजेस ग्रुपसाठी दिले. वैभव नरवडेंनी दरमहिन्याप्रमाणे डिझाईन बनवली. असे कित्येक हात या ग्रुपच्या उभारणीसाठी सदैव सज्ज असतात. यावेळी नवीन चेहरे मात्र भरपूर नजरेस पडले, कोकण म्हटलं की आवर्जून येणारेही होतेच. संपूर्ण रात्र पुण्यापासून तब्बल ४५५ किलोमीटरचा प्रवास. रवी काळे सर, बाळाभाऊ, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले ड्रायव्हरसोबत गप्पा मारत चालकास डुलकी लागू नये याची खबरदारी घेत होते.

               पहाटे सहाच्या सुमारास राजापूरजवळ एक तळं बघून गाडी थांबली. खळाळतं शुध्द पाणी आणि नाष्ट्यासाठी भरपूर मोठी जागा. सर्वांनी प्रातःर्विधी उरकला. बाळाभाऊंनी सर्व साहित्य घेऊन आपली नाष्ट्याची तयारी सुरू केली. नेहमीप्रमाणे ठरलेलं कॉम्बिनेशन गरमागरम तुपातली मॅगी, वाफाळता गवती चहा आणि पतंजली बिस्कीट. बाळाभाऊंच्या हातातल्या अन्नपूर्णेच्या सहवासाने आम्ही सकाळच्यापारी तृप्त झालो. या सगळ्याची तयारी बाळाभाऊ दोन तीन दिवस आधीच करतात. चिमुटभर मीठही कमी पडत नाही, असा दणकेबाज अंदाज आहे त्यांचा.

              आठ साडेआठच्या दरम्यान गाडी विजयदुर्गाच्या बंदरावर थांबली. किल्ले विजयदुर्ग मराठ्यांच्या आरमारांची राजधानी, महत्त्वाचं व्यापारी बंदर. सळसळत्या सागर लाटांशी झुंज देणारी तटबंदी. २७ बुरुजांचा सोहळा साजरा करणारा शिवरायांच्या कल्पनेतून साकारलेला सागरीगड. गोमुखी द्वार रचना. सागर तीरावर एखादा हटयोगी तपश्चर्येला बसावा, तसा हा विजयदुर्ग भर समुद्रात ध्यानस्थ बसल्यासारखा भासतो. स्वराज्य कणाकणाने तोलामासाने वाढू लागलं, तसं दूरदृष्टी असणारे शिवराय समुद्राच्या दिशेने वळाले. आरमारांचे बलाढ्यीकरण करावे या हेतूने विजयदुर्गाकडे विशेष लक्ष दिले. मार्च महिन्यातलं ऊन अंगाशी चटक्यांचा विलक्षण खेळ खेळत होतं. दमट हवेमुळे आम्ही सर्व घामाघूम झालो, पण गड डोळ्यांचे पारणे फेडत होता. घेरीये गावाला चिटकून गड म्हणून 'घेरीया' गडाचे उपनाव. शिवकाळात मारुती मंदिरांनी शक्ती उपासनेची बीजं रुजवली. कार्य तडीस जावे यासाठी महादेवाचे मंदिर प्रत्येक गडावर आजही स्थितप्रज्ञ स्वरुपात आहे. स्वागतासाठी प्रताप मारुती मंदिर सजलेलं दिसलं.

                   जीभीचा दरवाजा सुरुवातीला. गोमुखी तटबंदीवर आरमारी लढायांचे व्रण आजही आहेत. असंख्य तोफ गोळ्यांचे मारे समुद्रातून, गलबतातून या तटबंदीने झेलले. पारंपारिक चुन्याच्या घाण्याऐवजी यांत्रिक पद्धतीचा चुन्याचा घाणा वापरून गडाची डागडुजी सुरू होती. काळजाला गारवा लाभला, गडांची देखरेख बघून. या गडाला तिहेरी तटबंदी आहे. समुद्री गड असल्यामुळे भाले, बाण, दगड,बंदुका यांसाठी जंग्या आणि तोफा चालवण्यासाठी फांज्या यांची तटबंदीमध्ये व्यवस्थित योजना केली आहे. लाकडी दरवाजावर खिळे त्याला 'किलग' म्हणतात. हत्ती आला तरी धडका मारताना डोक्याला इजा होण्यासाठी याची योजना. महादरवाजाशेजारीच दारूगोळा कोठार. दगडाचं छप्पर असलेलं असं कोठार पहिल्यांदाच पाहिलं. तोफ गोळा पडला तरी नुकसान होऊ नये यासाठी ही काळजी. प्रकाशाची खिडकी मात्र एकच. गोलाकार  खूब लढा बुरुज एकावेळी १२ तोफा चालवता येतील असा. शेजारीच कान्होजी आंग्रेंचा राजदरबार. या दरबाराने मुंबईच्या उरात धडकी भरवून जमा केलेली खंडणी इथे जमा केली. इंग्रजांनी 'लँड शार्क' अशी उपमा आंग्रेंना दिली.

                   गडाच्या पश्चिम टोकाला शिंदे बुरूज आहे. याची मनोरंजक घटना आहे. इ.स.१७२० मध्ये इंग्रजांनी जोरदार हल्ला चढवला, एक जहाज खालून फुटलं, पाणी आत गेलं. बाकीच्या बोटी पळून गेल्या. १९९५ला याचं रहस्य उलगडलं. भारतीय समुद्र संशोधन संस्थांनी पाणबुडी पाठवून शोधलं. शिंदे बुरुजासमोर दगडांची एक मोठी भिंत दिसली. १२२ मीटर लांब, तीन मीटर उंच आणि ७ मीटर जाडीची. जहाजं जवळ फिरकू नयेत यासाठी. माझं स्वराज्य वाचावं यासाठी महाराजांनी केलेली ही गुप्त योजना. बुरुजांवर दुमजली इमारती बांधल्यात, काही ठिकाणी तिमजलीसुद्धा. ग्रुपसोबत गड न्याहाळताना मज्जा आली. फोटोंच्या मैफिली रंगल्या. या ट्रेकचं विशेष आकर्षण होतं विशाल पाचुंदकर यांचा ड्रोन कॅमेरा आणि गणपतराव काळकुटे यांचे न संपणारे फोटोसेशन. बापरे काय वेड या माणसाला फोटोंचं? पहिल्याच ट्रेकला माझ्या फोटो रेकॉर्डला धूळ चारली यांनी. तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा. भारीच.

                   पोटात कावळे कोकलत होते. आचरा गावी जाऊन सुरमई, बांगडा माशांवर ताव मारला. पोटभर जेवून तारकर्ली बीचकडे निघालो. क्षणार्धात अफाट सागराने आम्हाला सामावून घेतलं. किती उड्या मारल्या याची गणती होणार नाही. एकमेकांसोबत माती खेळलो, खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली. भरलं वांग्याची भाजी करताना वांगं कसं मसाल्याने भरतात तसंच एकेकाला उचलून आणून आम्ही ग्रुप करून समुद्राच्या रेतीत माखत प्रत्येकाचं वांगं भरलं. किनाऱ्याला येऊन गोड्या पाण्याने आंघोळी केल्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. रस्त्यात गॅस शेगडी दुरुस्तीसाठी थांबलो. तेवढ्यात संदीप धोंगडे सरांचे मित्र कानेसर यांची चप्पल तुटल्याचे आम्हाला कळले. गाडी दहा-पंधरा मिनिटं थांबली. घामाघुम झालेले काने सर पळत येत होते आणि चपलेची पिशवी त्यांनी लपतछपत आणलेली होती. काळे सर थोडे रागावले पण आम्ही 'आला गं बाई आला गं' गाणं म्हणत वातावरण हलकं केलं. पिशवीके अंदर क्या है? गाणं म्हणून काने सरांची जाम खेचली पण शेवटपर्यंत पिशवीचं गुपित कळलं नाही.

                 आचरा गावी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. राहणं, आंघोळ, पाणी, शौचालय यांची उत्कृष्ट व्यवस्था होती. संध्याकाळी मसालेभाताला मदत करायला बसलो. खूप थकलो होतो पण मदत न करणाऱ्याला शंभर रुपये दंड, असे काळे सरांनी फर्मान सोडले होते. 'चवदार' या शब्दाचा सन्मान होईल असा मसालेभात बाळाभाऊंनी बनवला. विठ्ठल वडघुले यांची खूप मदत होते ट्रेकवेळी. नितीन सटाले मनापासून काम करतात. स्वार्थाविना काम करणारी हीच माणसे आहेत ग्रुपची शान. सुखाने दोन घास खाता येतील अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल अशी संगत लाभली की आयुष्य जगण्यातली रंगत वाढते, हा अनुभव गडकिल्ले ग्रुपमध्ये वारंवार येतो.

                 संत तुकोबा म्हणतात, 'कौतुक वाटे झालिया वेचाचि!' जगाला वाटो न वाटो, आपल्याला आपल्या मिळकतीचं कौतुक वाटायला हवं. आमची मिळकत म्हणजे गडकिल्ले ग्रुप. या मिळकतीचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो. पोटभर जेवून पहाटे पाच वाजता उठण्याचे ठरवून आम्ही झोपलो.

उरले उरात काही

आवाज चांदण्यांचे,

आकाश तारकांचे

उचलून रात गेली!

                          सुरेश भटांची कविता मनात रातराणीसारखी दरवळत होती. शरीर थकल्यामुळे कधी डोळा लागला कळलंच नाही. रात्रभर कोणतरी खूप घोरत होतं, अशी चर्चा सकाळी सुरू होती. झोपण्यापूर्वीच मी सर्वांना विचारलं मात्र कोणीही याची कबुली दिली नव्हती. सगळे छुपेरुस्तम निघाले. मी तर कधीच घोरत नाही, त्यामुळे माझा प्रश्नच नव्हता. हा हा हा हा हा हा... उषःकाल होत रम्य पहाट झाली.

                       नियती एक कोरा करकरीत दिवस सूर्योदयाबरोबर सर्वांना बहाल करते. रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख्ख करणारं डस्टरच वाटतं मला. त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचे धडे का गिरवायचे? जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरा जातो, नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभावंत मात्र असतो, हे नक्की. चुलीवर तापलेलं पाणी घेऊन आम्ही सगळ्यांनी आंघोळी उरकल्या. इकडे बाळाभाऊंनी उपीट, चहा यांची सोय केली. नाश्ता करून देवगडचे आंबे पाहण्यासाठी निघालो. गुरुदक्षिणा म्हणून रवी काळे सरांना 'गडकिल्ले आणि मी' हे पुस्तक भेट दिलं. ज्यांनी आम्हाला किल्ले भ्रमंती घडवून आणली, त्यांच्यासाठी छोटीशी भेट. पाण्यात असूनही ओलं न होणाऱ्या कमलपत्राप्रमाणे काही माणसं असतात, प्रामाणिक. ज्यांना रुपयाचाही मोह नसतो. काळे सर असंच शुद्ध व्यक्तीमत्व.

                   मध्ये मध्ये कॅमेऱ्यामध्ये फोटो, ड्रोनमध्ये व्हिडिओज यांची रेलचेल सुरूच होती. आंब्यांची ऑर्डर देऊन आम्ही सिंधुदुर्गकडे रवाना झालो. किनाऱ्यावर बस थांबली आणि समोर मदमस्त हत्तीने पाण्यात बैठक मारावी तसा सिंधुदुर्ग किल्ला खुणावू लागला. प्रत्येकी शंभर रुपये बोटीचे तिकीट काढून लाईव्ह जॅकेट घालून आम्ही तयार झालो. काय सौंदर्य भरलंय या अफाट निसर्गात. पण जेव्हा युद्धनौका या समुद्रावर दिसत असतील तेव्हा कसलं रौद्र रूप धारण करत असेल हाच समुद्र. गोमुखी प्रवेशद्वारावरून तासाभरात पुन्हा प्रवेशद्वारावर जमण्याचं आश्वासन आयोजकांना देऊन ग्रुप पांगला. सिंधुदुर्गासारख्या रांगड्या किल्ल्यालाही सौंदर्याची झालर चढवणारा हा फेसाळणारा समुद्र. शौर्य आणि सौंदर्याचा अनुपम संगम यावेळेस पाहायला मिळाला.

                    किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्याचं तुळशी वृंदावन! ८४ बंदरात अशी दुसरी जागा नाही, असं शिवबांनी याचं कौतुक केलं होतं. महाराजांनी हिरोजी इंदलकरांकरवी दुर्ग बांधून घेतला. स्वराज्याची महत्त्वकांक्षा दर्शवणारा हा गड अगणित स्वप्नं उराशी बाळगून योग्यासारखा उभा आहे. गोमुखी महाद्वार. ज्याचं आरमार त्याचा समुद्र यानुसार सागरावर सत्ता गाजवणारा गड. मुघलांच्या नाकावर टिच्चून शिवरायांनी सुरत लुटली. मिळालेली अमाप संपत्ती स्वतःचे राजवाडे बांधण्याऐवजी परकीय शक्तींना आवर घालण्यासाठी हा मजबूत जलदुर्ग उभारला. दगड झिजलेत सागरलाटांनी पण पायातलं शिसं तसंच कायम आहे, बांधणाऱ्याची ईमानदारी दाखवत...

                          राजांचा कोणताही किल्ला पाहिला की शिवरायांची स्वराज्य साधना आठवते. अव्याहत कष्ट, जिद्द, साहस, शौर्य आणि पराक्रम सगळं इथे शांत झाल्यासारखं वाटतं. हा श्रीमंतयोगी जाणता राजा ह्या प्रत्येक गडावर विसावा घेतोय असा भास होतो. कापसाचे तळवे फक्त मांजरांनाच नसतात, भूतकाळालाही असतात. शिवरायांचा सगळा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर लख्ख उभा राहतो, अशा गडकिल्ले भ्रमंतीवेळी. शिवरायांच्या हाताचा नि पायाचा ठसा या गडावर आहे, हेच या गडाचं सदभाग्य. कोळी वेशातली शिवराजेश्वराची मूर्ती पुत्र राजारामाने स्थापित केली. ख्रिश्चनांनी सभामंडप बांधलाय. तटावर चढण्यासाठी सुबक दगडी जिने, मशालीसाठी खोबण्या, गोड्या पाण्याच्या तीन विहिरी (बाव) दहीबाव, दूधबाव आणि साखरबाव. भोवती कितीही गढूळ, खारट पाणी असलं तरी आपण आपलं नितळपण जपलं पाहिजे, ही शिकवण देणाऱ्या या विहिरी. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेलं.  तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला.

याचं वर्णन म्हणजे....

चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा

टोपीकरांचे उरावर शिवलंका,

अजिंक्य जागा निर्माण केला

सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा.

जैसे मंदिराचे मंडन,

श्रीतुलसी वृंदावन,

राज्याचा भूषण अलंकार.

चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न,

महाराजांस प्राप्त जाहले.

                       विशेष म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या (वाय) आकाराच्या होत्या, अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. सिंधुदुर्गाचा खचलेला पाया पाहताना वर्मी दगड लागलेल्या पाखरासारखी अवस्था होते. हे वैभव जपलं पाहिजे याची वारंवार हळहळ वाटते. गडकिल्ले नावाचा हा ग्रुप रेशीम तंतूसारखा हा हा म्हणता कित्येक मने कायमची गुंफून टाकतोय, एक चिवट वेल तयार व्हावा तसं. ट्रेक वरून घरी गेल्यानंतर मन अशा गोड स्मृतींचा चित्र संग्रह पुन्हा पुन्हा चाळत राहतो. छंद नाही गडकिल्ल्यांचा तो देह काय कामाचा? असा विचार ढगात वीज चमकावी तसा मनात लख्ख चमकून जातो. परतताना बोटीमध्ये 'आम्ही गड्या डोंगरचे राहणार' हे गीत म्हटलं. गणपतरावांनी शिवराय गीत घेतले. किल्ल्याविषयी थोडीशी माहिती मी सांगितली.

                   किनाऱ्यावर येताच चालत जवळच असणाऱ्या राजकोटकडे आम्ही वळालो. राजकोट उपदुर्गाची उभारणी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केल्याचे पुरावे आहेत. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. नंतर मात्र केवळ समुद्राजवळचा एक उंच टेकडी सदृश भाग होता, ज्यावर आता शिवरायांचे स्मारक व लाल विटांची भिंत बांधून राजकोट असे नामकरण करण्यात आले आहे. येथून सिंधुदूर्ग किल्ला व आजूबाजूचा परिसर दिसतो. या भग्न किल्याच्या अवशेषांवरून समुद्रात होणारा सूर्यास्त पाहणाऱ्या मावळ्यांना माहितीच नाही की आपण एक किल्ला गमावलाय... गाडीत बसून आम्ही किल्ले सर्जा कोटकडे रवाना झालो.

                            मालवणहून अवघ्या ४ किमीवर असणाऱ्या सर्जेकोटला पोहोचलो. सर्जेकोट पंचक्रोशी मच्छीमार सहकारी सोसायटीपासून डाव्या हाताने जाणाऱ्या रस्त्याने थेट किल्ल्याकडे गेलो. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट, पद्मगड आणि सर्जेकोट हे उपदुर्ग बांधले. त्यातील सर्जेकोट हा किल्ला तलाशिल-सर्जेकोट गाव खाडीच्या मुखावर बांधलेला. वेडीवाकडी वळणे असलेल्या कोळंब नदीच्या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६८ मध्ये हा किल्ला बांधला. सर्जेकोट गडाच प्रवेशद्वार छोटस पण कमानदार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे. आतल्या बाजूला घरे आहेत. त्यांच्या कडेने चालत गेल्यास आपण बालेकिल्ल्यापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबुत आहे. प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे. बालेकिल्ल्यात विहिर, तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत. बालेकिल्ल्यात झाडी माजली असल्यामुळे इतर अवशेष दिसत नाहीत. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजुची तटबंदी व बुरुज शाबुत आहेत.

                              अनेकदा शिवरायांची डिजे जयंती पाहतो आपण सर्वजण. लाखो रुपयांचा खुर्दा उडालेला पाहताना वाटतं, या गडकोटांसाठी तो पैसा वापरला तर काय चित्र दिसेल? आजही किल्ले म्हटलं की शिवाजी महाराज आठवतात. दिवाळीतला किल्ला बांधून पूर्ण झाला, असं कधी म्हणता येतं? जेव्हा शिवबाची प्रतिमा त्यावर विराजमान होते. शिवबा आणि किल्ले हे एक अतूट नातं आहे. ते जतन करायला हवं. किल्ला पाहून गाडीत बसलो. आता जेवल्याशिवाय पर्याय नव्हता इतकी भूक लागली होती.

                             मध्ये एका रस्त्यात गाडी थांबवून सकाळचे शिल्लक राहिलेले उपीट आणि वडापाव यांच्यावर आम्ही ताव मारला. राहण्याची सोय, वडापाव या सगळ्यांसाठी गोरख काळे सर यांचे मित्र एकशिंगे सर यांनी खूप मदत केली. ग्रुप तर्फे श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. झोपडीवजा पालात राहणाऱ्या एका कोकणी मावशींनी आम्हाला थांबायला जागा दिली, पाणी दिलं. कोकणी सौंदर्य हे केवळ सागरलाटा, माडापोफळीच्या बागांमध्ये सीमित नाहीये. ओंजळीत घेतलेल्या प्राजक्ताच्या फुलांसारखी दिसणारी, गोड गरे लाभलेल्या फणसासारखी ही चिवट, प्रेमळ माणसं हे कोकणाचं खरं लौकिक!

                             आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. गाडीमध्ये 'सखू गेली पाण्याला' या गाण्यावर खूप मज्जा केली. वैभव कोळपे या मित्राने हा खेळ रंगवला. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, स्वभाव, वागणं बोलणं यावर परफेक्ट गाणी निवडली. गणपतरावांच्या फोटो प्रेमाखातर 'तू खिच मेरी फोटो' तर काळे सरांवर 'आया है राजा' अशी गाणी झाली. राजकारणावर गप्पा झाल्या. काने सर अन् सभापतीपुत्र कोळपे यांनी सवालजवाब फड सांभाळला. कमलाबाई आणि घड्याळराव यांचं द्वंद्व युद्ध सुरू होतं. पण सगळं काही गमतीदार वळणात. आम्ही फक्त मध्ये मध्ये शेंडे मारायचं काम केलं. आदमापुरात थांबून बाळूमामा समाधीचं दर्शन घेतलं. कोल्हापुरात थांबून तांबडा पांढरा रश्श्यावर ताव मारला. पहाटे पाच वाजता आम्ही पुण्यात उतरलो. वैभव नरवडे, सुमित वडघुले, अमोल नागवे, वैभव वडघुले, योगेश वीर, वैभव कोळपे, अभिजित चव्हाण, अविनाश धोत्रे, अविनाश शिंदे, शैलेश निकम यांसारखी गडकिल्ले ग्रुपमधली पोरं खऱ्या अर्थाने शिवरायांचा वारसा समृद्ध करतात. गड फिरतात, इतिहास जपतात.

                           एखादी गोष्ट सुरू करणं खरंतर तसं सोप्पंय पण खरा कस लागतो, तो सातत्य ठेवायला.दर महिन्याला हे संपूर्ण आयोजन, जेवण, गाडी, खर्चाचा ताळमेळ, राहायची जागा या सगळ्या गोष्टी काळे सर बिनबोभाट करतात. कोणत्याही स्वार्थाशिवाय. महिनाभर संसारासाठी काबाडकष्ट करत राबलेल्या आमच्यासारख्या पक्ष्यांना नवीन पंख फुटावे तसे आभाळात भरारी घेतो आम्ही या ग्रुपसोबत एक दोन दिवसासाठी. माऊलीचं दूध पिऊन झोपेत असणाऱ्या चिमण्या चेहऱ्यावरचे जे समाधान असतं ना तीच गोड मुद्रा, तीच तृप्ती असते आमच्या चेहऱ्यावर ट्रेक झाल्यानंतर. इथे येणारा प्रत्येक जण एक किंवा दोन दिवस पूर्ण आयुष्य जगत असतो. संसाराच्या, समाजाच्या विवंचना सगळ्या बाजूला ठेवून इथं प्रत्येक जण लहान मुलासारखं आपले हट्ट पुरवत राहतो.

                       पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे म्हणताना खिशात गरजेएवढा पैसा असायलाच हवा, हे खरंय. पैशांच्या जोरावर जगभरातली सुखं अनुभवता येतात, सोबत मात्र जिवाभावाची माणसं हवीत. कटकारस्थान न करणारी, हेवेदावे यांपासून लांबच्या गावात वसणारी. आमच्या गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपसारखी. विकायचं ठरवलं की फुलंसुद्धा तराजूत टाकावी लागतात. विकणाऱ्याने फुलांचं वजन विकावं, सुगंध वेड्या माणसाने वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. फुलं देणारे हात सातत्याने सुगंधित होतात, एवढे मात्र नक्की.. त्यामुळे प्रत्येक क्षण जगत अनुभवांची मोतीमाळ गुंफावी. आपल्या माणसांना आनंद द्यावा अन् भरभरून प्रतिसादाच्या रुपात पुन्हा घ्यावा. बाकी त्रास द्यायला परके असतातच की! कोकणातले तीन दिवस फुल्ल मजेत गेले.

                               शुक्रवारी रात्री दहा पासून ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्ही गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजकोट, सर्जेकोट, तारकर्ली बीच, बाळु मामा आदमापूर, भरपूर मासे, कोल्हापुरात मटण भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, बाळा भाऊंच्या हातची चवदार तुपातली मॅगी, उपीट, देवगड हापूस आंबे, वडापाव सगळ्यांचा मनसोक्त फडशा पाडला. महिन्यातून एकदाच ट्रेकमुळे भेटणारे जीव गळाभेट घेतात तेव्हा आषाढी एकादशीला एखादी दिंडी दुसऱ्या दिंडीला भेटतेय, असाच भास होतो. अशा वेळी भेटी लागी जीवा, लागलीसे आस!अशी अवस्था होते.

                            आमचा विठुराया स्वराज्यनिर्माते शिवबाराजे आणि संतदिंडीचे मानकरी रवी काळे सर, गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान पालखीचे भोई बाळाभाऊ, विठ्ठल वडघुले, नितीन सटाले आणखी कित्येक अनामिक हात अन् सोबत आम्ही सगळे गडदिंडीचे वारकरी मावळे. ज्यांनी हा सोहळा अनुभवला, त्यांनी दोन दिवसांत आयुष्य जगलं असंच काहीसं होतं. दर महिन्याला अशा गडकिल्ले भ्रमंतीचा घाट घातला जावा, हीच सदिच्छा! गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या नावानं चांगभलं...

भेटू पुन्हा नव्या गडाच्या पायथ्याशी.

पुढील ट्रेक

कात्रज सिंहगड पायी वारी

दि.२१एप्रिल २०२४

आयोजकांशी अवश्य संपर्क साधा.


मार्गदर्शक पंकज माने   7709159044

आयोजक रवी काळे   9096465675

लेखन आयुब शेख   9552941271 

Sunday, March 17, 2024

सुखाची भाकरी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या वतीने लिंगाणा गडाच्या पायथ्याशी मोहरी गावात पिठाची गिरणी भेट.

सुखाची भाकरी!

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातल्या लिंगाणा गडाच्या पायथ्याशी मोहरी गाव. नुकतीच लाईट या गावात आली. पण रोजच्या भाकरीसाठी लागणारं पीठ आणण्यासाठी चार-पाच किलोमीटर लांब जाणाऱ्या या चिमुकल्या हातांना आता स्वतःच्या घरची पिठाची गिरणी गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या माध्यमातून प्राप्त झाली.

प्रकाशाच्या पहिल्या किरणस्पर्शात अंधार दूर करण्याचे सामर्थ्य असतं. हा प्रारंभ ग्रुपच्या वतीने करण्यात आला.

गिरणी बघताच चांदणं फुलल्यासारखे चेहऱ्यावरचे भाव पाहून आम्ही धन्य झालो.

उन्हातानात वळचणीचा आसरा घेत दुकानं शोधत फिरणाऱ्या या चिमण्या आता गिरणीमुळे वाचलेला वेळ काढतील त्यांच्या शाळेसाठी, अभ्यासासाठी. सावलीत बसून सुखाची भाकरी खातील.

गुरु ठाकूरच्या चारोळी आठवल्या,

मनाच्या मातीची उजळो पणती

नाती आणि मती तेजाळाया,

जाणिवांना राहो वास्तवाचे भान

वसो समाधान अंतरंगी!

या जाणीवा बोथट होता कामा नये, हाच प्रयत्न गडकिल्ले प्रेमी करतात.

जो दिवस तुम्ही भरभरून दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगलात, तोच खरा दिवस. बाकी सगळ्या कॅलेंडरच्या तारखा असतात खरं तर...

या गडकिल्ले भटकंतीने जगायला शिकवलं, आयुष्याचा महोत्सव करायला शिकवलं. लोकांच्या अडीअडचणीला उभं रहायला शिकवलं.

सकाळी अंगणातला पारिजातक फुलांचा सडा टाकून मोकळा होतो, रीतं होण्यातलं समृद्धपण तो किती सहजपणाने दाखवतो. अशी समृद्धी आम्ही शिकतोय, कृतीत आणतोय.

एखाद्याच्या ढगाळ आयुष्यात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न करतोय.

गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान ग्रुपचं प्रतिनिधित्व आज पंकज माने, शरद काळे, गणेश दादा घोरपडे, वैभव करपे आणि रवी काळे यांनी केले.

निसर्ग गुरु मानला आणि शिवरायांचा सह्याद्री स्वर्ग वाटू लागला. त्यांचं वर्चस्व मान्य केलं आणि जगण्यातलं गुरगुरणं थांबलं, मिजास थांबली, माणसांनी माणसांसाठी स्थिर व्हावं आणि सर्वांनी माणुसकीचं आकाश पेलावं यासाठी माणसांना भेटायचं ठरवलं, आधार द्यावा, सुख दुःख वाटावं, जेव्हा जेव्हा अशा भेटी घडतील व घडवून आणल्या जातील तेव्हा तेव्हा तो दिवस...

भेटी लागी जीवा,

लागलीसे आस! असाच होईल.

या ग्रुपचा एक छोटासा भाग होता आलं, हेच भाग्य...

संपूर्ण गडकिल्ले प्रेमी प्रतिष्ठान निमगाव म्हाळुंगी पुणे ग्रुपच्या नावानं चांगभलं!

🙏🏻💐😇

उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक',पनवेल, रायगड लेखन आयुब कलाम शेख

  उन्हाळ्यातला 'पावसाळी ट्रेक' किल्ले कर्नाळा,पनवेल, रायगड प्रत्येक महिन्याकाठी कोणता किल्ला निवडला जाईल? याची आम्ही चातकाप्रमाणे वा...